यदु जोशी, राजकीय संपादक,लोकमत
काेल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सर्व पक्षांना हेडऑन घेत लढलेले सतेज पाटील परवा विधानभवनात भेटले. ते सांगत होते, ‘महापालिकांपासून आताच्या निवडणुकांच्या निकालांनी हे सिद्ध केले की आम्ही (काँग्रेस) विरोधी पक्ष म्हणून स्थिरावलो आहोत.’ त्यांच्या दाव्याला सत्याची किनार जरूर आहे; पण अजूनही ते पूर्ण सत्य नाही. सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची वाटचाल सुरू आहे, असे फारतर म्हणता येईल. विदर्भात आजही काँग्रेस आहे. मराठवाड्यात काही पॉकेट्समध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्रात हे पॉकेट्स तुलनेने जास्त असले तरी या भागाचे प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या पुण्यात (शहर व ग्रामीणही) पक्षाची स्थिती खराब आहे. उत्तर महाराष्ट्रात शून्य, कोकणात शून्य, मुंबईत ओहोटी अशी अवस्था आहे. राजकारणात सत्य हे पूर्ण चंद्रासारखे नसते; ते बहुतेक वेळा अर्धचंद्र असते—दिसते तेवढेच. उरलेले अंधारात. काँग्रेसच्या बाबतीतही तसेच आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बोलणे झाले. ‘आम्ही स्वबळावर पुढे जात आहोत. नफा-नुकसान याचा विचार न करता पंजा सगळीकडे पोहोचला पाहिजे. काँग्रेसचा मतदार सगळीकडे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप, शिंदेसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या एक, दोन, तीन क्रमांकांच्या जागा निवडून आल्या हे सत्य आम्ही स्वीकारतो, पण काँग्रेस आजही आहे याची साक्ष देणारे मतदानही आम्हाला झाले हे आकडेवारी सांगते, आम्ही क्रमांक दोनची मते घेतली आहेत. ‘स्लो बट स्टेडी’ असे आमचे चालले आहे,’ असे सपकाळ म्हणत होते.
सपकाळ बरेचदा राहुल गांधींसारखे बोलतात. आधी राहुल गांधींना कोणी गांभीर्याने घ्यायचे नाही, आता जराजरा घ्यायला लागले. कदाचित सपकाळांनाही घेतील. दिवस कसे बदलतील, कोणी सांगितले? इतिहासाने अनेकदा पराभूतांना पुनरागमनाची संधी दिली आहे; पण इतिहासालाही मेहनतीची पावती लागते. सपकाळ मेहनत घेत आहेत तसे काँग्रेसचे अन्य निवडक नेतेही घेत आहेत; पण सगळे मेहनत घेताना, झोकून देताना दिसत नाहीत. काँग्रेसचे अनेक नेते असे आहेत की पक्षाने त्यांना जेवढी पदे आणि पैसा दिला त्याच्या दहा-वीस टक्के जरी त्यांनी काँग्रेसला परत केले तरी खूप काही होऊ शकेल; पण सगळे हातून गेले तरी काँग्रेस सुधारत नाही, चंद्रपूर महापौर निवडणुकीत ते दिसलेच आहे.
पाच ठिकाणी भोपळा१२ जिल्हा परिषदांचा विचार केला तर पाच ठिकाणी काँग्रेसला भोपळा मिळाला, दोन ठिकाणी प्रत्येकी एक, तर दोन ठिकाणी तीन-तीनच जागा मिळाल्या. लातूरच्या २३ (अमित देशमुख) आणि कोल्हापूरच्या १३ (सतेज पाटील) जागांनी काँग्रेसच्या समोर १२ जिल्हा परिषदा मिळून पन्नाशीपार आकडा लागला. ५६ पैकी ३७ जागा या दोन जिल्ह्यांनी दिल्या. बाकी दहा मिळून १९ जागा मिळाल्या. तरीही विरोधी पक्ष म्हणून आपण स्थिरावत असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांना वाटत असेल तर ते खोटे समाधान आहे. सतेज पाटलांच्या जिल्ह्यापुरते ते खरे आहे; पण पूर्ण राज्याचे चित्र तसे नाही. राज्याच्या नकाशावर पंजा उमटवणे आणि पंजाचा ठसा उमटवणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नकाशावर अस्तित्व आणि राजकारणात प्रभाव यात खूप फरक आहे.
