माणसं घाबरली, की विष पेरणं सोपं होतंच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 08:05 AM2021-08-21T08:05:42+5:302021-08-21T08:05:51+5:30

theatre : माणसांना घाबरवण्यासाठी खरेखोटे शत्रू चलाखीने पुरवले जातात. आतून घाबरलेली माणसं मग एकमेकांना चिकटून भ्रमात जगतात.

People were scared that it would be easy to sow poison! | माणसं घाबरली, की विष पेरणं सोपं होतंच!

माणसं घाबरली, की विष पेरणं सोपं होतंच!

Next

- शफाअत खान
(ख्यातनाम नाटककार)

कोविडच्या आगमनानं जगण्याचा ‘प्रवेश’ बदलला...?
कोविडच्या अचानक हल्ल्याने माणसांच्या जगण्यावर परिणाम झाला. जगायचं तर एकमेकांपासून अंतर राखणं गरजेचं होऊन बसलं. सगळं ठप्प झालं. सवय नसल्याने माणसं गोंधळली. सुरुवातीला अंदाज आला नाही. थाळ्या वाजवल्याने, दिवे लावल्याने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं नाही. दोन-चार महिन्यात सर्व आवाक्यात येईल असं वाटत होतं. पण माणसांचं अडकून पडणं लांबत गेलं. एकटं, उदास, एकाकी वाटू लागलं. निष्क्रियता, भय, अनिश्चिततेनं माणसं घेरली गेली. या दिवसांनी माणसांचं असणं बिनमहत्त्वाचं करून टाकलं.

 या काळातलं नाट्य? धार्मिक अंगाने गेलेलं नाट्य?
राज्यकर्त्यांना आपली सत्ता टिकवण्यासाठी माणसं बांधून ठेवावी लागतात. विचारांनी माणसांना बांधून ठेवता येतं. पण विचार, मुद्दा नसलेले राज्यकर्ते जनतेला घाबरवून बांधून ठेवू पाहातात. आतून घाबरलेली माणसं एकमेकांना चिकटून राहातात. कशावरही पटकन विश्वास ठेवतात. खोट्यालाच खरं समजतात. भ्रमात जगतात. त्यांना घाबरवण्यासाठी एक खराखोटा शत्रू लागतो. चलाखीने हे शत्रू पुरवावे लागतात. कोविडच्या निमित्तानेही काही जणांनी हात धुवून घेतले. ‘कोविड जिहाद’ असं नाव देऊन एका समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. नाटकात नायकापेक्षा खलनायक मोठा, प्रभावी, मोठ्या ताकदीचा असावा लागतो तरच नायकाचं मोठेपण खुलून दिसतं. अलीकडे तंत्रज्ञानामुळे भयंकर शत्रू उभं करणं सहज शक्य झालं आहे.  विशिष्ट समाजाला भयंकराशी, विध्वंसाशी, विनाशाशी जोडलं जातं. खोटं लपवण्याचा हा उद्योग सतत चालू ठेवावा लागतो. खोट्यात रंजन करण्याची ताकद जास्त असते. रंजन करता करता विष पेरता येतं.
राजकारणी स्वत:च्या प्रचार-प्रसारासाठी नाटकाचा वापर करतात. नाटकात सगळं खोटं खोटं असलं तरी चांगलं नाटक खऱ्याची तोडमोड करून सत्यापर्यंत जाऊ पाहातं. राजकारण्याचं नाटक खऱ्याची विकृत तोडमोड करून सत्य दडपू पाहातं. सध्या कोविडमुळे खरं नाटक बंद पडलं आहे. लबाड नाटकं मात्र जोरात सुरू आहेत.

