रोजगारासाठी आणले अन् मृतदेहच धाडला; कर्नाटकच्या चालकाची आत्महत्या नव्हे हत्या !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:19 IST2026-03-13T18:15:59+5:302026-03-13T18:19:21+5:30
Gadchiroli : मजुरीच्या कामासाठी महाराष्ट्रात आणलेल्या कर्नाटकच्या एका ४० वर्षीय चालकाचा आरमोरी तालुक्यातील टेंभा येथे संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Brought for employment and sent the body; Karnataka driver's suicide not murder!
गडचिरोली : मजुरीच्या कामासाठी महाराष्ट्रात आणलेल्या कर्नाटकच्या एका ४० वर्षीय चालकाचा आरमोरी तालुक्यातील टेंभा येथे संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंगोद सरकार असे मृताचे नाव असून, ही 'डिहायड्रेशन'मुळे झालेली आत्महत्या नसून नियोजित हत्या असल्याचा खळबळजनक आरोप मृताच्या पत्नीने केला आहे. या प्रकरणी कर्नाटकात शून्यने वाहनमालकावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला, तो १२ मार्च रोजी आरमोरी पोलिसांकडे वर्ग झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील सिंधनूर येथील रहिवासी असलेले अंगोद सरकार हे दीपंकर प्रशांत सरकार याच्याकडे चालक म्हणून कामाला होते. १८ जून २०२५ रोजी दीपंकरने अंगोश यांना आरमोरी तालुक्यातील मजूर आणण्यासाठी सोबत नेले. २१ जून २०२५ रोजी पहाटे अंगोद यांनी पत्नी फुलमती यांना फोन करून, मला आरमोरी तालुक्यातील टेंभा येथील एका व्यक्तीकडे सोडून दीपंकर निघून गेला आहे आणि संबंधित व्यक्ती मला जाऊ देत नाही, अशी आपबिती सांगितली होती. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला.
अंगावरील जखमांनी घातपाताचा संशय
२२ जून २०२५ रोजी अंगोद यांचा मृतदेह शेतात आढळून आला. आरमोरी पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाचा हवाला देत हा मृत्यू शरीरातील पाणी कमी झाल्याने झाल्याचे सांगितले. मात्र, मृताच्या नातेवाईकांनी मृतदेहाचे फोटो आणि व्हिडिओ काढले असता, त्यांच्या पाठीवर, हाता-पायांवर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. जर हा मृत्यू नैसर्गिक होता, तर या जखमा आल्या कुठून? असा संतप्त सवाल पत्नी फुलमती सरकार यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे सुरुवातीला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा निरोप गावी धाडण्यात आला होता.
न्यायासाठी पत्नीची धडपड
पीडित पत्नीने आता कर्नाटकच्या सिंधनूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आपल्या पतीची हत्या करून पुरावे नष्ट करण्यात आल्याचे म्हटले आहे. आरमोरी पोलिसांनी या प्रकरणाचा आता पुन्हा तपास सुरु केला आहे.
"कर्नाटक पोलिसांकडून गुन्हा तपासकामी वर्ग झाला आहे. त्यानुसार या प्रकरणाचा पुन्हा सखोल तपास केला जाईल. योग्य ते पुरावे व साक्षीदार तपासून तथ्य शोधण्याचा प्रयत्न केला जाईल."
- कैलास गवते, पो.नि. आरमोरी ठाणे