'रोज किती तास स्क्रीन पाहता?' आजी-आजोबांनाही हा प्रश्न विचारायला हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 13:00 IST2026-02-22T12:59:22+5:302026-02-22T13:00:18+5:30
स्क्रीनचं व्यसन जडलेल्या नातवंडांची काळजी अख्ख्या जगाला पडली आहे; पण आता त्या मुलांच्या आजी-आजोबांनाही हा प्रश्न विचारायला हवा!

'रोज किती तास स्क्रीन पाहता?' आजी-आजोबांनाही हा प्रश्न विचारायला हवा
सुखदा परवा खूप दिवसांनी भेटली. सु तिचे आईबाबा तिच्याबरोबर राहतात. 'आईबाबा काय म्हणतात?' असं विचारलं तेव्हा सुखदा जे म्हणाली, ते तिच्या पिढीतल्या बऱ्याच मुलामुलींचं उत्तर आणि अनुभव आहे. सुखदा म्हणाली, 'आईबाबा हल्ली काहीही म्हणत नाहीत, बोलत नाहीत, बोललेलं ऐकतही नाहीत. बघावं तेव्हा दोघं मोबाइलमध्ये डोकं घालून बसलेले असतात. मोबाइल हातात नसतो तेव्हा डोळ्यांसमोर मोठ्या आवाजात टीव्ही सुरू असतो.
एखादा प्रश्न तीन-तीनदा विचारल्याशिवाय त्याचं उत्तर मिळत नाही... डायनिंग टेबलावर हात वाळेपर्यंत गप्पा वगैरे गोष्टी आता जणू इतिहासजमाच झाल्या आहेत. सारखं काय त्या मोबाइलमध्ये? जरा बोला की घरातल्यांशी पण... असं म्हटलं की वादाला एक निमित्त!'
थोडीशी अशीच तक्रार अनिलचीही आहे. त्याच्या आईच्या खोलीतला टीव्ही सकाळी उठल्यापासून सुरू असतो. मुलगा, सून, नातवंडं कुणाशीही आईचा संवाद नाही. आपण बरं, आपला टीव्ही बरा... रात्री झोपताना मोबाइलवर स्क्रोलिंग करत राहते. बाहेर जा, मैत्रिणींना भेट, नातेवाइकांना बोलव असं काही म्हटलं तरी तिचा प्रतिसाद शून्य.... पूर्वी तिला वाचनाची आवड होती, स्वयंपाकघरात चार नवीन प्रकार करून बघायची हौस होती; पण, आता टीव्ही एके टीव्ही !
सध्या अनेक घरांमधल्या मध्यमवयीन मुला-सुनांची, लेक-जावयांची हीच कहाणी आहे त्यांचे आईवडील, सासू-सासरे सगळेच कुठल्या ना कुठल्या स्क्रीनला दिवसभर डोळे चिकटवून बसलेले असतात. हे असं का?
वाढलेलं आयुर्मान हे पहिलं कारण... बहुतेक मध्यम आणि उच्चमध्यमवर्गीय घरांमध्ये मदतनीस असतातच. ज्येष्ठ नागरिकांवर जबाबदाऱ्या नाहीत आणि हाताला काम नाही. मग, काय करायचं? - तर स्क्रीन पाहायचा! ज्या घरांमध्ये अजूनही एकत्र कुटुंब आहे तिथे उरलेल्या दोन पिढ्या आपापल्या नोकरीधंद्यासाठी, शिक्षणासाठी दिवसभर घराबाहेर पडतात... मग, ज्येष्ठांनी काय करायचं? - याचं उत्तर हाताशी असलेला स्मार्ट फोन आणि टीव्ही.
स्मार्ट फोनपूर्व काळात हे ज्येष्ठ नागरिक काय करीत? - वाहतुकीची भीती न बाळगता बाहेर फेरफटका मारणं सोपं होतं. असुरक्षितता तुलनेनं फारच कमी होती. घरात करण्यासारखी कामंही खूप होती. वेळ कसा घालवायचा, हा प्रश्न नव्हता. आयुष्य एकसुरी, संथ आणि कंटाळवाणं असणं हे काहीसं गृहीत होतं... ते तसं असण्याबद्दल तक्रारी नव्हत्या. पण, मोबाइल स्क्रीन हाती आले आणि परिस्थिती झपाट्याने बदलली. व्हॉट्सअॅप वापरायला अत्यंत सोपं, फेसबुकपण जमायला लागतंच, यू-ट्यूबवर तर मनोरंजनाचा मोफत खजिना, त्यात अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स...
मित्र-मैत्रिणींना फोन, मेसेजेस, फॉरवर्ड आणि गुड मॉर्निंग-गुड नाइटच्या खेळाची झिंग - हे सारं सर्वांच्याच मेंदूला गुंगवून टाकणारं आहे... हाताशी वेळच वेळ असलेले ज्येष्ठ त्या गुंगीतून कसे वाचतील? वापरणाऱ्याचा वेळ चांगला जावा, त्यातून त्यांना काहीतरी 'मिळावं' हा व्हर्चुअल माध्यमांच्या निर्मितीमागचा उद्देश नाही. जो 'आत' शिरतो, त्याला बाहेर पडताच येऊ नये यावर तर त्या जगात कोट्यवधींची उलाढाल होऊ शकते.
पेपर वाचून संपतो. सिनेमा बघून संपतो. संपल्यावर मेंदूला 'स्टॉप क्लू' मिळतो; मग, मेंदू दुसऱ्या गोष्टींकडे वळतो. व्हर्चुअल जगात असा 'स्टॉप क्लू' मेंदूला मिळू नये अशी तजवीजच असते. त्यासाठी मग अॅक्सेसिबिलिटी, व्हॉल्यूम, पोटन्सी आणि नॉव्हेल्टी अशा चार निकषांवर बांधलेलं प्रॉडक्ट हातातल्या स्क्रीनवर येतं. बरं, ज्येष्ठांच्या हाती असलेल्या वेळाकडे आता 'प्रॉडक्टिव्ह मॅन अवर्स' म्हणूनही पाहिलं जात नाही, त्यामुळे ते त्या वेळाचं काय करतात याकडेही कुणाचं लक्ष नाही.
झोप न येणं, ऐकू न येणं, हाताला मुंग्या येणं, हाडं झिजणं, कुणाशीही संवाद नसणं, चिडचिड होणं हे प्रश्न ज्येष्ठांमध्ये दिसले की मुलं त्यांना डॉक्टरांकडे नेतात. विविध चाचण्या, गरजेच्या जीवनसत्त्वांची कमरतरता, एखाद्या संभाव्य आजाराची सुरुवात म्हणून या लक्षणांकडे पाहिलं जातं. पण, 'किती तास स्क्रीन पाहता?' हा प्रश्न मात्र डॉक्टर्सही अजून विचारताना दिसत नाहीत. तो प्रश्न आता आजी-आजोबांनाही विचारायला हवा.
डॉ शिरिषा साठे (मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक)
shirisha1964@gmail.com