'नासा', 'आरबीआय'च्या नावे साडेसहा लाखांची फसवणूक; कोट्यवधींच्या आमिषाने आदिवासी शेतकऱ्याला लुटले
By संजय तिपाले | Updated: April 10, 2026 20:17 IST2026-04-10T20:17:02+5:302026-04-10T20:17:58+5:30
Gadchiroli : अमेरिकेतील 'नासा' कंपनीला दुर्मिळ धातू विकून त्यातून मिळणारे २ लाख ३० हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँकेतून काढून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला ६ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार एटापल्ली येथे ९ एप्रिल रोजी उघडकीस आला आहे.

Fraud of Rs 6.5 lakhs in the name of 'NASA', 'RBI'; Tribal farmer robbed with the lure of crores
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अमेरिकेतील 'नासा' कंपनीला दुर्मिळ धातू विकून त्यातून मिळणारे २ लाख ३० हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँकेतून काढून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला ६ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार एटापल्ली येथे ९ एप्रिल रोजी उघडकीस आला आहे. या प्रकरणी आदिवासी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरुन दोघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, पैमा (ता. एटापल्ली) येथील कोलु वंज्या तलांडी (४२) यांना त्यांच्याच गावातील रमेश रैनू तलांडी याने सुरेंद्र पांडुरंग मडावी (रा. येमली ता. एटापल्ली) याच्या योजनेबाबत सांगितले. सुरेश मडावी याने तक्रारदाराला विश्वासात घेऊन सांगितले की, छत्तीसगडमधील सर्गुजा येथील शिवकुमार नामक व्यक्तीला 'कोसमस मेटल'चा ६ किलो वजनाचा दुर्मिळ खडा मिळाला असून, तो अमेरिकेतील नासा कंपनीला विकला आहे. त्याचे तब्बल २ लाख ३० हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँकेत जमा आहेत. मात्र, हे खाते 'ब्लॉक' झाले असून ते सुरू करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे भासवले.
कथित योजनेचा असा रचला सापळा
मुख्य सूत्रधार वासुदेव गिल्ला वड्डे (रा. भामरागड) हा या कामासाठी पैसे गोळा करत असल्याचे मडावीने सांगितले. जर आता ५५ हजार रुपये भरले, तर काम पूर्ण झाल्यावर ४० कोटी रुपये मिळतील, असे मोठे आमिष तलांडी यांना दाखवण्यात आले. जुन्या मैत्रीचा फायदा घेत आरोपींनी तक्रारदाराकडून ७ मार्च २०२५ रोजी ५५ हजार रुपये व कागदपत्रे घेतली. त्यानंतर 'आरबीआय'कडून गिफ्ट म्हणून गाडी मिळणार असल्याचे सांगून पुन्हा १० हजार रुपये उकळले. आरोपींचा शोध सुरु असल्याचे उपअधीक्षक चैतन्य कदम यांनी सांगितले.
व्हीआयपी नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे जाळे
आरोपींनी 'व्हीआयपी' नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यात ११६ सदस्यांना जोडले होते. या ग्रुपच्या माध्यमातून वेळोवेळी आरबीआय गव्हर्नरला भेटायला दिल्ली, कोलकात्याला जायचे आहे, असे सांगून २ ते १५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम अनेक वेळा उकळली. दिवाळीदरम्यान मरपल्ली रोडवरील एका शेतात १०० लोकांची बैठक घेऊन आरोपी वासुदेव वड्डे याने 'डिसेंबरपर्यंत तुम्ही करोडपती व्हाल' असे सांगून पुन्हा पैसे गोळा केले.
ग्रुपमधून रिमुव्ह करताच फसवणूक उघड
तक्रारदाराने जेव्हा आपल्या ६ लाख ५० हजार रुपयांचा हिशोब विचारला, तेव्हा आरोपींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तू लोकांना भडकवत आहेस, तुझे पैसे परत मिळणार नाहीत, असे धमकावून त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर काढले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कोलु तलांडी यांनी एटापल्ली पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. त्यानुसार सुरेंद्र मडावी व वासुदेव वड्डे यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
आणखी तक्रारदार पुढे येण्याची शक्यता
तक्रारदाराप्रमाणेच इतर १०० हून अधिक लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिझर्व्ह बँक किंवा कोणतीही सरकारी संस्था अशा प्रकारे पैसे मागत नाही. दुर्मिळ धातूसारख्या योजनांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.