शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

हे खूनसत्र कोण थांबवील?

By admin | Updated: March 24, 2016 01:20 IST

उत्तर प्रदेशातील दादरी एक छोट्याशा खेड्यात मोहम्मद इकलाख या भारतीय नागरिकाचा, त्याने घरात गोमांस दडविले असल्याचा संशय घेऊन हिंदुत्ववाद्यांच्या एका कडव्या जमावाने निर्घृण खून केला

उत्तर प्रदेशातील दादरी एक छोट्याशा खेड्यात मोहम्मद इकलाख या भारतीय नागरिकाचा, त्याने घरात गोमांस दडविले असल्याचा संशय घेऊन हिंदुत्ववाद्यांच्या एका कडव्या जमावाने निर्घृण खून केला. तो करताना त्याच्या कुटुंबातील इतरांनाही त्याने बेदम मारहाण केली. नंतरच्या चौकशीत इकलाखच्या घरात गोमांस नसल्याचे उघड झाले. मात्र त्याला व त्याच्या कुटुंबातील इतरांना मारणाऱ्यांनी केलेल्या खुनाचा गुन्हा नोंदविला गेल्याचे वा तसली कोणतीही कारवाई झाल्याचे दिसले नाही. राजस्थानच्या चार मुस्लीम विद्यार्थ्यांविषयी नेमका असाच संशय घेऊन हिंदुत्ववाद्यांच्या तशाच जमावाने त्यांना परवा बेदम मारहाण केल्याचे वृत्त प्रकाशित झाले आणि आता आपल्यासोबत म्हशींचा एक छोटा कळप घेऊन जाणाऱ्या दोन गरिबांना (त्यांची वये अनुक्रमे ३५ व १५) हिंदुत्ववाद्यांच्या जमावाने मारहाण करून थेट फासावर टांगल्याची घटना रांचीजवळ घडली. या सगळ्या घटनांमध्ये गोमांस असणे वा नसणे यावर जेवढी चर्चा पूर्वी झाली व आता होईल तेवढी चर्चा अशा जमावांना मारहाणीचा वा एखाद्याला ठार मारण्याचा अधिकार कोणी व कसा दिला या महत्त्वाच्या प्रश्नावर झाली नाही व ती होणारही नाही. सगळ्या प्रश्नांना व त्यावरील चर्चांना असे कमी महत्त्वाच्या बाबींवर थांबवून खुनासारख्या भयावह गोष्टी दुर्लक्षित ठेवण्याची आपल्या माध्यमांची व त्यावरील चर्चकांची भूमिका अशावेळी संशयास्पद, एकारलेली व प्रचारकी झालेली दिसते. माणूस महत्त्वाचा असतो की संशयित मांस? ते कशाचे आहे याची शहानिशा न करताच माणसांचे मुडदे पाडायला जमाव तयार होत असतो तेव्हा त्याला कोणत्या वेडाने ग्रासले असते? त्यात विचार असतो की अविचार आणि आचार असतो की नुसताच अनाचार? जी कामे पोलिसांच्या यंत्रणेने वा न्यायासनाने करायची ती सरळ आपल्या हाती घेऊन मारहाणीपासून मृत्युदंडांपर्यंतच्या शिक्षा निरपराधांना देण्याचा अधिकार असल्या जमावांना कोण देतो? त्यांनी स्वत:च तो आपल्याकडे घेतला असेल तर त्यांना कोणी अडवीत कसे नाही आणि त्यांना अटक करण्याचे काम रेंगाळते तरी कसे? या घटना सुट्या नाहीत आणि त्या एका सूत्राबाहेरच्याही नाहीत. एक टोकाचा विचार, त्याला खतपाणी घालणाऱ्या संघटना, त्या संघटनांच्या बळावर वाढलेला पक्ष आणि त्या पक्षाची सत्ता या साऱ्या गोष्टी त्यामागे असतात. म्हणून मनुष्यवधाचा हा अपराध तो करणाऱ्यांचाच