काँग्रेस अजूनही इतिहासावरच जगते आणि वर्तमान तिला वाकुल्या दाखवून निघून जातो. ‘आम्ही कासव आहोत अन् सशाबरोबरच्या (भाजप) शर्यतीत आम्हीच जिंकू,’ असा आदर्शवाद काँग्रेस बाळगत असेल तर तेही खोटे समाधान आहे. काँग्रेसचे कासव अजूनही पायी चालले आहे, भाजपच्या सशाने इलेक्ट्रिक कार घेतली आहे. राजकारणात भ्रम हाही एक प्रकारचा ऑक्सिजन असतो. त्यावर काही काळ जगता येते; पण निवडणुकीच्या दिवशी ईव्हीएम केवळ आकड्यांवर श्वास घेते. पडझड सुरू असतानाही काँग्रेस चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा रंग लावू पाहत आहे, हेही नसे थोडके!
वासरात लंगडी गायकाँग्रेस स्थिरावेल का? कदाचित! पण स्थिरावणे म्हणजे फक्त अस्तित्व टिकवणे नव्हे; तर पर्याय म्हणून स्वीकारले जाणे. विरोधी पक्ष म्हणून उभे राहणे आणि सत्तेला धोकादायक वाटणे यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. काँग्रेस अजून पहिल्या टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्यात जाण्यासाठी संघटन, नेतृत्व, सातत्य आणि घाम लागेल. राजकारणात शेवटी प्रश्न एकच असतो- तुम्ही ‘आहात’ का, की तुम्ही फक्त ‘आहोत’ असे म्हणत आहात? - सध्यातरी काँग्रेस ‘आम्ही आहोत’ असे फक्त म्हणत आहे, तसे फारसे दिसत नाही. शरद पवार यांची राष्ट्रवादी मिलनातूर झाली असल्याने हा पक्ष उद्या विरोधी पक्ष असेल की सत्तापक्षाचा भाग हे आजच खात्रीने सांगता येत नाही. मुंबईत झालेला पराभव आणि राज्यात अन्यत्र मिळालेले मर्यादित यश यामुळे उद्धवसेनेचा संकोच झाला आहे. मनसेचे इंजिन बिघडले आहे. ‘एमआयएम’ने मर्यादित यश मिळविले असले तरी ते सक्षम विरोधी पक्ष ठरू शकत नाहीत. अशावेळी काँग्रेस हाच एक पर्याय दिसतो; पण आजतरी काँग्रेसची अवस्था ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ अशीच आहे. काँग्रेस एक समर्थ पर्याय म्हणून नाही तर पर्याय नसल्यामुळे दिसत आहे. सत्तेला अस्वस्थ करणारी आणि जनतेला विश्वास देणारी काँग्रेस अजूनही दिसत नाही.yadu.joshi@lokmat.com
Web Summary : Congress is stabilizing as opposition, but faces challenges. Regional disparities exist, and reliance on past glory hinders progress. While other parties falter, Congress needs stronger leadership and consistent effort to truly challenge the ruling power.
Web Summary : कांग्रेस विपक्ष के रूप में स्थिर हो रही है, लेकिन चुनौतियों का सामना कर रही है। क्षेत्रीय असमानताएं मौजूद हैं, और अतीत पर निर्भरता प्रगति को बाधित करती है। अन्य दलों के विफल होने पर, कांग्रेस को सत्ता को चुनौती देने के लिए मजबूत नेतृत्व और निरंतर प्रयास की आवश्यकता है।