दरोड्यातील तिघे संशयित जेरबंद; पोलिस पथकाची हैदराबादमध्ये कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 07:16 IST2025-10-10T07:14:41+5:302025-10-10T07:16:36+5:30
आणखी एक पथक रवाना, इतरांचा शोध सुरूच

दरोड्यातील तिघे संशयित जेरबंद; पोलिस पथकाची हैदराबादमध्ये कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : गणेशपुरी येथील डॉक्टर महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर मंगळवारी पहाटे पडलेल्या दरोडाप्रकरणी तिघा दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाल्याचे समजते. या तिघांना हैदराबादमध्ये अटक करण्यात यश मिळाल्याचे सांगण्यात येते. इतर तिघांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांचे आणखी एक पथक हैदराबादकडे रवाना झाले आहे.
दरोड्यात सहभागी असलेल्यांचा पणजीत दोनापावल येथील दरोड्याशी संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. मंगळवारी मध्यरात्री तीन ते पहाटे पाच यादरम्यान शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण करीत सहाजणांच्या टोळीने हा दरोडा टाकला होता. हे दरोडेखोर बंगल्याच्या पाठीमागील बाजूच्या खिडकीचे गज वाकवून बंगल्यात आले होते. दरोडेखोरांनी सुमारे ३५ लाखांहून जास्त किमतीचे दागिने, तसेच रोख रक्कम लंपास केली होती. त्यानंतर दरोडेखोरांनी डॉक्टरांच्याच कारमधून पणजीच्या दिशेने पलायन केले. त्यानंतर तेथे ती कार सोडून ते प्रवासी टॅक्सीमधून बेळगावला गेले होते.
दरोड्यानंतर डॉ. महेंद्र घाणेकर यांच्याकडून म्हापसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या दरोडेखोरांना अटक करण्यासाठी पोलिसांची आठ पथके कर्नाटक, तसेच महाराष्ट्रात रवाना करण्यात आली आहेत. यात बेळगाव, बंगळुरू, कोल्हापूर, मुंबई, विजापूर, हैदराबाद यांसारख्या शहरांचा समावेश आहे. तपासासाठी तेथील स्थानिक पोलिसांचेही सहकार्य घेण्यात आले आहे. तपासासाठी क्राईम ब्रँचचेही सहकार्य घेण्यात आले होते. त्यांचीही दोन पथके विविध भागात पाठविण्यात आली आहेत.
दरम्यान, दरोडेखोर ज्या टॅक्सीतून बेळगावात पसार झाले, त्या चालकाची बुधवारी कसून चौकशी करण्यात आली. या प्रकरणात टॅक्सीचालक हा महत्त्वाचा दुवा असल्याने त्याच्याकडून देण्यात आलेली माहिती पडताळण्यात आली. फॉरेन्सिक पथकाकडूनही टॅक्सीची तपासणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
दरोडेखोर कार घेऊन पळाल्याची माहिती पोलिसांना घाणेकर कुटुंबीयांकडून उशिरा देण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. कार चोरीची माहिती वेळीच मिळाली असती तर कदाचित त्यांना गोव्याबाहेर पलायन करण्यापूर्वी अटक करणे शक्य झाले असते, असेही सांगितले जाते.
टॅक्सी स्टँडच्या परिसरात पहाटे पाचदरम्यान नाकाबंदी हटवण्यात आली होती, तर दरोडेखोर ५:२० मिनिटांनी नाकाबंदी केलेल्या परिसरातून गेले असाही दावा करण्यात आला आहे. त्यानंतर पहाटे ५:४५ च्या सुमारास दरोडेखोर बेळगावच्या दिशेने रवाना झाले होते असे तपासात उघड झाले आहे.
या सहाजणांच्या टोळीत बांगलादेश, पश्चिम बंगाल व ओडिशातील दरोडेखोरांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांना वाटते. त्यामुळे इतर चौघे दरोडेखोर बांगलादेशात पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचे विशेष पथक बंगालकडे रवाना झाले आहे.
ते सीसीटीव्ही फूटेज, चालकाकडून स्केच ठरले महत्त्वाचे
पुलाखाली डॉक्टरांची गाडी सोडल्यानंतर सर्व सहा दरोडेखोर टॅक्सीसाठी चालत बसस्थानकाच्या दिशेने गेले. त्यावेळी परिसरातील सीसीटीव्हीचे फूटेज आणि त्या टॅक्सी चालकाने सांगितलेल्या वर्णनानुसार काढलेले स्केच या संशयितांना जेरबंद करण्यास अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरला. बेळगावमधून संशयित हैदराबादला रवाना झाल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली.
भाजप आमदाराचे हॉटेल लुटले
राज्यात सर्वत्र चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांत दरोड्यासह अनेक चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आता तर चक्क भाजपचे वजनदार आमदार व माजी मंत्री मायकल लोबो यांचे हॉटेल चोरट्याने लुटण्याची घटना घडली. हणजूण येथे परवा घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
मायकल लोबो व कुटुंबीयांचे हणजूण येथे हॉटेल आहे. परवा मध्यरात्री दोन वाजता चोरटा या हॉटेलमध्ये घुसला. नेमके त्याचवेळी काऊंटरवर कुणी नव्हते. सुरक्षा रक्षक कुठेतरी दूर गेला असताना चोरट्याने थेट काऊंटरवरील पैशांचा मोठा बॉक्स पळवला. तो आणखीही सामान चोरू पाहत होता. पण ते त्याला शक्य झाले नाही, असे दिसून आले. त्याने काऊंटरवरील सगळे पैसे लुटले. हा चोरटा हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये पूर्णपणे दिसून येतो. त्याच्या दोन्ही हातांवर टॅट्यू कोरलेले आहेत असे दिसते.
याबाबत आमदार लोबो यांनी पोलिसांत तक्रार केली. पण अजून या चोरीचा छडा लागलेला नाही. काल लोबो यांनी 'लोकमत'ला सांगितले की, 'किनारी भागात जे हजारो परप्रांतीय येऊन राहतात, त्यांच्याकडे ओळखीचे कार्ड किंवा आधार कार्ड आहे की नाही हे कोणीच पाहत नाही.
पोलिस यंत्रणा अधिक सतर्क होणे गरजेचे आहे. कारण विविध प्रकारच्या पार्श्वभूमीचे स्थलांतरित मजूर किनारी भागात सगळीकडे भाड्याने राहतात. त्यांच्याविषयी कुणाकडे काहीच माहिती नसते, अशी स्थिती आहे. पोलिसांकडे स्थलांतरीतांविषयी अद्ययावत माहिती असणे गरजेचे आहे. तरच वाढते गुन्हे रोखता येतील.