लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या वीज ग्राहकांना मोठ्या आर्थिक भुर्दंडासह अंधारात राहण्याची शिक्षा भोगावी लागते. चोरी केलेल्या विजेपेक्षा पाचपट अधिक रक्कम दंड भरण्यासह शिक्षादेखील होऊ शकते. वीज मीटरमध्ये फेरफार केल्याची गेल्या वर्षभरात जवळपास ५० प्रकरणे आढळली आहेत. त्यांच्यावर लाखाे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे आणि तो वसूलही केला आहे.वीज कलम कायदा १२६ नुसार वीजचोरीसाठी जी कारवाई होते तीच मीटर फेरफार केल्यानंतर होते. ‘महावितरण’चे भरारी पथक कधीही येऊन मीटर तपासणी करू शकतात, याचसाठी विजेचे मीटर घरात न ठेवता बाहेर, दर्शनी बाजूला लावावे असे धोरण आहे.
दंडाची रक्कम भरण्यासाठी मुदतमीटरमधील फेरफार महावितरणच्या निदर्शनास आल्यास तात्पुरती दंडाची रक्कम भरण्याचे आदेश संबंधित ग्राहकाला नोटीस काढून दिले जातात. ग्राहकाला जर ही रक्कम मान्य असेल तर ती भरण्यास सात दिवसांची मुदत दिली जाते, परंतु यात रकमेबद्दल काही आक्षेप असतील तर तो ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांसमोर आक्षेप मांडू शकतो. ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच दंडाच्या रकमेसंबंधीचा अंतिम आदेश अधिकारी देतात. हा आदेश देण्यासाठीही त्यांना तीन दिवसांचे बंधन घालण्यात आले आहे.
वीजचोरीसाठी अशीही चलाखीमहावितरणला आपण बिल देतोय म्हटल्यावर ती आपली मालकी आहे, असा ग्राहकांचा समज असतो पण विजेच्या वायरमध्ये देखील काही फेरफार करायचा म्हटला तर तो ‘महावितरण’ला कळवावा लागतो. मीटरला तर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही हात लावू शकत नाही, पण तरीदेखील मीटरमधील वायरीत फेरफार करण्यासाठी चुंबक आणि नाण्याचा वापर करून वीजमीटरचा वेग नियंत्रित केला जातो. त्यातून महावितरणची फसवणूक केली जाते. काही वीज चाेरटे तर रिमाेटच वापरत असल्याचे आढळून आले आहे.
मीटर जप्ती आणि आर्थिक दंडहीमीटरमध्ये फेरफार केल्याचे तपासणी दरम्यान आढळून आल्यास महावितरणकडून कठोर कारवाई होते. संबंधित ग्राहकाकडे असणारी वीज उपकरणे, त्याचा सरासरी वापर हे पाहून त्याच्या चार ते पाचपट दंडाची आकारणी होते शिवाय वीज चोरी केल्याबद्दल गुन्हाही दाखल केला जातो. तपास हाेऊन दंड भरेपर्यंत वीजपुरवठा खंडित केला जाते. त्यामुळे ताेपर्यंत अंधारातच राहावे लागते.