 या घडामोडींमधून काही नवी संहिता हाती लागली?
आज नाटक थांबल्यासारखं वाटत असलं तरी नाटक थांबणार नाही. यापूर्वीही अनेक अडचणींना तोंड देत नाटक तगून राहिलं आहे. नाटक मरत नाही. नाटक नव्या गोष्टी, नवं तंत्रज्ञान पचवत मोठं होत जातं. एकत्र येणं, सुखदु:खाच्या गोष्टी शेअर करणं ही माणसाची गरज आहे, भूक आहे. नाटक गेल्या दोनअडीच हजार वर्षांपासून ही भूक भागवण्याचं काम करीत आहे. माणसाचं जगणं बदललं की नाटक बदलतं. नाटकाला बदलावं लागतं. नाटकवाल्यांना उद्याची चिंता करण्याचं कारण नाही. आपल्याला मुळात गर्दीची आवड आहे. धक्काबुक्कीचा आपल्याला फार त्रास होत नाही. एखाद्या कार्यक्रमाला, सभासंमेलनाला गर्दी झाली नाही तर आपण अस्वस्थ होतो. उद्या साथ आटोक्यात आली तर घरात अडकलेली माणसं बाहेर पडतील. नाटकाकडेही वळतील. बरेच दिवस टीचभर जागेत कोंडून पडल्यामुळे काही भव्यदिव्य बघण्याची इच्छा होईल. सर्व विसरून जगणं सेलिब्रेट करावंसं वाटेल. मराठी व्यावसायिक नाटकाला हे लक्षात ठेवूनच नवीन नाटकं द्यावी लागतील. आता जुन्या गोष्टींचे, माणसांचे, नात्यांचे, नव्याने अर्थ लागत जातील. मी अर्धवट सोडलेल्या नाटकांचे मला वेगळे अर्थ जाणवू लागले आहेत. गंधर्व-गौहर प्रेमकथेवरचं माझं नाटक अनेक दिवस अडकून पडलं होतं. त्या नात्यातला गुंता सुटता सुटत नव्हता. मला या उदास दिवसांनी प्रेमकथेतल्या निसटलेल्या जागा दाखवून दिल्या.
आता निव्वळ चलाखीने रचलेल्या गोष्टीत माणसं गुंतून पडतील असं वाटत नाही. जिवंत सळसळती ऊर्जा हे नाटकाचं बलस्थान आहे. प्रशिक्षित नट आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऊर्जेने भारावलेले खेळ सादर करावे लागतील. सपक नाटक बाद होईल. समांतर रंगभूमीवर वेगळे प्रयोग होतील. ते नाटक नाट्यगृहाबाहेर पडेल. नाटक लोकांत खेळलं जाईल. लोक नाटक बघतील; पण आपण नाटक बघितलं हे त्यांच्या लक्षातही येणार नाही. हे असे प्रयोग आजही कुठे कुठे होत असतात. पण आता निव्वळ ‘गिमिक म्हणून केलेली हॅपनिंग्ज’ यापलीकडे ते जाईल. या खेळाकडे गांभीर्यानं बघितलं जाईल.

 ऑनलाइन शिक्षण, नाटकं, बैठका, कार्यक्रम याकडे तुम्ही कसं पहाता?
तंत्रज्ञान महत्त्वाचं आहेच; पण ते आज आपल्याकडे सहज उपलब्ध नाही. उपलब्ध असलं तरी सर्वांना परवडणारं नाही. त्यामुळं आता आता शिकू लागलेले या शर्यतीत मागे पडत जातील अशी भीती वाटते. मोठ्या शहरात हे तंत्रज्ञान उपलब्ध असलं तरी इतर अनेक अडचणी आहेत. घरात एकाचवेळी ऑनलाइन शिकणारी मुलं आणि ऑनलाइन काम करणारे पालक  यांना छोट्या घरात जागा कशी उपलब्ध होईल ही चिंता सतावते आहे. सर्वच विषय ऑनलाइन शिकता-शिकवता येतील असंही नाही. बघून फार फार तर नक्कल करता येईल. आता सर्व कामं ऑनलाइन होत आहेत हे लक्षात आल्याने अनेकांनी ऑफिसची महागडी जागा विकून टाकली आहे. शाळा, कॉलेज, ऑफिस, बाजार सगळंच घरात घुसतं आहे. घरं आता अतिशय झपाट्यानं बदलत चालली आहेत. घराचं घरपण हरवत चाललं आहे. शेवटी घर, माणूस, नाती सर्वांच्याच नव्याने व्याख्या कराव्या लागणार आहेत. अर्थात हा गुंता समजावून घ्यायला थोडा वेळ लागेल इतकंच!

मुलाखत : सोनाली नवांगुळ
sonali.navangul@gmail.com

Web Title: People were scared that it would be easy to sow poison!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Theatreनाटक