एक फुल दोन हाफचा सामना!

By यदू जोशी | Published: March 8, 2024 11:01 AM2024-03-08T11:01:32+5:302024-03-08T11:03:35+5:30

एक फुल दोन हाफ (काँग्रेस अन् फुटलेले दोन पक्ष) अशी आघाडीची, तर त्यांच्या विरोधातील महायुतीची स्थितीही अगदी तशीच आहे.

One full two half match! | एक फुल दोन हाफचा सामना!

एक फुल दोन हाफचा सामना!


यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

अमरावतीमध्ये भाजप नवनीत राणांना उमेदवारी देणार, अशी बातमी आल्यानंतर तेथील भाजपच्या एका नेत्याचा फोन आला. “आमच्यापैकी कोणीही राणाबाईंचे काम करणार नाही” असे ते म्हणत होते. ‘अब की बार चार सौ पार’चे लक्ष्य आहे ना? याची आठवण त्यांना करून दिली तर ते म्हणाले “भाऊ, गोम असते ना गोम, तिला खूप पाय असतात, एखादा पाय तुटला तर गोम लंगडी होत नाही, तसं राणाबाई पडल्याने असा कोणता फरक पडेल?” एकमेकांचे हिशेब करण्याची वाट अशा पद्धतीने भाजपचे नेते काही मतदारसंघांमध्ये पाहत आहेत. महाविकास आघाडी ते कसे कॅश करते ते महत्त्वाचे असेल. 

परवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अकोल्यात आले होते. सहा मतदारसंघांची एकत्रित बैठक त्यांनी घेतली. मोदीजींना पंतप्रधान करायचे आहे, तेवढेच लक्ष्य समोर ठेवा अन् त्यानुसार काम करा. मला धारणी माहिती आहे आणि रिसोडही माहिती आहे, असे ते एकेका गावाचे नाव घेऊन बोलत होते. कोण कुठे काय करतेय त्याची हरखबर मला मिळते, असे ते म्हणाले  तेव्हा काही काडीबाज नेत्यांनी रुमालाने घाम पुसला. विधानपरिषद निवडणुकीत सर्वांनी मिळून अमरावती पदवीधरमध्ये रणजित पाटलांचा गेम केला होता. तसे यावेळी कुठेही करणे बिलकूल सोपे नाही. आता जे फडफड करत आहेत तेच उमेदवारांची पालखी वाहताना दिसतील. दिल्लीचे कॅमेरे सगळीकडे लागलेले आहेत. विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदांचा रस्ता लोकसभेतून जाणार आहे हे सगळ्यांना बरोबर कळते.

त्याचे काय आहे की काँग्रेसमधील गटबाजी दिसते; भाजपमधली दिसत नाही. लोकसभेचे उमेदवार ठरवताना राज्यातील नेते आपापले प्यादे पुढे करीत आहेत. विशिष्ट नेत्यांमार्फत प्रयत्न करणारे इच्छुक आणि त्यांच्यासाठी लॉबिंग करणारे नेते भाजपमध्येही आहेत. देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत पाठविण्याची घाई झालेले तीन-चार नेते आहेत. त्यासाठीची चर्चा दिल्लीत अधूनमधून ज्या बंगल्यावर होते त्याचा पत्ता आहे आपल्याकडे. ‘काँग्रेसवाले आह भी भरते है तो हो जाते है बदनाम और बीजेपीवाले कत्ल भी करते है तो चर्चा नहीं होता’ एवढाच काय तो फरक आहे.

संघाची भूमिका असते का? 
यावेळी एक मोठी गोष्ट अशी दिसत आहे की अनेक ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांची उमेदवारीच्या प्रक्रियेत नावे समोर येत आहेत. एरवी संघ असतोच; पण, तो पडद्याआड असतो. यावेळी  ‘आम्ही संघाच्या अमुकजींना भेटलो, तमुकजींना भेटलो,’ असे इच्छुक उमेदवार सांगत आहेत. संघाच्या पदाधिकाऱ्यांची स्वत:ची राजकीय महत्त्वाकांक्षा दिसत नाही; पण, भाजपच्या उमेदवारीसाठी आपली माणसे प्रोजेक्ट करण्याचा मोह काही संघ पदाधिकाऱ्यांना झालेला दिसतो. 

