'मी शस्त्र सोडले, विचार नाही' शरणागतीनंतर 'देवजी'ची भूमिका ; राजकारणात सक्रिय होण्याचेही संकेत
By संजय तिपाले | Updated: February 24, 2026 18:01 IST2026-02-24T17:59:35+5:302026-02-24T18:01:18+5:30
Gadchiroli : जहाल नक्षलवादी नेता आणि प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) संघटनेचा सर्वोच्च म्होरक्या थीप्पीरी तिरुपती ऊर्फ 'देवजी' याने आपल्या तीन प्रमुख सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर २४ फेब्रुवारी रोजी आत्मसमर्पण केले.

'I gave up my arms, no thoughts': 'Devji's' role after surrender; Signs of becoming active in politics
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जहाल नक्षलवादी नेता आणि प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) संघटनेचा सर्वोच्च म्होरक्या थीप्पीरी तिरुपती ऊर्फ 'देवजी' याने आपल्या तीन प्रमुख सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर २४ फेब्रुवारी रोजी आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पणानंतर माध्यमांशी बोलताना देवजीने 'मी शस्त्र सोडले, विचार नाही', असे सांगून कायद्याच्या चौकटीत राहून जनतेच्या हक्कासाठी लढणार असल्याचे स्पष्ट केले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगून तो म्हणाला भविष्यात आवश्यकता भासली तर राजकारणातही सक्रिय होणार आहे. दरम्यान, माओवाद्यांचा सर्वोच्च नेता देवजी याने आत्मसमर्पण केल्याची माहिती दोन दिवसांपूर्वीच आली होती. २४ रोजी तेलंगणा पोलिसांनी त्याच्या आत्मसमर्पणाचा खुलासा केला.
हैद्राबाद येथे पोलिस महासंचालक बी. शिवधर रेड्डी, सहायक पोलिस महासंचालक महेश भागवत यांच्यापुढे त्याने आपल्या तीन सहकाऱ्यांसह शरणागती पत्करली. देवजीसोबत केंद्रीय समिती सदस्य मल्ला राजी रेड्डी उर्फ संग्राम , बडे चोक्काराव उर्फ दामोदर आणि नुन्ने नरसिंंहा रेड्डी उर्फ गंगन्ना यासारख्या जहाल नेत्यांनीही शस्त्रे खाली ठेवली आहेत. मे २०२५ मध्ये प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) संघटनेचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ बसवाराजू याला छत्तीसगडमध्ये चकमकीत ठार केल्यानंतर देवजीची सर्वोच्च नेतेपदी वर्णी लागली होती. मूळचा तेलंगणातील करिमनगरचा रहिवासी असलेला देवजी हा चार दशकांपासून माओवादी चळवळीत सक्रिय होता, सदस्य ते महासचिव असा त्याचा प्रवास राहिला. बंदुुकीच्या जोरावर सशस्त्र क्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्या देवजीने दंडकारण्यात हिंसक कारवायांच्या जोरावर दहशत निर्माण केली होती. मात्र, आता त्याच्या शरणागतीमुळे नक्षल चळवळ पूर्णपणे नेतृत्वहीन झाली आहे.
जुन्या प्रकरणांचा मास्टरमाईंड
१९९१ मध्ये आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे सिनेस्टाईल अपहरण ,१९८२ मध्ये गडचिरोलीत पहिलाभूसुरुंग स्फोट घडवून त्याने ११ जवानांचा बळी घेला होता. २००७ मध्ये राणी बोदली कॅम्प येथे ५५ जवानांची त्याने निर्घृण हत्या केली होती. २०१० मध्ये दंतेवाडा येथील ताडमेटला भूसुरुंग स्फोटात सीआरपीएफचे ७६ जवान शहीद झाले होते. २०१३ मध्ये छत्तीसगडच्या झिरमा घाटीत काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर त्याने हल्ला केला होता.
माओवाद्यांचा ओसरला प्रभाव
गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांनी राबविलेली मोहीम आणि नक्षलवाद्यांमधील अंतर्गत मतभेद यामुळे वरिष्ठ नेते हतबल झाले आहेत. देवजीच्या या पावलामुळे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांतील नक्षलवादाचा प्रभाव आता नाममात्र उरण्याची शक्यता आहे. गडचिरोलीत केवळ सहा माओवादी शिल्लक आहेत.
आता दोन टॉप नेते रडारवर
माओवादी चळवळीतील क्रमांक दोनचा नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याने ऑक्टोबर २०२५ मध्ये गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर सर्वोच्च नेता थिप्पीरी तिरुपती उर्फ देवजी व केंद्रीय समिती सदय्य माडवी हिडमा हे दोन प्रमुख नेते होते. हिडमाचा चकमकीत खात्मा झाला, आता देवजी शरण आला, त्यामुळे केंद्रीय समिती खिळखिळी झाली आहे. सध्या केवळ मुप्पाला लक्ष्मण राव उर्फ गणपती व मिशीर बेसरा हे दोनच मोस्ट वाँटेड नेते शिल्लक आहेत, यापैकी गणपती हा फिलीपाईन्समध्ये पळून गेल्याचे सांगितले जाते तर मिशीर बेसरा हा देखील भूमिगत आहे.
"मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद मुक्त भारताचे जे स्वप्न केंद्र सरकारने पाहिले आहे, त्या दिशेने हे एक मोठे यश मानले जात आहे. तेलंगणात तीन वर्षांत एकूण ५९१ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. आता केवळ ११ माओवादी सक्रिय असून लवकरच ही चळवळ इतिहासजमा होईल. "
- बी. शिवधर रेड्डी, पोलिस महासंचालक, तेलंगणा