तेवढा नसतो. त्यांच्यामागे उभे असलेल्या विचाराचा, वृत्तीचा, संघटनेचा व तिच्या सत्तेचाही असतो. त्यामुळे एक घटना म्हणून या बाबीचा विचार करता येत नाही, तो घटनाक्रम म्हणूनच विचारात घ्यावा लागतो. त्याचवेळी त्याच्याशी लागेबांधे असणाऱ्या साऱ्यांच्याच मानसिकता त्या संदर्भात पाहायच्या असतात. बाबरी मशिदीच्या विध्वंसापासून सुरू झालेला हा घटनाक्रम ओरिसातील १२०० पूजास्थळे जाळून थांबला नाही. कर्नाटकातील ६०० चर्चेस जमीनदोस्त करून शमला नाही. गुजरातेतील ४०० मशिदी पाडून थांबला नाही. पूजास्थळे, चर्चेस आणि मशिदी यासारख्या गोष्टी अपमानीत करून झाल्या की इतरांचा शोध सुरू होतो. मग गोमांसाचा संशय, एखाददुसऱ्या घोषणेचा संशय आणि पुस्तके-पत्रके-चर्चासत्रे आणि सभासंमेलने अशा साऱ्यांविषयीचा संशय घेणे सुरू होते. यामागचा हेतू दहशत हा असतो. अल्पसंख्याकांमध्ये दहशत, विरोधकांच्या मनात भीती, टीकाकारांच्या मनात भय आणि इतरांच्या मनात काळजी. देश, धर्म, परंपरा, संस्कृती आणि सगळ्या सभ्यतेचे आपणच रखवालदार आहोत आणि बाकी सारे त्यांच्या हननासाठीच जन्माला आले आहेत अशी मानसिकता एकदा अंगी बाणवली की त्यातून असेच एकारलेले हल्लेखोर तयार होतात. हे केवळ आपल्या येथेच होते असे नाही, सारा मध्य आशिया मुस्लीम अतिरेक्यांच्या अशाच अतिरेकाच्या आहारी गेलेला आपण आज पाहात आहोत. डोनाल्ड ट्रम्पच्या रूपाने अमेरिकेसारखा प्रगत व प्रगल्भ लोकशाही देशही या अतिरेकाच्या ताब्यात जातो की काय अशी भीती आता तेथील लोकांनाही वाटू लागली आहे. राजकारणाला धर्मकारण वा वंशकारण चिकटविले की त्याची परिणती अशीच होत असते. आम्ही सोडून बाकीचे सारे देशविरोधी, धर्मविरोधी, समाजविरोधी आणि व्यवस्थाविरोधी आहेत असे ठरविले जाते. अशा एकारलेल्या राजकारणाने विसाव्या शतकात किती देशांचे आणि समाजांचे वाटोळे केले याची साधी भ्रांतही मग राखली जात नाही. राजकारणातले नेते कायद्याची आणि विकासाची भाषा बोलतात. २०२० पर्यंत देशाचा आर्थिक कायापालट होईल असे आपले राज्यकर्ते सांगतात. शहरे व खेडी स्मार्ट करण्याची भाषा बोलतात. त्यांच्या परिवारातल्या आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या माणसांवर मात्र इकलाखच्या खूनाचे आरोप होतात़ गुजरातेतील विद्यार्थ्यांना मारहाण करतात, रांचीजवळ दोघांना फासावर चढवितात, विद्यापीठांशी वैर धरतात, परधर्मीयांची पूजास्थाने जाळतात आणि जमेल तेवढे धर्मद्वेषाचे राजकारण करून देशात बहुसंख्याक व अल्पसंख्याक अशी दुही उभी करण्याच्या योजना आखतात. सामान्य माणसांना अशावेळी पडणारा प्रश्न हा की हे सारे परस्पर संमतीने होत असते की त्यांची वाटचाल व आखणी समांतर असते. खरा प्रश्न, यातून उद््भवणारे खूनसत्र कोण थांबवील हाही आहे.