नेतृत्वहीन कॉंग्रेस आहे, सरकार नव्हे, भाजपची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 22:15 IST2018-04-17T22:15:19+5:302018-04-17T22:15:19+5:30
गोव्यातील सरकार नेतृत्वहीन झाले नाही तर गोव्यात कॉंग्रेस नेतृत्वहीन झाली असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते आमदार निलेश काब्राल यांनी केला. त्यामुळेच हा पक्ष अद्याप आपला अध्यक्ष निवडू शकत नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला.

नेतृत्वहीन कॉंग्रेस आहे, सरकार नव्हे, भाजपची टीका
पणजी - गोव्यातील सरकार नेतृत्वहीन झाले नाही तर गोव्यात कॉंग्रेस नेतृत्वहीन झाली असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते आमदार निलेश काब्राल यांनी केला. त्यामुळेच हा पक्ष अद्याप आपला अध्यक्ष निवडू शकत नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला.
भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काब्राल यांनी कॉंग्रेसचे राज्यपालांना दिलेले निवेदन म्हणजे फसलेला स्टंट असल्याचे सांगितले. सरकार अस्तित्वात नसल्याचा आरोप करणारा कॉंग्रेस नेते आता सरकार नेतृत्वहीन असल्याचे सांगतात. गोव्याचे सरकार नेतृत्वहीन नाही. मुख्यमंत्री आरोग्याच्या कारणास्तव विदेशात उपचार घेत असले तरी त्यांनी नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय मंत्र्यांच्या समितीद्वारे राज्यकारभार सुरू आहे. या उलट कॉंग्रेसची स्थिती झालेली आहे. ते गोव्यात प्रदेशाध्यक्ष ठरवू शकत नाहीत आणि आरोप मात्र सरकारवर करतात असे काब्राल यांनी सांगितले. तीन सदस्यीय मंत्र्यांच्या समितीला घटनात्मक आधार नसल्याचा शांताराम नाईक यांचा दावाही त्यांनी फेटाळला.
विधानसभा अधिवेशनाच्या मुद्यावर बोलताना काब्राल म्हणाले की आता अधिवेशन जुनमध्ये घेतले जाईल. त्यापूर्वी अधिवेशनाची गरज नाही. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी ७ दिवसांपूर्वीच आपण बोललो होतो. त्यांची प्रकृती सुधारत आहे. उपचारांना ते दाद देत आहेत. गोव्यात येण्या एवढी त्यांची परिस्थिती सुधारल्यानंतर ते गोव्यात परततील असेही ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांच्यावरही त्यांनी टीका केली. खाण बंदीमुळे लोकांचा रोजगार जात आहे. कंपन्याकडून कामगारांना काढणे थांबवावे. आणखी काही काळ धीर धरावा. खाण उद्योग सुरू होण्याच्या बाबतीत खूप आशा असल्याचे त्यांनी सांगितले.