भाजप, काँग्रेसमधील फरक
महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलताना एक जाणवते की, फार मोठा चमत्कार महाराष्ट्रात होणार नाही; पण, गेल्या वेळपेक्षा परिस्थिती खूप चांगली असेल. गेल्या वेळी राष्ट्रवादीचे चार आणि काँग्रेसचा एकच उमेदवार जिंकला होता. भाजप-शिवसेना युतीला ४१ जागा मिळाल्या होत्या. एक एमआयएम आणि एक अपक्ष अशी स्थिती होती. यावेळी १५ जागांवर महाविकास आघाडी चांगली फाईटमध्ये राहील आणि आठ ते दहा जागा जिंकू, असेही ते म्हणत आहेत. प्रत्यक्ष प्रचार सुरू झाल्यानंतर चित्र आणखी सुधारेल, असा त्यांचा दावा आहे. एक फुल दोन हाफ (काँग्रेस अन् फुटलेले दोन पक्ष) अशी  आघाडीची स्थिती आहे. त्यांच्या विरोधातील महायुतीची स्थितीही एक फुुल दोन हाफ (भाजप आणि फुटलेले दोन पक्ष) अशीच आहे. काँग्रेसचे नेते शिवसेनेला खूप जागा जिंकता येतील का, याबाबत साशंक आहेत. पश्चिम महाराष्ट्रवादी पक्ष असल्याचा आरोप राष्ट्रवादीवर सुरुवातीपासूनच होत आला आहे. आता फुटीनंतर शरद पवारांचा पक्ष कितपत चांगली कामगिरी करू शकेल, हा प्रश्नही काँग्रेसला सतावत असणारच. जे इकडे काँग्रेसचे आहे ते तिकडे भाजपचे झाले आहे. त्यांनाही एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मोठ्या प्रमाणात जागा जिंकण्याच्या क्षमतेविषयी शंका आहे. ही शंका असल्यानेच भाजपने डोके लढवले आणि जास्तीत जास्त जागा आपल्याकडे घेण्यासाठी दबाव वाढविला आहे. शिंदे वा अजित पवारांना खूप जास्त जागा देऊन त्यांना जोखीम पत्करायची नाही. जे तंत्र भाजपने अवलंबिले ते काँग्रेसला मात्र साधलेले नाही. एकसंध राहिलेली काँग्रेस (अशोक चव्हाणांचा अपवाद वगळता)  फुटलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला आपल्यापेक्षा अधिक जागा द्यायला निघाली आहे. काँग्रेस, ठाकरे सेनेकडून ॲड. प्रकाश आंबेडकर यांना फार गोंजारले जात आहे; पण, ते महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता धूसर होत आहे. 

कमळ एवढे का आवडते? 
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाले,तर राष्ट्रवादीचे घड्याळ अजित पवारांच्या पक्षाला. वर्षानुवर्षांच्या अधिकृत पक्षचिन्हाचे धनी होऊनही त्यांच्या काही उमेदवारांना कमळावर का लढावेसे वाटावे? विशेषत: शिवसेनेत असे तीन-चार खासदार आहेत जे म्हणतात, “आम्हाला कमळ हातात घ्यावयाचे आहे.” अन्य काही जण असे म्हणतात की, “धनुष्यावर लढण्याची आमची तयारी आहे; पण, कमळ मिळाले तर चांगलेच.” त्याचा अर्थच असा आहे की, आपल्या चिन्हापेक्षा त्यांना कमळ सुरक्षित वाटते. कमळ घेतले तर आपण थेट मोदींशी कनेक्ट होतो आणि त्यामुळे मोदी लाट असेल तर त्याचा मोठा फायदा आपल्याला होईल हेही गणित त्यामागे असणारच. भाजप खरेच काही मित्रांच्या हातात कमळ देणार का, हे एक-दोन दिवसांत कळेलच.


 

Web Title: One full two half match!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.