बिजापूरच्या जंगलात थरार, ५० लाखांचा इनामी 'पापा राव'ला जवानांनी घेरले ! दोन नक्षलवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 15:07 IST2026-01-17T15:06:06+5:302026-01-17T15:07:01+5:30
Gadchiroli : छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बिजापूर जिल्ह्यात १७ जानेवारी रोजी सुरक्षा दलांनी ऐतिहासिक कामगिरी केली .

Thrill in Bijapur forest, soldiers surround 'Papa Rao' with a reward of Rs 50 lakhs! Two Naxalites killed
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बिजापूर जिल्ह्यात १७ जानेवारी रोजी सुरक्षा दलांनी ऐतिहासिक कामगिरी केली . माओवाद्यांच्या दक्षिण बस्तर विभागाचा अत्यंत क्रूर चेहरा आणि ५० लाखांचे बक्षीस असलेला जहाल कमांडर पापा राव याला सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात घेरले आहे. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या या भीषण चकमकीत आतापर्यंत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले असून घटनास्थळावरून दोन ए-के ४७ रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
इंद्रावती नॅशनल पार्कच्या जंगलात पापा राव आपल्या साथीदारांसह लपल्याची अचूक माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीआरजी, एसटीएफ आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने पहाटेपासूनच परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. जवानांची चाहूल लागताच नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला, मात्र सतर्क जवानांनी चोख प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांची कोंडी केली.
पत्नीच्या मृत्यूनंतर होता रडारवर!
पापा राव हा माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या जवळचा मानला जातो. काही महिन्यांपूर्वी त्याची पत्नी उर्मिला ही देखील एका चकमकीत मारली गेली होती. तेव्हापासून पापा राव बिजापूरच्या याच दुर्गम भागात सक्रीय होता. त्याला पकडणे किंवा कंठस्नान घालणे हा बस्तरमधील नक्षलवादाचा कणा मोडण्यासारखे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नक्षलवादाचा अंत जवळ?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ पर्यंत देश संपूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने सुरू असलेल्या मोठ्या कारवायांमध्ये आजची ही चकमक अत्यंत निर्णायक मानली जात आहे. अद्यापही गोळीबार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.