चहात साखर नेमकी कधी घालायची? वेळ महत्त्वाची, बनेल एकदम फक्कड चहा, चव अशी येईल की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:10 IST2026-03-20T13:07:35+5:302026-03-20T13:10:48+5:30
Lifestyle Kitchen Tricks And Tips: टपरीवर मिळतो, ती चव घरातील चहाला येत नाही, असे अनेकांचे म्हणणे असते. चहा करताना साखर टाकायची वेळ महत्त्वाची मानली जाते. तुम्ही चहात कधी साखर घालता?

चहात साखर नेमकी कधी घालायची? वेळ महत्त्वाची, बनेल एकदम फक्कड चहा, चव अशी येईल की...
Lifestyle Kitchen Tricks And Tips: भारतात कोट्यवधि लोक चहा वेडे आहेत. चहासाठी कुठेही जाऊ शकतात. अनेकांना तर कधीही चहा लागतो. रात्री अडीच वाजता, दुपारी अडीच वाजता, सकाळी ११ वाजता, रात्री १० वाजता असे कोणत्याही वेळेस चहा पिणारे लोक आहेत. तर, दिवसातून दर एक-दोन तासांनी चहा पिणारेही लोक आहेत. चहा प्यायला लोक कितीही किलोमीटर आणि कुठेही जायला तयार असतात. परंतु, अनेकदा साध्या टपरीवर जो चहा मिळतो, तो घरात होत नाही, असा अनेकांचा अनुभव असतो.
रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवरचा एक घोट थकवा दूर करण्यास मदत करू शकतो. अंदाजे ७५-८० टक्के भारतीय कुटुंबे नियमितपणे चहा पितात. २०२५ च्या एका सर्वेक्षण-आधारित अभ्यासात असे आढळून आले की, ६५ टक्क्यांपेक्षा जास्त भारतीय नागरिक दररोज चहा पितात, तर उर्वरित नागरिक क्वचितच किंवा अजिबात चहा पीत नाहीत. यावरून भारतात चहाच्या लोकप्रियतेची कल्पना येते. आपण घरी कितीही मेहनत घेतली तरी, चहाच्या टपरीसारखा गोडवा आणि समतोल साधता येत नाही.
चहामध्ये साखरेचीही महत्त्वाची भूमिका असते
चहा उकळवल्याने तो अधिक चांगला होतो किंवा चहात मसाला घातल्याने त्याची चव वेगळी होते, असे अनेक प्रयोग करून पाहिले जातात. पण वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे. चहा बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, जी वर्षानुवर्षे चहा विकणाऱ्या अनेकांना चांगलीच ठाऊक असते. अनेक टपरींवर केवळ चहासाठी अनेक लोकांची लांबच लांब रांग लागते. टपरीवरील काही चहावाल्यांच्या म्हणण्यांनुसार, वेलची आणि चहापत्ती यांच्यासोबतच चहामध्ये साखरेचीही महत्त्वाची भूमिका असते. योग्य वेळी साखर घातल्याने चहाची चव वाढते.
जास्त वेळ उकळल्याने एक विचित्र कडूपणा येतो
बहुतेक घरांमध्ये, पाणी उकळताच त्यात चहापत्ती आणि साखर घातली जाते. रस्त्यावरील विक्रेते सांगतात की, ही एक मोठी चूक आहे. साखर नेहमी शेवटी घालावी. चहा पूर्णपणे उकळून त्याला दुधाळ रंग आल्यानंतरच साखर घातली जाते. परंतु, काहींच्या म्हणण्यांनुसार, चहाच्या पानांसोबत साखर जास्त वेळ उकळल्याने त्यात एक विचित्र कडूपणा येतो, जो चहाची चव बिघडवू शकतो. जेव्हा तुम्ही साखर लवकर घालता, तेव्हा ती चहाच्या पानांमधील टॅनिनसोबत रासायनिक अभिक्रिया करते. जास्त वेळ भिजवल्याने साखर जळू शकते, ज्यामुळे चहा जास्त उकळल्यासारखा वाटू शकतो.
चहाचा गोडवा टिकून राहतो
टपरीवर पाण्यात चहाची पाने, आले आणि मसाले उकळले जातात, नंतर त्यात दूध घालून उकळी आणली जाते. चहा पिण्यासाठी तयार झाल्यावर त्यात साखर घालून मंद आचेवर उकळी आणली जाते. यामुळे चहाचा गोडवा टिकून राहतो आणि चहा कडू होत नाही. साखरेव्यतिरिक्त रस्त्याच्या बाजूला टपरीवर मिळणाऱ्या चहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी वापरला जाणारे भांडे आणि आच.
टपरीवर मिळणाऱ्या चहाची चव घरच्या चहाला कशी येईल?
हा चहा एका मोठ्या लोखंडी किंवा पितळी पातेल्यात हळूहळू उकळला जातो. घरीही तशीच चव हवी असल्यास, पाणी उकळत असताना त्यात ठेचलेले आले घाला. चहापत्ती घातल्यानंतर झाकण ठेवून २ मिनिटे उकळू द्या, मग दूध घाला. शेवटी साखर घालून गॅस बंद करा. यामुळे तुम्हाला तुम्ही जात असलेल्या टपरीवरील चहाची नक्कीच आठवण येईल.