दुसरी ते आठवीच्या परीक्षा २२ एप्रिलपर्यंतच;वार्षिक परीक्षा व असेसमेंट टेस्टचे वेळापत्रक जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:33 IST2026-03-12T13:32:47+5:302026-03-12T13:33:31+5:30
राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा यंदा २२ एप्रिलपर्यंत संपणार आहेत.

दुसरी ते आठवीच्या परीक्षा २२ एप्रिलपर्यंतच;वार्षिक परीक्षा व असेसमेंट टेस्टचे वेळापत्रक जारी
मुंबई : राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा यंदा २२ एप्रिलपर्यंत संपणार आहेत. पिरियॉडिक असेसमेंट टेस्ट (पॅट)अंतर्गत तीन विषयांचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले असून, इतर विषयांच्या परीक्षांचे नियोजन शाळांनी आपल्या स्तरावर करावे, असे निर्देश संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांनी मंगळवारी सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी व शाळांना दिले.
यंदाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात शाळांना काही प्रमाणात स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाने केला आहे. शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी याबाबत पंधरा दिवसांपूर्वीच अशी मागणी केली होती. नियतकालिक चाचणी (पॅट) ११, १५ व २२ एप्रिल रोजी होणार आहे. या चाचणीत प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम) आणि तृतीय भाषा इंग्रजी (इंग्रजी माध्यम वगळून) या विषयांचा समावेश आहे.
मुख्याध्यापकांच्या मागणीचा विचार करून गतवर्षी २५ एप्रिलपर्यंत लांबलेले वेळापत्रक यंदा २२ एप्रिलपर्यंत ठेवले. भाषा, इंग्रजी व गणित या विषयांचेच वेळापत्रक देण्यात आले असून, इतर विषयांच्या परीक्षा शाळास्तरावर घेणे सोयीचे ठरेल.
महेंद्र गणपुले,
माजी अध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना
इयत्तानिहाय विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात काय समजले किंवा नाही, याची पडताळणी या नियतकालिक चाचण्यांतून होते. मात्र, ही बोर्ड परीक्षा नसल्याने विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण देऊ नये.
डॉ. हेमंत वसेकर, संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद
विद्यार्थ्यांसाठी लेखी, तोंडी स्वरूपातील परीक्षा
इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लेखी व तोंडी स्वरूपातील परीक्षा घेतल्या जाणार आहेत. गुणांचे विभाजनही इयत्तानिहाय निश्चित करण्यात आले आहे. इयत्ता दुसरीसाठी ३० गुण, तिसरी व चौथीसाठी ४० गुण, पाचवी व सहावीसाठी ५० गुण तर सातवी व आठवीसाठी ६० गुणांची नियतकालिक चाचणी होणार आहे.
नियतकालिक चाचण्यांचा उद्देश नेमका काय?
- विद्यार्थ्यांना काय समजले व काय राहिले याचा अंदाज घेणे.
- शिक्षकांचे शिकवणे आणि विद्यार्थ्यांचे शिकणे ही प्रक्रिया अधिक सुलभ करणे.
- संकल्पनात्मक बोधासाठी कोणत्या बाबींवर भर द्यायचा हे स्पष्ट करणे.
- मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी अचूक आढावा घेणे हा उद्देश यामागे आहे.