'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 06:48 IST2025-05-09T06:48:11+5:302025-05-09T06:48:43+5:30
भारताच्या कैदेतून सुटल्यावर सर्वत्र भाषणे देत फिरणारा 'जैश-ए-महंमद'चा म्होरक्या मसूद अझरला 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये भारताने मोठा तडाखा दिला आहे.

'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
- निळू दामले, ज्येष्ठ पत्रकार
'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेअंतर्गत भारतीय लष्करानं बहावलपूर या गावात केलेल्या हल्ल्यात 'जैश-ए-महंमद'चा प्रमुख मसूद अझरचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. मसूदच्या दोन बहिणी आणि त्यांची कुटुंबं मिळून चौदा व्यक्ती या हल्ल्यात मृत पावल्या. त्यात लहान मुलंही आहेत. या हल्ल्यानंतर मसूदच्या नावाने एक निवेदन प्रसिद्ध झालं. 'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता' अशा आशयाची भावना त्याने या निवेदनात व्यक्त केली आहे.
कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा. वर्ष १९९४ मध्ये मसूदला काश्मीरमध्ये अटक झाली होती. मसूद भारतात अनेक तुरुंगांमधे होता. वर्ष १९९९ मध्ये मसूदच्या सहकाऱ्यांनी काठमांडूहून दिल्लीला जाणारं विमान पळवलं. 'मसूदला सोडलंत तर विमान आणि पळवलेली माणसं सोडू' अशी अट अपहरणकर्त्यांनी घातली. तत्कालीन भाजप सरकारनं ती अट मान्य केली आणि त्या काळातले परदेश मंत्री जसवंत सिंग यांच्या व्यक्तिगत उपस्थितीत मसूदला सोडण्यात आलं. मसूद पळाला, कराचीत गेला. तिथं त्यानं एक मोठ्ठी सभा घेतली आणि जाहीर केलं की, भारत नष्ट केल्याशिवाय, काश्मीर भारतातून सोडवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. मसूद हा कुणी किरकोळ दहशतवादी म्होरक्या नव्हता. काश्मीरमधे येण्याआधी त्यानं दीर्घकाळ ब्रिटनमधे दौरा करून बरेच जिहादी मिळवले होते, बरेच पैसे जमा केले होते. काश्मीर स्वतंत्र करणं हा त्याचा हेतू होता.
भारताच्या कैदेतून सुटल्यावर मसूद पाकिस्तानभर मोकळेपणानं फिरत राहिला. आधीची हरकत-उल-अन्सार ही दहशतवादी संघटना बरखास्त करून त्यानं 'जैश-ए-महंमद' ही संघटना स्थापन केली होती, तिचा तो सरचिटणीस, बहावलपूर हे त्यानं केंद्र केलं होतं. पाकिस्तानात जिहादी मदरशांची मोठ्ठी साखळी हक्कानी बंधूंनी तयार केली होती. हक्कानींचे जिहादी अफगाणिस्तानात घातपात करत असत. भारतातल्या घातपाताची जबाबदारी 'जैश-ए-महंमद 'वर होती.
हक्कानी संघटना आणि जैश या दोन्ही संघटनांना पैसा आणि बाकीची मदत पाकिस्तानचं 'आयएसआय' करत असे. यात काहीही गुप्त वगैरे नव्हतं. मसूदच्या कारवायांना वर्तमानपत्रांत भरपूर प्रसिद्धी मिळत असे. खुलेआम सभा घेऊन तो भारतविरोधी भाषणं करत फिरत असे. पाकिस्तान सरकारला बेकायदेशीर धंदे करण्यासाठी नॉन स्टेट अॅक्टर्सची गरज कायमच होती. हक्कानी आणि मसूद हे त्यापैकी. पाकिस्तान सरकार त्यांच्याकरवी बेकायदेशीर धंदे करून घेत असे. अफगाण सरकारनं अनेकवेळा पाकिस्तानकडं तक्रारी नोंदल्या आणि 'या खासगी सैन्याला आवरा' असं सांगितलं. पाकिस्ताननं अफगाण सरकारच्या विनंत्यांना कचऱ्याची टोपली दाखवली.
वर्ष १९९९ मध्ये सुटल्यावर मसूदने आपल्या उपकारकर्त्यावरच सूड उगवला. २००१ मध्ये त्यानं दिल्लीत संसदेवरच हल्ला घडवला. वर्ष २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यातही मसूदचा मोठा हात होता. १७३ भारतीय आणि ९ जिहादी या हल्ल्यात मरण पावले. १० दहशतवादी बिनधास्त मुंबईत घुसले. गल्लीगल्लीत फिरले. ताज हॉटेल, हॉस्पिटल, बाटला हाउस, बोरीबंदर स्टेशन इत्यादी ठिकाणी हिंडून गोळीबार केला. व्यवस्थेतील गलथानपणामुळं पोलिस अधिकाऱ्यांचा बळी गेला. भारताच्या संरक्षण सिद्धतेची जगभर नाचक्की झाली. दहशतवाद्यांना तेच व्हायला हवं होतं.
वर्ष २०१६ मध्ये मसूदनं सु-नियोजित पठाणकोट हल्ला घडवला. पठाणकोटच्या हवाई दलाच्या तळामधे ४ जिहादी घुसले. पाकिस्तानमधून बोटीनं नदी पार करून ते पठाणकोटमधे पोचले. दाणादाण उडवून ९ माणसं मारून ते स्वतः ही मृत पावले. आत्मघातकी हल्लाच होता तो आणि मरण्यासाठीच ते पठाणकोटमध्ये आले होते. भारतातला गलथानपणा त्यांना उघड करायचा होता. वर्ष २०१९ मध्ये एक आत्मघातकी माणूस एका ट्रकवर टनावारी स्फोटकं घेऊन जम्मू, श्रीनगर रस्त्यावर पुलवामा या ठिकाणी पोहोचला. या रस्त्यावरून केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना नेणारा ट्रकचा काफिला जाणार आहे, हे त्याला माहीत होतं. तो काफिल्यावर धडकला. प्रचंड स्फोट झाला. ४० जवान मारले गेले.
ही घटना जगभर गाजली. हा हल्ला जैश-ए-महंमदनं, मसूद अझरनं योजला होता, हे जगभर प्रसिद्ध झालं. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, संयुक्त राष्ट्रसंघाने मसूदला दहशतवादी म्हणून जाहीर केलं. मसूद बिनधास्त पाकिस्तानभर फिरत होता. पाकिस्तानी पोलिसांची सुरक्षा व्यवस्था त्याला असे.
मसूद अझर बहावलपूरमधे जन्मला. तिथल्या देवबंदी मदरशात त्यानं इस्लामी शिक्षण घेतलं. नंतर अफगाणिस्तानातल्या जिहादी दहशतवादी शाळेत तो दाखल झाला. नंतर काही काळ तो अफगाणिस्तानात लढला, जखमी झाल्यावर पाकिस्तानात परतला. तिथून त्यानं त्याची जिहादी करियर सुरू केली. सोमालियात गेला. इंग्लंडमधे गेला. तिथं तो कुराणावर भाषणं करीत असे. 'आयएसआय'नं त्याच्यावर भारताची जबाबदारी सोपवली, काश्मीर हे त्याचं कार्यक्षेत्रं ठरलं. बहावलपूरमधून तो भारतावरच्या हल्ल्याचं नियोजन करू लागला.
त्याचा तोच तळ भारताच्या लष्कराने उद्ध्वस्त केला आहे. त्याचे नातेवाईक आणि साथीदार मारले गेले आहेत. पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेच्या पोटात अशा अनेक कहाण्या दडलेल्या आहेत. त्यांचा उलगडा व्हायला काही काळ जावा लागेल, हे मात्र खरं.
damlenilkanth@gmail.com