World Environment Day : पर्यावरणाची अधोगती ठरतेय घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 10:17 AM2020-06-05T10:17:41+5:302020-06-05T10:29:25+5:30

एकेकाळी दंडाकारण्य अशी ओळख मिरविणाऱ्या नाशिकची अवस्था मागील वीस वर्षांत इतिहासजमा झाली. जमिनीची धूप आणि तापमान वाढत गेले. पर्जन्यमानाचा समतोलही बिघडला अशा अनेक पर्यावरणीय समस्यांना दुर्दैवाने नाशिककरांनाही आता तोंड द्यावे लागत आहे. पर्यावरणाची अधोगती रोखण्यासाठी नागरिकांनी स्वार्थी विचार बाजूला सारणे गरजेचे आहे.

Environmental degradation is dangerous | World Environment Day : पर्यावरणाची अधोगती ठरतेय घातक

World Environment Day : पर्यावरणाची अधोगती ठरतेय घातक

googlenewsNext

अझहर शेख

नाशिकनाशिकच्या हवामानापासून तर गोदावरी नदीपर्यंत या मागील वीस वर्षांमध्ये कमालीचा बदल झालेला दिसून येतो. हवामान तज्ज्ञांच्या मते नाशकात या वीस वर्षांमध्ये हवेची गुणवत्ता अधिकाधिक खराब होत गेली. तसेच वायू, ध्वनी प्रदूषणातही भर पडली. जल तज्ज्ञांच्या मते जलप्रदूषण रोखण्यास या कालावधीत नाशिककरांसह यंत्रणा अपयशी ठरली.

नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर गोदावरीचे  उगमस्थान असून नाशिकचे अस्तित्व व ओळख देशभरात ज्या गोदावरीमुळे आहे, त्या गोदावरीची घुसमटदेखील जन्मस्थळापासूनच सुरू होते. गोदावरी प्रदूषण थेट न्यायालयात पोहचले असले तरीदेखील शासकिय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना गोदावरी नदी संवर्धनाबाबत ठोस उपाययोजना करण्याबाबत या मागील वीस वर्षांत फारसे यश आलेले नाही. परिणामी गोदेची अवस्था तर बिकट होतच गेली मात्र तिच्या उपनद्याही संकटात सापडल्या. सर्रासपणे शहरातील मैला वाहून नेणारी मलवाहिनी अशी सध्या गोदावरीची अवस्था झाली आहे, असे म्हणणे चुकीचे होणार नाही.

जैवविविधता विकसित होत असताना वाढत्या शहरीकरणांतर्गत होणाऱ्या रस्ते विकासांमुळे येथील निसर्गाला हानी पोहचण्यास सुरुवात झाली. मागील पंधरा वर्षात यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले. निसर्गाची हानी रोखण्यासाठी शाश्वत विकासाची कास धरण्यास शासकिय व राजकिय इच्छाशक्ती अपुरी पडली. गावाबाहेरील खुरट्या जंगलात राहणारा बिबट्या आता शहराजवळील मळे भागात ऊसशेतीत आश्रयाला आला अन् शेवटी दोषीही तोच ठरविला जातो, अशी खंत वन्यजीवप्रेमी वैभव भोगले यांनी व्यक्त केले.

वीस वर्षांपुर्वी शहराच्या अवतीभोवती वृक्षराजी बहरलेली दिसत होती ती आता बरीच नाहीसी झाली आहे. शहालगत जंगलांची वाढ चांगली होती. शेतीचा हरित पट्टाही प्रचंड विस्तारलेला दिसत होता. सिमेंट-कॉँक्रीटचे जंगल मर्यादित होते. सीबीएस ते मुंबईनाक्यापर्यंतचा परिसरसुध्दा त्यामुळे शहराचे तापमान उन्हाळ्यात कधीही ३७अंशाच्या पुढे सरकले नाही; मात्र मागील सहा ते सात वर्षांमध्ये या तापमानाने चाळीशीही पार केल्याच्या नोंदी आहेत. नुसती हिरवळ आणि पर्यावरणपुरक वृक्षांची लागवड यामध्ये फरक आहे, हा फरक जोपर्यंत समजून घेतला जात नाही, तोपर्यंत जमिनीची धूप कमी होऊन  पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही, असे मत वृक्ष अभ्यासक शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

सन २००० ची स्थिती

१. २००५ सालानंतर पर्ज्यन्यमान शहरासह जिल्ह्यात घसरले.

२. शहर व जिल्ह्यातून निसर्गाचा सफाई कामगार गिधाड नाहीसा झाला.

३. गोदाकाठी तसेच शहराच्या अवतीभोवती समृध्द पक्षीजीवन पाहावयास मिळत होते.

४.२०१२ पासून सातत्याने उन्हाळ्यात कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार सरकला.

५.मलनिस्सारण केंद्रांची संख्या तोकडी आणि अवस्था बिकट. परिणामी गोदा प्रदूषणाचा स्तर उंचावला.

६. २००५ साली एफएसआयच्या अहवालानुसार जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत केवळ ७.१८ टक्के वनाच्छादन होते.



सध्याची स्थिती

१. २०१७ सालापासून पर्जन्यमानात काहीशी सुधारणा झाली; मात्र असमतोल जैसे-थे.

२. २०१२ सालापासून जिल्ह्यात गिधाडे पुन्हा दिसू लागली.

३. पक्ष्यांना निवारा व खाद्य देणारी वृक्ष प्रजाती कमालीची घटल्याने पक्षीजीवन धोक्यात आले.

४. गेल्या सात वर्षातील सर्वाधिक ४२.८ इतक्या तापमानाची नोंद मागील वर्षी झाली तर यंदा १५ एप्रिल रोजी ४०.५ अंश तापमान नोंदविले गेले.

५. नवीन मलनिस्सारण केंद्र अस्तित्वात आले; मात्र जुनाट यंत्रणा जैसे-थे.

६. २०१७-२०१९ सालचा एफएसआयने यावर्षी प्रसिध्द केलेल्या अहवालात एकूण वनाच्छादन केवळ ६.९३ टक्के आहे. २०१७ साली ८.५५ टक्के इतके होते.

गोदावरीचे प्रदूषण रोखण्यास अद्याप  यश आलेले नाही तर तीच्या उपनद्यांच्या अवस्थेबाबत न बोललेलेच बरे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी शासकिय धोरणांचा अभाव प्रकर्षाणे जाणवतो. मागील वीस वर्षांत नदीकाठालगत झालेला एकतर्फी विकास पर्यावरणाला हानीकारक ठरत आहे. गोदावरीच्या उगमस्थानापासूनच तीची घुसमट सुरू होते, हे दुर्दैवच

- डॉ. प्राजक्ता बस्ते, नदी अभ्यासक

Web Title: Environmental degradation is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.