‘भरारी’तून तयार होताहेत १२ हजार विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:29 AM2021-07-29T04:29:43+5:302021-07-29T04:29:43+5:30
नरेश रहिले गोंदिया : जिल्ह्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत नाही, त्यांनी मोठे यश प्राप्त करावे, यासाठी ...
नरेश रहिले
गोंदिया : जिल्ह्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत नाही, त्यांनी मोठे यश प्राप्त करावे, यासाठी गोंदिया जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे यांच्या संकल्पनेतून इयत्ता ५ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘भरारी २०२१’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. मागच्यावर्षी वर्षभर कोरोनामुळे शाळा बंद असल्याने गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण दिले. इयत्ता ५ वीचे ९९७२, तर ८ वीचे २७१३ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उतरले आहेत.
कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने बंद असलेल्या शाळांचा फायदा घेण्यासाठी शिष्यवृत्तीची तयारी ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली आहे. ऑनलाईन शिकवणी वर्ग या उपक्रमातून घेण्यात आले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील हुशार व कर्तबगार विद्यार्थ्यांनी घरबसल्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यास मदत झाली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेकरिता पात्र विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गाचा लाभ दिला आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा बंद असल्याने वर्ग हे गावातील योग्य ठिकाणी किंवा समाज मंदिरात विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आले. ग्रामीण भागात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ॲन्ड्राॅईड मोबाईल उपलब्ध नसल्याने मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील शिष्यवृत्ती पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी वर्गाचा लाभ देण्यात आला. या विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित व बुध्दिमत्ता चाचणीच्या दोन सराव परीक्षा घेण्यात येत आहेत. शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा ९ ऑगस्ट रोजी असल्याने त्यासाठी सराव परीक्षा पहिली ३० जुलैला, तर दुसरी ५ ऑगस्टला घेतली जाणार आहे. या उपक्रमासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा समन्वयक बाळकृष्ण बिसेन, संगणक प्रोग्रामर नीतेश खंडेलवाल, विषय सहायक सुभाष महारवाडे, संदीप सोमवंशी, गौतम बांते, आशिष वागदेवे, नरेंद्र गौतम, तारेंद्र ठाकरे, परमानंद रहांगडाले, मुकेश रहांगडाले, सुनील हरिणखेडे, मधुकर शेंडे, माणिक शरणागत, शालीक कठाणे, हुमेंद्र चांदेवार, नरेश गोंडाणे यांनी सहकार्य केले.