हरमलचा पर्यटन हंगाम समाप्तीकडे; व्यावयायिकांकडून शॅक्स बंद करण्याची प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 11:41 IST2026-05-06T11:40:39+5:302026-05-06T11:41:18+5:30
काही दिवसांतच राज्यातील पर्यटन हंगाम संपुष्टात येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

हरमलचा पर्यटन हंगाम समाप्तीकडे; व्यावयायिकांकडून शॅक्स बंद करण्याची प्रक्रिया सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, हरमल : किनारपट्टी भागातील पर्यटन हंगाम मे महिन्याच्या प्रारंभीच आटोपण्याच्या स्थितीत पोहोचला असून अनेक शॅक्स व्यावसायिकांनी व्यवसाय बंद करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांतच राज्यातील पर्यटन हंगाम संपुष्टात येणार असल्याचे चित्र दिसत आहे.
हंगाम संपल्याने शॅक्स उभारणीसाठी लावण्यात आलेले तंबू व संरचना काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. याच दरम्यान विविध सरकारी खात्यांच्या कारवायांमुळे व्यवसायावर बंधने येत असल्याने अनेक व्यावसायिकांनी नियमानुसार व्यवसाय बंद केल्याने समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, वाढत्या उकाड्यामुळे विदेशी पर्यटकांनी थंड हवामान असलेल्या प्रदेशांकडे परतीचा प्रवास सुरू केला आहे. परिणामी स्थानिक शॅक्स व्यवसायाला आर्थिकदृष्ट्या तोटा सहन करावा लागत असल्याने अनेकांनी हंगाम लवकर आटोपण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणतः जानेवारी ते एप्रिल या कालावधीतच पर्यटनाचा मुख्य हंगाम चालतो.
शॅक्स व्यवसाय हा फक्त चार ते पाच महिन्यांचा असल्याने कामगारांना पूर्ण वर्षभर रोजगार देणे शक्य नसते. त्यामुळे मे महिन्यापूर्वीच व्यवसाय बंद करून कामगारांना इतरत्र रोजगार शोधण्याची संधी दिली जाते, असे एका व्यावसायिकांने स्पष्ट केले.
दरवर्षी त्याच कामगारांची पुनर्नियुक्ती होत असल्याने त्यांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेतले जात असल्याचेही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सरकारने शॅक्स व्यवसायाला ग्रामीण व शहरी दर्जा देऊन परवाना शुल्कात सवलत द्यावी, अशी मागणी होत आहे. पर्यटन क्षेत्राला हातभार लावणाऱ्या या व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी नियम शिथिल करण्याचीही मागणी पुढे येत आहे.