गोमंतकीयांसोबत चित्रपट करणार; अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:35 IST2026-02-09T11:35:39+5:302026-02-09T11:35:39+5:30
नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाच्यावतीने कांपाल येथे बुक फेस्टिव्हलमध्ये सचिन पिळगावकर बोलत होते.

गोमंतकीयांसोबत चित्रपट करणार; अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली इच्छा
नारायण गावस, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'मला जरी कोंकणी भाषा येत नसली तरी माझी मातृभाषा कोंकणीच आहे. पण कोकणी शिकायला आवडेल. कोंकणी शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. गोमंतकीय कलाकारांना घेऊन सपत्नीक चित्रपट तयार करण्याचा माझा विचार आहे,' असे प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी रविवारी सांगतिले. नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाच्यावतीने कांपाल येथे बुक फेस्टिव्हलमध्ये ते बोलत होते.
सचिन पिळगावकर म्हणाले, 'आमच्या पाच पिढ्या मुंबईत गेल्या. त्यामुळे कोणी कोंकणी बोलत नाही. त्यामुळे मला कोंकणी येत नाही; पण आता भाषा शिकण्याचा विचार आहे. कोंकणी चित्रपट निर्मितीचाही विचार आहे.
पुस्तक लेखनाचा विचार
अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले की, 'माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीला २०१३ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा मी माझे आत्मकथन हे पुस्तक लिहिले. यातून करिअरमधील विविध घटनांचा उलगडा झाला. आता 'नवरा माझा नवसाचा २' हा चित्रपट नुकताच प्रसिद्ध झाला. हा मराठी चित्रपट कसा बनवला, या विषयावर एक पुस्तक लिहिण्याचा विचार आहे. ते लवकर पूर्ण केले जाणार आहे. गणपतीपुळेच्या (रत्नागिरी) आशीर्वादाने हा चित्रपट कसा बनला हा विषय यात असेल.
वेळेचे महत्त्व
सचिन पिळगावकर म्हणाले की, 'मी अजून वयस्क दिसत नाही, हा मला आईचा लाभलेला आशीर्वाद आहे. मी सर्व काही खातो; पण मर्यादित. मनावर ताण घेत नाही. जास्त विचार करत नाही. वेळेचे महत्त्व पाळतो. मला लहानपणी इंग्रजी भाषा येतच नव्हती; पण अनुभवातून शिकलो. पत्नी सुप्रिया पिळगावकर, माझे मित्र अभिनेते अशोक सराफ यांची खुप मदत झाली.
पिळगावकर म्हणाले की, 'लवकरच आमच्या मूळ गावी म्हणजे पिळगाव येथे घर बांधण्याची इच्छा आहे. या गोष्टी लवकरच पूर्ण केल्या जातील. माझे नाते हे गोव्याशी जोडलेले आहे.'
पिळगावकर म्हणाले, 'लहानपणापासून अभिनय क्षेत्रात असल्याने हिंदी, मराठी असे अनेक चित्रपट केले. माझा पहिला खूप गाजलेला चित्रपट म्हणजे 'गीत गाता चल' खूप गाजला. त्यामुळे अनेकांना मी अजून उत्तर भारतीय वाटतो. अनेकजण मला मुंबईचा, मराठी माणूस समजत नाहीत. या चित्रपटात मला खूप काही शिकवले. बाल कलाकार म्हणून अनेक पुरस्कार मिळाले. नंतर असे अनेक चित्रपट करत गेलो. 'शोले'सारख्या चित्रपटातही मला संधी मिळाली. हा चित्रपट म्हणजे एक प्रकारची क्रांती आहे.