लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'लोकांचे जे मत आहे ते योग्य प्रकारे पोहचविण्यात 'लोकमत' अग्रेसर राहिला आहे. या सतरा वर्षाच्या प्रवासात 'लोकमत' नेहमीच निःपक्षपाती राहिल्याने लोकप्रिय झाला आहे,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. "लोकमत'चा हा प्रवास अखंडितपणे सुरू राहावा' अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.
दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये बुधवारी 'लोकमत'च्या गोवा आवृत्तीने शानदार सोहळ्यात आपला १७वा वर्धापनदिन साजरा केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उपस्थित होते. वीजमंत्री सुदिन ढवळीकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, 'लोकमत'चे संपादक सद्गुरू पाटील, वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप गुप्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'लोकमतने केवळ वृत्तपत्र काढून धन्यता न मानता आजच्या बातम्या आजच लोकापर्यंत पोहविण्यासाठी डिजिटल बुलेटिनच्या माध्यमातून प्रयत्न केले. यातून ते काळासोबत विकसित होत असल्याचे दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत २०४७ आणि विकसित गोवा २०३७ हे स्वप्न पूर्ण करण्यास पत्रकारांची भूमिका तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे' असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
'लोकमत'ची कुजबुज दर्जेदार
मुख्यमंत्री म्हणाले की, 'लोकमत'च्या कुजबूज खूपच प्रसिद्ध आहेत. अनेकजण बातम्या वाचण्यापूर्वी कुजबुज कोणावर आली हे पाहतात. पण, केवळ कुजबुजच नव्हे तर लोकमतचे संपादकीय खूपच दर्जेदार असते. आताची युवा पिढी मुळात वृत्तपत्र थोडे कमी वाचतात. पण, ज्येष्ठा वाचक अजूनही आधी संपादकीय वाचतात. त्यातून वैचारिक शिदोरी मिळते. माझे वडील अजूनही संपादकीय वाचतात आणि मला वेळोवेळी कुठल्या वृत्तपत्रात काय छापून आले, याची माहीत देत असतात' असेही त्यांनी सांगितले.
लोकमत सखींचा सत्कार
वर्धापनदिनाचे औचित्य साधून समाजात दर्जेदार काम करणाऱ्या काही 'लोकमत सखीं'चा मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने अनुराधा करंबेळकर (डिचोली), विकिता नाईक (पणजी), अश्विनी मंजू (साखळी), गीता बोयेकर (साखळी), श्यामल गाड (उसगाव), गीता धवन (वाळपई), अंजली वेर्णेकर (बेती), चित्रा क्षीरसागर (ताळगाव), अनुराधा घाडी (उसगाव), साक्षी वायंगणकर (सांताक्रूझ), अंतरा नाईक (तुये), नीता पांढरे (म्हापसा), शशिकला अळवणी (सावंतवाडी), दीपा मुजुमदार (फोंडा) व अनुजा सावंत (उसगाव) यांचा सत्कार करण्यात आला. यासोबत साखळीच्या नगराध्यक्ष सिद्धी प्रभू-पोरोब यांचाही सत्कार करण्यात आला. सखी मंचच्या कार्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.
लोकमतमुळे विचारमंथन : मंत्री ढवळीकर
मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, 'लोकमतचा सतरा वर्षांचा प्रवास कसा गेला हे कळलेच नाही. 'लोकमत'सारख्या माध्यमांमुळे समाजातील विविध मुद्द्यांवर योग्य विचारमंथन घडते. मी स्वतः संपादकीय वाचून समाजाची दिशा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पत्रकारितेने कर्तव्यभावनेने काम केल्यास नवी दिशा मिळू शकते. विषय किती आणि कुठपर्यंत मांडायचा याची जाण पत्रकारांना असणे आवश्यक आहे. राजकारण आणि वृत्तपत्रांचे ध्येय जवळपास एकच आहे, ते म्हणजे समाजाचे हीत राखणे. आपण सर्वांनी एकत्रितपणे समाजहितासाठी कार्य करूया, असे ढवळीकर म्हणाले.
'लोकमत'ने लोकांचे मुद्दे योग्य पद्धतीने पुढे आणण्याचा प्रयत्न केला. सरकारची किंवा विरोधकांची बाजूही चांगली मांडली जाते. बातम्यांच्या माध्यमातून सरकारच्या योजना जास्तीस सर्वसामान्यांपर्यंत पोहचाव्यात, याची काळजी पत्रकारांनी घेतली पाहिजे. यातून अनेक गरजूंना मदत होईल. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
Web Summary : Chief Minister Pramod Sawant praised Lokmat's unbiased reporting during its 17th anniversary. He highlighted its digital initiatives and role in achieving developed Goa 2037. Ministers lauded Lokmat's thought-provoking articles and societal impact. The event honored Lokmat Sakhi members for their contributions.
Web Summary : मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने लोकमत की 17वीं वर्षगांठ पर निष्पक्ष रिपोर्टिंग की सराहना की। उन्होंने इसकी डिजिटल पहल और विकसित गोवा 2037 को प्राप्त करने में भूमिका पर प्रकाश डाला। मंत्रियों ने लोकमत के विचारोत्तेजक लेखों और सामाजिक प्रभाव की सराहना की। कार्यक्रम में लोकमत सखी सदस्यों को उनके योगदान के लिए सम्मानित किया गया।