जी-20 : अध्यक्षपद प्रत्येक भारतीयाचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 07:23 AM2023-09-09T07:23:21+5:302023-09-09T07:23:28+5:30

देशातील ६० शहरांमध्ये झालेल्या जी-20 परिषदेच्या अंदाजे २२० बैठकांमध्ये जवळपास २३.३ कोटींहून अधिक भारतीय सहभागी झाले होते.

India has proved how and why India's presidency of the G-20 summit is different. | जी-20 : अध्यक्षपद प्रत्येक भारतीयाचे!

जी-20 : अध्यक्षपद प्रत्येक भारतीयाचे!

googlenewsNext

- एस. जयशंकर

भारताचे  जी-20 परिषदेचे अध्यक्षस्थान कसे आणि का  वेगळे आहे, हे भारताने सिद्ध करून दाखवले आहे. भारताने आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, ग्लोबल साउथचा आवाज अधिक मजबूत केलाच, शिवाय हवामान बदल आणि वित्तपुरवठा, ऊर्जा संक्रमण, शाश्वत विकास उद्दिष्टांची  अंमलबजावणी आणि तांत्रिक परिवर्तन या क्षेत्रांमध्ये महत्त्वाकांक्षा जागृत केली.  संपूर्ण देशभरात जी 20 संदर्भात झालेल्या बैठका, कार्यक्रम आणि उपक्रमांमध्ये लोकांनी घेतलेला सक्रिय सहभाग हे आणखी एक वैशिष्ट्य होय! त्यामुळे भारताचे अध्यक्षस्थान केवळ सरकारपुरते मर्यादित राहिले नाही.  विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकांच्या सक्रिय सहभागामुळे, भारताचे जी 20 अध्यक्षपद हे खरोखरच लोकांचे झाले आहे.

देशातील ६० शहरांमध्ये झालेल्या जी 20 परिषदेच्या अंदाजे २२० बैठकांमध्ये जवळपास ३०,००० प्रतिनिधी, आणि त्या अनुषंगाने झालेल्या कार्यक्रमांमध्ये १००,०००हून अधिक जण सहभागी झाले होते. विविध मंत्रालयांनीदेखील नागरिकांना त्यांच्या सक्रिय सहभागासाठी परिश्रमपूर्वक प्रोत्साहन दिले. या अंतर्गत शिक्षण मंत्रालयाने जन भागीदारी कार्यक्रमांचे आयोजन केले. राज्यस्तरापासून जिल्हे, ग्रामपंचायती  आणि शाळांपर्यंत विविध पातळ्यांवर आयोजित केलेल्या उपक्रमांमुळे लोकांच्या मनात भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या केंद्रस्थानी असलेल्या  प्राधान्यक्रमांविषयी जागरूकता निर्माण झाली. या सर्व उपक्रमांमध्ये  एकत्रितपणे २३.३ कोटींहून अधिक जण सहभागी झाले, ज्यात १५.७ कोटी विद्यार्थी, २५.५ लाख शिक्षक आणि ५१.१ लाख समुदाय सदस्यांचा समावेश आहे.

जन भागीदारीचा महिमा हा या सहभागाविषयीच्या आकडेवारीपेक्षा खूप अधिक आहे. जी 20 विद्यापीठ  व्याख्यान मालिकेपासून ते परस्परसंवादी जी 20 मॉडेल बैठका, शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष जी 20 सत्र, महत्त्वाच्या महोत्सवांमध्ये जी 20 दालन, आणि मनमोहक अशा  #G20India च्या कहाण्या या आणि अशा अनेक आकर्षक उपक्रमांच्या श्रेणीने  लोकांचा  व्यापक आणि उत्साहानं परिपूर्ण असा सहभाग मिळवण्यात प्रमुख भूमिका बजावली. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी  जी 20 प्रतिनिधींचे स्वागत, स्थानिक आणि प्रादेशिक स्तरावर उत्साही वातावरणनिर्मिती आणि त्यांच्या यशोगाथा, तसेच परंपरांचे दर्शन घडवण्यात अहमिहिकेने भाग घेतला. यामुळे बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे प्रगतीला  हातभार लावणारे विकास उपक्रम राबविण्याची संधी मिळाली.  

