आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 06:23 IST2025-06-20T06:22:28+5:302025-06-20T06:23:14+5:30
Maruti Chitampalli Passes Away: ‘आयुष्यात सारे काही भरून पावलो, आता कोणतीही आसक्ती उरलेली नाही, आनंदाने मुक्त होऊ द्या’, असे म्हणत त्यांनी निरोप घेतला.

आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
शहरी प्रदूषणापासून मुक्त अशी शुद्ध हवा वर्षानुवर्षे फुप्फुसात भरून घेतलेले, जंगलवाटांच्या चढउतारावर पायाच्या पिंडर्या मजबूत झालेले अरण्यऋषी मारुती चितमपल्ली नक्कीच शतायुषी होतील, असे वाटत असताना बुधवारी रात्री त्यांचे प्राणपक्षी उडाले. चाहत्यांना, वाचकांना, निसर्गप्रेमींना त्यांनी चकवा दिला. ‘आयुष्यात सारे काही भरून पावलो, आता कोणतीही आसक्ती उरलेली नाही, आनंदाने मुक्त होऊ द्या’, असे म्हणत त्यांनी निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने निसर्ग व माणूस एकत्र गुंफणाऱ्या एका पर्वाची अखेर झाली आहे.
नऊ दशकांहून थोड्या अधिक आयुष्यातील सात दशके चितमपल्लींनी निसर्गनिरीक्षण व अध्ययनाची तपश्चर्या केली. संस्कृत साहित्यातील पौराणिक कथा अभ्यासल्या आणि त्यानंतर लहान मुलाच्या उत्साहाने अनुभवकथन केले. अशा चालत्याबोलत्या निसर्गकोशाचे शेवटचे पान उलटले गेले आहे.१९८३ साली म्हणजे वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर त्यांचे ‘पक्षी जाय दिगंतरा’ हे पुस्तक आले आणि त्यानंतरही डझनावारी पुस्तके, वनोपनिषदे, झाडे-पक्षी-प्राणी-मासे आदींचे धीरगंभीर कोश अशी समृद्ध ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली.
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, पद्मश्रीसह कित्येक पुरस्कार, अनेक मानमरातब देऊन त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न झाला. तथापि, मिश्रभाषिक सोलापूरमध्ये जन्मलेल्या मारुती चितमपल्ली यांनी मराठी साहित्याला, मराठी संस्कृतीला, महाराष्ट्राला इतके भरभरून दिले की, आपण पूर्णांशाने उतराई होऊच शकणार नाही. कोईमतूर, डेहराडून येथे प्रशिक्षणानंतर चितमपल्ली वनखात्यात दाखल झाले, विदर्भात आले आणि विदर्भाचेच होऊन गेले. तो काळ फॉरेस्ट खात्याच्या दहशतीचा होता. अमरावतीचे दिवंगत खासदार सुदामकाका देशमुख सांगायचे तसे आदिवासी माणसे चार पायांच्या वाघांपेक्षा फॉरेस्ट खात्यातील दोन पायांच्या प्राण्यांना घाबरायची. नंतर अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प घोषित होऊ लागले.
देशाच्या वनधोरणाने आदिवासींना जंगलापासून दूर ढकलायला सुरुवात केली. जंगलात आगीचा हाकारा झाला की खरकट्या हाताने ती विझवायला जाणारी आदिवासी संस्कृती क्षीण होऊ लागली. सपाट मैदानातील लोकांनी अवतीभोवतीचे जंगल तोडून विकास नावाच्या विनाशाची वाट धरली. नेमक्या याच काळात सह्याद्रीमधील कर्नाळा, सातपुड्यातील मेळघाट, तसेच नवेगावबांध, नागझिरा अभयारण्यात चितमपल्ली वनाधिकारी होते. त्यांनी त्यांच्या परीने आदिवासी व अरण्याचा सांस्कृतिक सांधा जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला. नवेगावबांधमधील माधवराव पाटील डोंगरवार या वनवेड्या गुरूंकडून जंगल व जंगलवासींचे जगणे समजून घेतले.
स्वत: माधवराव पाटील पट्टीचे शिकारी होते. त्यांना जंगलाच्या सगळ्या खाचाखोचा माहिती होत्या. पूर्व विदर्भातील याच टापूमध्ये चितमपल्ली यांची प्रतिभा बहरली. चितमपल्ली गोष्टीवेल्हाळ होते. तो त्यांचा स्वभाव लिखाणात उमटला. जंगल ते नुसते जगलेच नाहीत तर जंगलजीवनाशी एकरूप झाले. जंगल म्हणजे चितमपल्ली आणि चितमपल्ली म्हणजे जंगल. त्यातील वृक्षराजी, पशुपक्षी, महत्त्वाचे म्हणजे जंगलात राहणारी भोळीभाबडी माणसे. शहरी माणसांना विस्मय वाटावा अशा या साऱ्यांच्या अद्भूत कथा. मेळघाटातील फुलांचा रंग शोषून घेणाऱ्या दवबिंदूंनी बरसलेल्या केशराच्या पावसापासून रानवाटांनी दिलेला चकवा आणि त्या भयकंपित प्रवासातही टिपून घ्यायचे टिपूर चांदणे. वृक्षाच्या उंच टोकावर बसून हिरवे जग न्याहाळणारा सुवर्ण गरूड ते रात्रीच्या अंधारात दबा धरून बसलेला रातवा. साप, बगळ्यांचे विश्व. असे सारे जंगलाचे देणे चितमपल्ली यांनी वाचकांच्या पदरात रिते केले. त्यामागील विज्ञान समजून सांगितले.
रक्तचंदनाच्या झाडामुळे किरणोत्सर्ग कसा रोखला जातो, हे सांगितले. अणूबॉम्बमुळे उद्ध्वस्त झालेल्या जपानमध्ये जाऊन त्या उपायाचा अभ्यास केला. वाघ, रानगव्यांपासून सगळ्या हिंस्त्र श्वापदांच्या सवयी व दैनंदिनी चितमपल्लींमुळेच जंगलाबाहेर कळली.. आणि महत्त्वाचे म्हणजे जंगलात राहणाऱ्या आदिवासींनी हा अनमोल ठेवा पिढ्यानपिढ्या जपल्याची जाणीवही त्यांनी करून दिली. यातून सामान्य लोकांमध्ये निसर्गाचे आकर्षण वाढले. निसर्ग विज्ञानाचे कुतूहल वाढीस लागले. एका मागोमाग एक पिढ्या निसर्गवाचनाकडे वळल्या. वृद्ध आजी-आजोबांचे बोट धरून जंगलातील पायवाटांवरून भटकंती करणाऱ्या बाळगोपाळांची पिढी संस्कारित झाली. चितमपल्ली यांच्या लिखाणाने, शब्दांनी, अनुभवकथनांनी, रानवाटांवरील धुळमाखल्या पावलांनी अनेक पिढ्या वनसंस्कारित केल्या. हे वनसंस्कार वृद्धिंगत करणे, जंगल व त्यात राहणाऱ्या माणसांची काळजी घेणे, हीच मारुती चितमपल्ली यांना खरी श्रद्धांजली!