गावसकर, कपिल देव, इमरान खान... आणि एक सुखद दिलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 06:01 IST2026-03-05T06:00:56+5:302026-03-05T06:01:17+5:30
जगभरातल्या जुन्या-जाणत्या क्रिकेटपटूंनी इमरानबाबत पाकिस्तानला केलेली विनंती हे सध्याच्या युद्धग्रस्त, विखारी वातावरणातले सौहार्द फार महत्त्वाचे आहे!

गावसकर, कपिल देव, इमरान खान... आणि एक सुखद दिलासा!
- कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार-संपादक
राज्यसभेचे माजी सदस्य
‘सैराट’ असो वा ‘एक दुजे के लिए’, ‘चोरी चोरी’ असो की ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, ‘मुगल-ए- अझम’ असो किंवा ‘जोधा अकबर’ - अशा अनेक अतिशय लोकप्रिय हिंदी चित्रपटांत हिंदू-मुस्लीम, ब्राह्मण-दलित वा तमिळ भाषिक आणि उत्तर भारतातील हिंदू कुटुंबं यांच्यातील प्रेमसंबंध, विवाह, कौटुंबिक कलह अतिशय प्रभावीपणे चित्रित केलेले आहेत. अशा अनेक चित्रपटांतून लोकांपर्यंत जाणारा एकच संदेश आहे - प्रेमाला धर्म, जात, प्रांत, भाषा अशी कोणतीही अडचण नसते; असता कामा नये !
गेल्या काही वर्षांत अशा काही चित्रपटांच्या विरोधात मोर्चे निघाले, आंदोलने झाली, थिएटर्स बंद पाडली गेली, जाळपोळही झाली. पूर्वी हे प्रकार होत नसत. त्यावेळच्या भाषेत असे अनेक चित्रपट सिल्व्हर वा गोल्डन ज्युबिली साजरी करीत. निर्माते व दिग्दर्शकही हिंदू-मुस्लीम कुणीही असत. दिलीप कुमार, मीनाकुमारी, वहिदा रहमान, मधुबाला, सायरा बानो यांच्यावर जीव टाकताना त्यांचा धर्म कधी कुणी तपासला नाही. राज कपूर, देव आनंद, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांच्यापैकी कोणीही त्यांच्या धर्माने ओळखला जात नसे. सलमान, आमीर खान आणि शाहरूख या तिघांच्या आडनावावरून त्यांचा धर्म अधोरेखित करण्याची धर्मांध प्रथा अलीकडची... तरीही, त्यांची लोकप्रियता सर्वधर्मीय समाजात कायम राहिली आणि हे तिघे खान तर गेली ३०-३५ वर्षे लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. विविध निमित्तांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याच्या अनेक घोषणा-गर्जना झाल्या; पण जनमानसात या अभिनेत्यांबद्दल आकर्षण, प्रेम आणि आस्था तशीच टिकून आहे. मग समाजाचे खरे चित्र कोणते? प्रचारात दिसणारी कंठाळी धर्मांधता की समाजात रुजलेली सहिष्णुता, समंजसपणा, संस्कृती?
फाळणी झाल्यानंतर, अगदी हिंस्र हिंदू-मुस्लीम हत्याकांडानंतरही काही वर्षांतच भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होत असत. मी स्वतः मुंबईच्या शाळेत असताना ब्रेबॉर्न स्टेडियमला असा सामना पाहिला होता. त्या काळात म्हणजे १९५२ ते अगदी १९८० पर्यंत भारत-पाकिस्तान सामन्यांवर धर्मांधतेचे सावट आले नव्हते. साधारणपणे १९७० नंतर काहीसा विरोध दिसू लागला होता. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत त्या विरोधाचे विषारी आविष्कार आता हिंस्र झाले आहेत. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्येही भारताने पाकिस्तानशी खेळायचे की नाही, यावर जोरदार चर्चा होत असते. ‘खेळात राजकारण आणता कामा नये’ असे म्हणणारेही धर्माचे बेबंद राजकारण करताना आपण पाहात आहोत.
अशा स्थितीतही सुनील गावसकर, कपिल देव यांनी इतर काही क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या माजी कर्णधारांसह पाकिस्तान सरकारला पत्र लिहून इमरान खान या एकेकाळच्या त्यांच्या प्रतिस्पर्धी सहकाऱ्याला तुरुंगात छळू नये, सहिष्णुतेने वागवावे, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय केला जाऊ नये, असे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या या आवाहनावर कट्टर हिंदुत्ववाद्यांनी हल्ला चढवलेला नाही, हा एक दिलासा!
एक काळ अगदी (अलीकडचा) असा होता की, इमरान खान यांना भारतात प्रचंड प्रमाणावर फॅन्स होते- अगदी पाकिस्तानपेक्षा जास्त. सचिन तेंडुलकरांना पाकिस्तानात अचाट फॅन फॉलोइंग होते. जनरल मुशर्रफ भारतात आले असताना त्यांना विचारले गेले होते की ‘भारत-पाकिस्तान यांची संयुक्त क्रिकेट टीम असावी का?’ जनरल मुशर्रफ म्हणाले, ‘उत्तम कल्पना आहे!’ मग त्यांना दुसऱ्या पत्रकाराने विचारले, ‘मग अशा संयुक्त टीमचा कप्तान कोण असायला हवा?’- बहुतेकांना वाटले की ते कुणा पाकिस्तानी क्रिकेटपटूचे (इमरानचे!) नाव घेतील. पण ते म्हणाले, ‘राहुल द्रविड!’- तरीही एका वार्ताहराने त्यांना पुन्हा छेडले, ‘सचिन का नको?’- तेव्हा मुशर्रफ म्हणाले, ‘सचिन सर्वोत्तम खेळाडू आहे; पण कॅप्टन म्हणून द्रविड अधिक समतोल आहे. सचिन हा ‘स्टार’ आहे; पण स्टार हा उत्तम कॅप्टन असेलच असे नाही!’
या (कथित) संवादातील सत्यता काहीही असो; पण मुद्दा हा आहे की समंजसपणा आणि सत्प्रवृत्तीच्या माध्यमातून भारत-पाकिस्तान तणावाचे रूपांतर मैत्रीत नाही, तर निदान सहकार्यात आणि परस्पर सहभावनेत झाले तर या दोन देशांतील तणाव निदान काहीसा तरी दूर होईल. सध्या अवघ्या आखातात युद्धाच्या ज्वाळा भडकलेल्या असताना या दोन शेजाऱ्यांनी-तिथले राज्यकर्ते नसले तरी किमान माणुसकीची कदर असलेल्या नागरिकांनी तरी- या सहजीवनाच्या शक्यतेचा विचार करायला काय हरकत आहे?
- क्रिकेटपटूंनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहून केलेले आवाहन हा सध्याच्या विखारी तणावातला एक दिलासाच म्हणायचा. अजून तरी गावसकर आणि कपिल देव यांना ‘पाकिस्तानात जा’ असा आदेश दिला गेला नाही हे या पार्श्वभूमीवर समाधानाचे आहे!
ketkarkumar@gmail.com