गोव्यात देशातील सर्वांत मोठे वेलनेस केंद्र उभारणार; रामदेवबाबा यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 08:48 IST2026-01-25T08:48:15+5:302026-01-25T08:48:15+5:30
गोसंवर्धनाबाबत प्रत्यक्ष कृती करण्याचे आवाहन

गोव्यात देशातील सर्वांत मोठे वेलनेस केंद्र उभारणार; रामदेवबाबा यांची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा हे केवळ पर्यटनाचे नव्हे, तर आरोग्य, वेलनेस आणि आध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र म्हणून विकसित करणे गरजेचे आहे. गोवा केवळ निसर्गसौंदर्याने नटलेले राज्य नसून, ते खोल अध्यात्मिक परंपरा असलेली भूमी आहे. त्यामुळे येत्या काळात गोवा सरकारच्या सहकार्याने पतंजलीचे देशातील सर्वात मोठे वेलनेस केंद्र गोव्यात उभारण्यात येईल, अशी घोषणा योगगुरू रामदेवबाबा यांनी केली.
पणजी येथे काल, शनिवारी आयोजित योग सत्रानंतर ते बोलत होते. गोसंरक्षण हे केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता कृतीत उतरले पाहिजे. परिषदा घेणे, घोषणा देणे किंवा गायींच्या नावाखाली हिंसाचार करणे, यामुळे 'गोरक्षा' साध्य होणार नाही, हे स्पष्ट करत त्यांनी अशा प्रकारच्या हिंसाचाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. पतंजली संस्थेकडून सध्या देशभरात सुमारे १ लाख गायींचे संरक्षण आणि संगोपन केले जात असल्याची माहिती देत रामदेवबाबा म्हणाले की, जर पतंजलीसारखी संस्था ही जबाबदारी उचलू शकते, तर प्रत्येक शंकराचार्यानीही गोमातेच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून गोसंवर्धन साध्य होईल का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
संत, महंतांसाठी...
केवळ गो-रक्षणाच्या घोषणा देऊन, परिषदा आयोजित करून किंवा राजकीय टीका करून गायींचे संरक्षण होणार नाही. गोसंवर्धन हे प्रामाणिकपणा, निष्ठा आणि प्रत्यक्ष कृतीतूनच साध्य होऊ शकते. यासाठी संत, महंत आणि शंकराचार्यानी स्वतः पुढे येऊन गाई पाळण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे मत रामदेवबाबा यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताला जागतिक आरोग्य केंद्र आणि सनातन ज्ञानाचे केंद्र बनविण्याचे स्वप्न असल्याचे नमूद करत रामदेव म्हणाले की, त्या दिशेने देशभरात विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. योग, आयुर्वेद, नैसर्गिक उपचार आणि अध्यात्माच्या माध्यमातून भारताची ओळख अधिक व्यापक करण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.