विशेष लेख: देशात दर साडेआठ लोकांमागे भाजपचा एक माणूस!
By यदू जोशी | Updated: April 11, 2025 06:59 IST2025-04-11T06:58:20+5:302025-04-11T06:59:59+5:30
पंचवीसएक माणसांच्या गर्दीत तुम्ही राजकारणावर काही बोलणार असाल, तर तुमच्याजवळ भाजपची तीन माणसे उभी आहेत हे लक्षात असू द्या!

विशेष लेख: देशात दर साडेआठ लोकांमागे भाजपचा एक माणूस!
यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत |
२०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या होती, ११ कोटी २३ लाख ७४ हजार ३३३. २०२१ मधली अपेक्षित जनगणना कोरोनामुळे झाली नाही आणि आताही लगेच होईल असे वाटत नाही. नेते राज्याविषयी बोलतात तेव्हा प्रत्येकजण वेगवेगळी लोकसंख्या सांगतो. कोणी साडेबारा कोटींचा महाराष्ट्र असे म्हणतो, तर कोणी म्हणतात की तेरा कोटींचा महाराष्ट्र. काहीजण आताशा चौदा कोटींचा महाराष्ट्र म्हणू लागलेत. मध्यबिंदू पकडायचा तर महाराष्ट्राची लोकसंख्या आजच्या घडीला तेरा कोटी धरून चालू. या तेरा कोटींपैकी भाजपचे सदस्य आहेत दीड कोटी. म्हणजे दर साडेआठ माणसांमागे भाजपचा एक माणूस आहे. पंचवीसएक माणसांच्या गर्दीत तुम्ही राजकारणावर काही बोलणार असाल तर तुमच्याजवळ भाजपची तीन माणसे उभी आहेत हे लक्षात ठेवून बोला. शिवाय या तीन माणसांच्या पाठीशी केंद्र आणि राज्याचे सरकार आहे, हेही लक्षात ठेवले पाहिजे.
नोव्हेंबर २०२४ मधल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १४९ जागा लढविल्या आणि १३२ जिंकल्या. भाजपला मते मिळाली होती, १ कोटी ७२ लाख ९३ हजार ६५०. याशिवाय मित्रपक्षांना सोडलेल्या जागांवरही भाजपचा मतदार होताच. म्हणजे किमान २ कोटी भाजप मतदार होते असे मानायला हरकत नाही. भाजपने केलेली दीड कोटी सदस्यसंख्या लक्षात घेता आपल्या मतदारांपैकी ७५ टक्के मतदारांना पक्षाचे सदस्य करवून घेण्यात पक्षाला यश आले. म्हणजे मिळाली ती मते केवळ ईव्हीएमने मिळालेली नव्हती तर! परवा भाजपच्या स्थापनादिनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीड कोटी सदस्यसंख्या झाल्याचे जाहीर केले. या सर्व सदस्यांकडून पक्षाने दोन पानी फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि त्यांचे मोबाइल नंबरही पक्षाकडे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड कोटींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी रेटा लावला, बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठी मेेहनत घेतली. त्यातून हा आकडा आला.
काँग्रेसचे राज्यात किती सदस्य आहेत हे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले सांगू शकतील का? मुद्दा काँग्रेसला डिवचण्याचा नसून वास्तवाचे भान करून देण्याचा आहे. पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते यांना पक्षासाठी उत्तरदायी करण्याची, त्यांना पक्षकार्यासाठी जुंपण्याची सिस्टिम भाजपमध्ये आहे. तिथे पक्षापेक्षा कोणाला मोठे होऊ दिले जात नाही. काँग्रेसमध्ये नेते पक्षापेक्षा मोठे झाले आणि पक्ष लहान होत गेला. भाजपने १ लाख बूथ कमिटी (प्रत्येक बूथ कमिटीत १२ पदाधिकारी) तयार केल्या आहेत, म्हणजे १२ लाख पदाधिकारी झाले. काँग्रेसमध्ये अनेक शहरे अशी आहेत की जिथे वॉर्ड कार्यकारिणीदेखील नाहीत. परवा शोभाकाकू फडणवीस म्हणाल्या की, ‘भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका’. पण भाजपची आजची मजूबत स्थिती पाहता काँग्रेसचा भाजप होण्याची गरज दिसत आहे. या ठिकाणी काँग्रेसने भाजपसारखे मजबूत संघटन उभारणे आवश्यक आहे, असे सूचित करायचे आहे.
खलिद आणि सीयाराम
मुंबईतील घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आयपीएस अधिकारी कैसर खलिद हे अजूनही निलंबितच आहेत. खलिद यांची आठवण येण्याचे कारण म्हणजे रामनवमीच्या दिवशी त्यांनी फेसबुकवर टाकलेला एक व्हिडीओ. त्यात सुरुवातीलाच त्यांनी चक्क सोवळे परिधान केले. बॅकग्राउंडला ‘राम सीयाराम, सीयाराम जय जय राम’ हे गाणे. खलिद यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, एक भारतीय म्हणून माझ्या आध्यात्मिक प्रवासात मी अनेक धार्मिक स्थळं, मंदिरं बघितली आणि अनेक आदर्श व संकल्पना जाणून घेता आल्या. जीवनातील संघर्षकाळात प्रत्येक टप्प्यावर तु्म्हाला प्रेरणा देणाऱ्या फार कमी रोल मॉडेलपैकी प्रभू रामचंद्र एक आहेत. सत्य, योग्य संघर्ष, आशा, नम्रता आणि सातत्य यासारख्या मूल्यांना धरून ठेवण्याची शिकवण ते देतात, ही मूल्ये आजही कालसंगत आहेत. रामनवमीच्या शुभेच्छा... हिंदुत्ववादी सरकारची कृपा व्हावी म्हणून खलिद यांनी ही पोस्ट टाकली असे कोणी म्हणेलही; पण धार्मिक ताणतणावाच्या सध्याच्या काळात खलिद यांची पोस्ट भावली.
जाता जाता
परप्रांतीयांशी मनसैनिक अनेकदा पंगा घेतात. पक्षाचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी मध्य प्रदेशातील खवय्यांचे शहर म्हणून इंदूरमधील पदार्थांची मेजवानी देणारे ‘इंदुरी’ हे छोटेखानी रेस्टॉरंट दादरला सुरू केले आहे. परप्रांतीय चालत नाहीत; पण परप्रांतातील चविष्ट पदार्थ आपलाच मराठी माणूस आपल्यासाठी घेऊन येत असेल तर स्वागत करायला हरकत नाही.
(yadu.joshi@lokmat.com)