शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळातील नेतृत्वहीन मराठवाडा

By admin | Updated: December 27, 2015 21:47 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह, नगरविकास आणि सामान्य प्रशासन या महत्त्वाच्या खात्यांशिवाय वित्त, वने, सामाजिक न्याय, ऊर्जा अशी अत्यंत महत्त्वाची खाती आज विदर्भाकडे आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह, नगरविकास आणि सामान्य प्रशासन या महत्त्वाच्या खात्यांशिवाय वित्त, वने, सामाजिक न्याय, ऊर्जा अशी अत्यंत महत्त्वाची खाती आज विदर्भाकडे आहेत. सोबतच नितीन गडकरींसारखे हेविवेट केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे विदर्भाला मेट्रोपासून टेक्स्टाईल पार्क, कौशल्य विद्यापीठापर्यंत अनेकानेक नवनवीन गोष्टी मिळत राहणार हे स्पष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्र आधीच विकसित आहे. तेथील नेत्यांची कोणत्याही सरकारमध्ये कामे अडत नाहीत. या पार्श्वभूमीवर, विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात नेतृत्वहीन मराठवाड्याची चिंता सातत्याने खंतावत राहिली. पक्षीय भेदांपलीकडे जाऊन मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदार एकवटल्याचे चित्र विधिमंडळात दिसलेच नाही. आज संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या भीषण छायेत आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी खून पडतील की काय, अशी भीती वाटते. हे बघता तेथील आमदारांनी पक्षीय भेदाच्या भिंती पाडून आकाशपाताळ एक करायला हवे होते; दुर्दैवाने तसे झाले नाही. चॅनेलवाल्यांना बाईट देण्यापुरता आणि पेपरवाल्यांना हटके फोटो देण्यापुरताच मराठवाड्याच्या नेतेगिरीचा आव काही जण आणत होते, एवढेच. दुष्काळाबाबत मायबाप सरकारने दिलेले पॅकेज मराठवाड्यातील आमदारांनी निमूटपणे स्वीकारले. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे या नेत्यांच्या पश्चात संपूर्ण मराठवाड्याची मोट बांधू शकेल आणि सर्वांना मान्य होऊ शकेल, असा नेता आज तरी दिसत नाही. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे भाऊबंदकीत अडकले आहेत. धनंजय एकदम राज्यव्यापी प्रश्न हाताळू लागले आहेत. काँग्रेसमध्ये नांदेड व लातूरचे सूर अद्याप जुळलेले नाहीत. विलासरावांना मानणारा गट स्वत:ला पोरका मानतो. अमित देशमुखांना वडिलांची जागा भरून काढता आलेली नाही. लोकसभेचे सदस्य असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात क्षमता आहे, पण विरोधी पक्षात असल्याने त्यांना मर्यादा आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर जिल्ह्याबाहेर जायला तयार नाहीत. गोपीनाथ मुंडेंचा अकाली मृत्यू झाल्याने रावसाहेब दानवे यांना दिल्ली सोडून महाराष्ट्रात परतावे लागल्यामुळे दिल्लीच्या सत्तेतील मराठवाड्याचा टक्काही संपला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात मराठवाड्याची लॉबी वगैरे अजिबातच नाही. कुणाचाही दरारा दिसत नाही. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते आहेत. आपल्या भागातील कळीचे मुद्दे सभागृहात ते सहजपणे ऐरणीवर आणू शकतात. पण एकदा राज्य पातळीवरचे महत्त्वाचे पद मिळाले की आपल्यातील प्रादेशिक जाणिवा विसरण्याचा कित्ता बऱ्याच नेत्यांनी आजवर गिरविला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक नेत्यांची नावे याबाबत घेता येतील. त्यामुळे बागडे त्याला अपवाद ठरतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेते कितीही मोठ्या पदावर गेले तरीही प्रादेशिक जाणिवेबाबत बहिरेपण स्वीकारत नाहीत. या भागाबाबत आणखी एक सल मनात येतो व तो म्हणजे प्रादेशिक असमतोलाची जाणीव करून देणाऱ्या धुरिणांचा अभाव. एकेकाळी गोविंदभाई श्रॉफ, सुधाकरराव डोईफोडे, केशवराव धोंडगे हे काम नेटाने करीत असत. ती पोकळी आज जाणवते. मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी विधिमंडळात आपल्या भागाचा दबावगट निर्माण व्हावा अशी रणनीती आखली नाही तर आज सत्ताकारणात वजन असलेला मागासलेला विदर्भ कितीतरी पुढे निघून जाईल आणि मराठवाडा अन्यायाचे रडगाणे गात राहील. मार्चच्या अधिवेशनात तरी दबावगट दिसावा अशी अपेक्षा आहे. देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला येणाऱ्या आमदारांनी या दृष्टीने चर्चा सुरू करायला हरकत नाही. विमानाने ये-जा करणाऱ्यांना मग त्यांना साथ द्यावीच लागेल.- यदू जोशी