TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 09:14 AM2024-05-16T09:14:40+5:302024-05-16T09:41:44+5:30

टाटा समूह (TATA Group) हा भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक आहे. १९२५ मध्ये टाटा सन्सनं आपल्या पहिल्या महिला संचालक नवाजबाई सेठ यांची नियुक्ती केली.

टाटा समूह (TATA Group) हा भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक आहे. १५० हून अधिक देशांमध्ये त्याचे कामकाज आहे. १०० देशांमध्ये त्यांचे अस्तित्व आहे. त्याची पायाभरणी जमशेदजी नुसरवानजी टाटा यांनी १८६८ मध्ये केली.

टाटा कुटुंबातील सदस्य पिढ्यानपिढ्या या समूहाचं नेतृत्व करीत आहेत. समूहाचं बाजारमूल्य अब्जावधींमध्ये आहे. पती रतनजी टाटा यांच्या निधनानंतर १९२५ मध्ये टाटा सन्सनं आपल्या पहिल्या महिला संचालक नवाजबाई सेठ यांची नियुक्ती केली. १९६५ सालापर्यंत त्या या पदावर होत्या.

रतनजी टाटा हे जमशेदजी टाटा यांचे बंधू होते. नवाजबाई सेठ यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या अर्देशिर मेरवानजी सेठ यांच्या धाकट्या कन्या होत्या. १९१५ मध्ये हे दाम्पत्य इंग्लंडला गेलं. त्यांनी नवल टाटा यांना दत्तक घेतलं. नवल हे रतन टाटा यांचे वडील होते. अशा प्रकारे नवाजबाई सेठ या रतन टाटा यांच्या आजी आहेत. रतन टाटा हे टाटा सन्सचे चेअरमन एमेरिट्स आहेत.

रतनजी आणि नवाजबाई इंग्लंडमध्ये राहत असत. ते एलिट सोशल सर्कलचा हिस्सा होते. पाचवे किंग जॉर्ज आणि राणी मेरी यांच्याशी त्यांची चांगली मैत्री होती. नवाजबाईंनी स्वत:ला परोपकारी कार्यात झोकून दिलं. परोपकारी कामांना दिलखुलासपणे सहकार्य केलं.

१९२८ मध्ये त्यांनी सर रतन टाटा इन्स्टिट्यूटची (आरटीआय) स्थापना केली. सर रतन टाटा इन्स्टिट्यूट (आरटीआय) आपल्या उत्कृष्टतेसाठी ओळखली जाते. स्वयंपाक, भरतकाम, शिवणकाम, कपडे धुणे यांसारख्या क्षेत्रांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देऊन ते वंचित महिलांना मदत करते.

लेडी नवाजबाई टाटा यांनी १९३२ मध्ये सर रतन टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. संघटनेत त्यांचा बऱ्यापैकी दबदबा होता. जेआरडी टाटा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांचा सल्ला घेत असत. इतकंच नाही तर त्यांच्या दृष्टिकोनाचं खूप कौतुक करायचे. कंपनीनं जमशेदजी टाटा यांच्या प्रस्थापित तत्त्वांचं आणि दूरदृष्टीचं पालन करेल याची खात्री ते खात्रीही करत.