मणिपूरमधील लोकाटक सरोवराचा जीर्णोद्धार, मुंबईतील शहरी स्वच्छता मोहिमा किंवा लखनौमधील पायाभूत सुविधांची सुधारणा ही याची काही बोलकी उदाहरणे आहेत. विविध देशांच्या जी 20 प्रतिनिधींनी एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमाचा अनुभव घेतला आणि कारागिरांच्या केंद्रांना प्रत्यक्ष भेट दिली. त्याचबरोबर भारताच्या मनमोहक सौंदर्याचा अनुभव  आणि  वास्तुशास्त्रीय वैभवाचा आस्वाद यामुळे कोविडनंतरच्या पर्यटनाला  एक मजबूत पुनरुज्जीवन मिळाले. जागतिक आव्हानाविषयी सामाजिक औत्सुक्य आणि प्रतिबद्धता तयार करण्यासाठी विविध कृती गट आणि प्रतिबद्धता गट यांनी एक सामर्थ्यशाली व्यासपीठ म्हणून कार्य केले.

युवा 20 हा कार्यक्रम विशेष प्रभावी ठरला आणि त्यातून जन भागीदारीचा  दृष्टिकोन अधिक दृढ झाला.  समाज माध्यम मंच हे जी 20 प्रक्रियेत एक प्रमुख प्रसार प्रचार साधन म्हणून उदयास आले, त्यामुळे उपक्रमांकडे  नागरिकांचे लक्ष वेधले गेले आणि सार्वजनिक सहभाग दिवसेंदिवस वाढत गेला, परिणामी या कार्यक्रमांदरम्यान  १४ ट्रिलियनहून अधिक सोशल मीडिया इंप्रेशन्स निर्माण झाली. जन भागीदारीसंदर्भात दोन जागतिक विक्रम रचले गेले. एक म्हणजे वाराणसीतील जी 20 प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये ८०० शाळांमधील १.२५ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्याच वेळी, ४५० लंबानी कारागिरांनी १,००० अद्वितीय भरतकाम पॅचेसच्या माध्यमातून एक अप्रतिम कलाकृती तयार करून केलेले त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन! 

आपल्या एकत्रित भविष्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर जी 20 च्या निमित्ताने व्यापक वादविवाद आणि चर्चासत्रे झाली. त्यापैकी काही उल्लेखनीय गोष्टी म्हणजे  समाजाने दर्शवलेली सक्रिय समर्थनाची तयारी, हे लक्ष्य पूर्ण होण्याकरिता आवश्यक संदेश वहन जागतिक समुदायातून होणे महत्त्वाचे असते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे  पर्यावरणाला अनुकूल जीवनशैली ज्यामुळे आपल्या जीवनात पर्यावरण स्नेही सवयींना प्रोत्साहन मिळते. त्याचप्रमाणे, डिजिटल डिलिव्हरीचे महत्त्व जे सर्वांना आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये डिजिटल सुविधा विकसित करण्यास प्रोत्साहित करते. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर लक्ष केंद्रित केल्याने महिलांची  सामाजिक प्रगतीमधली महत्त्वाची भूमिका स्पष्टपणे मांडता येते, तसेच शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यावर भर दिल्यामुळे जागतिक समृद्धीच्या केंद्रस्थानी मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती होण्यास गती येते. ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे जी 20 चे अध्यक्षपद हे लोकांचे अध्यक्षपद असल्याचे म्हटले होते. आपल्या देशाने ते प्रत्यक्षात घडवून दाखवलेले आहे!

Web Title: India has proved how and why India's presidency of the G-20 summit is different.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.