रेती चोरी करणारे दोन ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:33+5:30
चार दिवसांपूर्वी बोदली घाटातून रेती तस्करी करणारे पाच ट्रॅक्टर जप्त केले होते. कृपाळा नदी घाटातूनही रेतीची तस्करी होत असल्याची गोपनिय माहिती पथक क्रमांक २ ला प्राप्त झाली. त्यानुसार नदी पात्रात धडक दिली असता, गोकुलनगर येथील संजय बाबाजी लेनगुरे यांच्या मालकीच्या दोन ट्रॅक्टर रेती भरताना नदी पात्रातच आढळून आल्या. दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या आहेत.

रेती चोरी करणारे दोन ट्रॅक्टर जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पोटफोडी नदीच्या कृपाळा नदी पात्रातून रेतीची चोरी करणारे दोन ट्रॅक्टर गडचिरोली तालुक्याच्या भरारी पथकाने जप्त केल्या आहेत. सदर कारवाई बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अवैध रेती उपशावर आळा घालण्यासाठी गडचिरोली तालुक्यात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दोन पथक तयार करण्यात आले आहेत. सदर पथक आळी पाळीने रात्री व दिवसा चारचाकी वाहनाने गस्त घालत आहे. चार दिवसांपूर्वी बोदली घाटातून रेती तस्करी करणारे पाच ट्रॅक्टर जप्त केले होते. कृपाळा नदी घाटातूनही रेतीची तस्करी होत असल्याची गोपनिय माहिती पथक क्रमांक २ ला प्राप्त झाली. त्यानुसार नदी पात्रात धडक दिली असता, गोकुलनगर येथील संजय बाबाजी लेनगुरे यांच्या मालकीच्या दोन ट्रॅक्टर रेती भरताना नदी पात्रातच आढळून आल्या. दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या आहेत.
सदर कारवाई मंडळ अधिकारी एस. एस. बारसागडे, जी. डी. सोनकुसरे, तलाठी अजय तुंकलवार, विकास कुंभरे, भूषण जंवजाळकर, गणेश खांडरे यांच्या पथकाने केली आहे. दोन्ही पथकांची रेती तस्करांवर वॉच असल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
इतरही तालुक्यांमध्ये पथकांची गरज
गडचिरोली तालुक्याने दोन भरारी पथके तयार केले आहेत. या पथकांनी मागील चार दिवसात सात ट्रॅक्टर जप्त केल्या आहेत. रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने जिल्हाभरात रेतीची खुलेआम चोरी केली जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. मात्र इतर तालुक्यांनी अशा प्रकारचे भरारी पथक तयार केले नाहीत. त्यामुळे रेती चोरीवर आळा घालण्यास मर्यादा येत आहेत. एखाद्या तलाठ्याच्या क्षेत्रात रेती चोरी होत असेल व त्याची माहिती तलाठ्याला जरी असली तरी एकटा तलाठी रात्री जाऊन कारवाई करण्याची हिंमत करीत नाही. त्यामुळे गडचिरोली तालुक्याप्रमाणे इतरही तालुक्यांनी अशा प्रकारची भरारी पथक तयार करून त्यांच्याकडे जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे.