सुज्ञांचे हरपले भान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 01:31 PM2020-05-22T13:31:56+5:302020-05-22T13:32:13+5:30

मिलिंद कुलकर्णी कोरोनाचा संकटकाळ हा कसोटीचा आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि सरकार या दोघांनी घालून दिलेल्या नियमाचे पालन केले ...

Lost consciousness of the wise! | सुज्ञांचे हरपले भान !

सुज्ञांचे हरपले भान !

Next

मिलिंद कुलकर्णी
कोरोनाचा संकटकाळ हा कसोटीचा आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि सरकार या दोघांनी घालून दिलेल्या नियमाचे पालन केले तर जीव वाचणार आहे, अन्यथा... हे माहित असल्याने प्रत्येक घटक काळजी घेत आहे. ह्यजान है तो जहाँ हैह्ण पासून तर ह्यजान भी और जहाँ भीह्ण पर्यंत आपल्या लॉकडाऊनच्या चार पर्वांचा प्रवास झाला आहे. रेड, आॅरेंज आणि ग्रीन झोन अशा विभागणी झाल्यानंतर चौथ्या पर्वात रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोनच विभाग करण्यात आले आहे. ७९ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये सामान्य नागरिकाच्या सहनशीलतेची परीक्षा सुरु आहे, हे अगदी कबूल आहे. पण हे सगळे आपल्या जीवासाठी सुरु आहे, हे कळायला हवे. दुर्देव असे की, सुशिक्षित, समंजस, सुज्ञ मंडळीचे भान हरपले आहे.
कोरोनामुळे एकंदर जीवनशैलीत झालेला बदल आपण अनुभवतोय. लॉकडाऊनमुळे शिस्त लागली आहे. दूध, भाजीपाला, किराणा, औषधी, वर्तमानपत्रे अशा अत्यावश्यक बाबींसाठी केवळ आपण बाहेर पडतो किंवा घरपोच मागवत आहोत. जिल्हाबंदी असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी एस.टी., रेल्वे ही साधने नाही. असे असताना मरण व तोरणदाराचे कार्यक्रमदेखील शारीरिक अंतराचे पालन करुन साजरे व्हायला हवेत. त्यासाठी शासनाने उपस्थितांची संख्या निश्चित करुन दिली असतानाही आम्ही बडेजावासाठी ते पायदळी तुडवत असू तर नुकसान आमचे आणि आपल्या संपर्कातील स्नेहीमंडळींचे करीत आहोत, हे सुज्ञांना का कळत नसेल काय?
निश्चित झालेले लग्न मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत साजरे करण्याचा मोठेपणा अनेक जणांनी दाखविला. त्यांच्या पुढाकाराचे समाज, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कौतुक झाले.
मात्र कोरोना रुग्ण किंवा कोरोना संशयित व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी सगळे नियम पाळणे आवश्यक आहे. ते पाळले न गेल्याने रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. अमळनेरात एका अंत्ययात्रेमुळे कल्लोळ झाला. शंभरावर रुग्ण या शहरात आढळले. भडगावात तेच झाले. एका महसूल अधिकाऱ्याच्या नातलगाच्या अंत्ययात्रेला २००-२५० लोक उपस्थित होते. वैकुंठधाम ऐवजी शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि त्याचा परिणाम भडगावात ४५ रुग्ण आढळून आले. जळगावातील वाघनगरात अमळनेर, भडगावची पुनरावृत्ती झाली. मृतदेह रात्रभर घरात ठेवला आणि सकाळी अंत्यसंस्कार केले. एकाच घरातील १९ हून अधिक लोक बाधित झाले.
घरातील व्यक्तीचे निधन होणे ही दु:खदायक बाब आहे. भावनिक नाते असते. ऋणानुबंध असतात. पण कोरोना साथीच्या काळात काळजावर दगड ठेवून आपण स्वत:साठी आणि नातेवाईकांसाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे.
तीच अवस्था व्यावसायिकांबाबत घडत आहे. संसर्गजन्य रोग असल्याने शारीरिक अंतर पाळणे, मास्क वापरणे, सातत्याने हात धुणे हे ६० दिवसांमध्ये आपल्या अंगवळणी पडले आहे. या काळात सगळ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नोकरदारांवर नोकरकपात किंवा पगार कपातीची कुºहाड कोसळली आहे तर व्यावसायिकांबाबत आर्थिक चक्र ठप्प झाल्याचे आक्रित घडले आहे. नाईलाज असल्याने निमूटपणे सारे हे सहन करीत आहेत. २०२० हे वर्ष नफा-तोट्यापेक्षा स्वत:ला सुरक्षित राखणे यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तरीही स्वार्थांध मोजक्या मंडळींकडून छुप्या पध्दतीने दुकाने सुरु करण्याचा प्रयत्न होत आहे. शासनाचा दंडुका बसला की, मग ही मंडळी सुतासारखी सरळ होते. जळगावात तर आश्चर्य घडले. पहाटे चार वाजता दुकाने सुरु होती आणि कामकाज चालू होते. का आपण कोरोनाला आमंत्रण देत आहोत हा प्रश्न अशा घटना पाहिल्यावर पडतो.
धक्कादायक घटना पुन्हा जळगावातच घडली. उच्चभू्र वर्गातील महिलांनी एका अपार्टमेंटमध्ये किटी पार्टी केली. ३३ महिला एका फ्लॅटमध्ये एकत्र आल्या, जेवल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कारवाई केली. आता प्रतिष्ठित कुटुंबातील महिला असल्याने गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रयत्न झाला. नंतर बातमी प्रसिध्द झाल्यावर हा काय मोठा गुन्हा होता काय, अशी विचारणा वर्तमानपत्रांना झाली. मजूर शेकड्याने पायी आणि वाहनाने जात असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही, आणि या महिलांवर कशासाठी हा युक्तीवाद तर हास्यास्पद होता. स्थलांतरितांचे दु:ख अद्याप सुशिक्षित, सुज्ञ मंडळींपर्यंत पोहोचलेले नाही. कोरोनात किटी पार्टी टाळली असती तर काय आभाळ कोसळले असते काय? आम्ही भान ठेवत नाही आणि विस्फोट झाला तर पुन्हा प्रशासनावर खापर फोडायला मोकळे असतो. हा दांभिकपणा झाला.

Web Title: Lost consciousness of the wise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.