मदतीसाठी नुकसानग्रस्त संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:00:38+5:30
गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी सरासरी पावसाच्या सुमारे १३२ टक्के पाऊस पडला आहे. पाच ते सहा वेळा पूर आल्याने अनेकांचे पीक वाहून गेले आहे. इतरही पिकांच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. अशा परिस्थितीत शासन गडचिरोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र अजूनपर्यंत ओला दुष्काळ जाहीर केला नाही.

मदतीसाठी नुकसानग्रस्त संभ्रमात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिके व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अजूनपर्यंत काही तलाठी प्रत्यक्ष नुकसान झालेल्या ठिकाणी पोहोचले नसल्याने पंचनामे होऊ शकले नाही. त्यामुळे आपल्याला मदत मिळणार की नाही, असा संभ्रम नुकसानग्रस्तांमध्ये निर्माण झाला आहे.
जवळपास दीड महिना पावसाने गडचिरोली जिल्ह्याला झोडपून काढले. अनेक वेळा पूर आला. काही शेतकऱ्यांनी दोन वेळा धानाची रोवणी केली. दोन्ही वेळचे धान वाहून गेले. त्यामुळे सदर शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने तो कर्जबाजारी होणार आहे. तसेच काही शेतकऱ्यांचे जमीन खरडून गेली. तर काही धानाच्या बांध्यांमध्ये गाळ साचले आहे. पुढील वर्षी या ठिकाणी पिकांची लागवड करायची असेल तर गाळ उपसावा लागणार आहे. यासाठी शेतकऱ्याला अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. पावसामुळे यावर्षी हजारो हेक्टरवरील धानपीक वाहून गेले आहे. सातत्याने पाऊस पडत असल्याने सोयाबिन, कापूस, तूर या पिकांचेही उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. पाऊस संपताच पंचनामे करण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी अजूनपर्यंत तलाठी प्रत्यक्ष बांधावर पोहोचले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.
ओला दुष्काळही जाहीर केला नाही
गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी सरासरी पावसाच्या सुमारे १३२ टक्के पाऊस पडला आहे. पाच ते सहा वेळा पूर आल्याने अनेकांचे पीक वाहून गेले आहे. इतरही पिकांच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. अशा परिस्थितीत शासन गडचिरोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र अजूनपर्यंत ओला दुष्काळ जाहीर केला नाही. त्यामुळे शासनाकडून जी मदत मिळायला हवी, ती मिळण्याची आशा कमी झाली आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.