लेख: ‘करण जोहर ओझेंपिक घेत असेल की विगोवी?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 06:24 IST2025-06-21T06:22:39+5:302025-06-21T06:24:47+5:30

Karan Johar: चेहरा खप्पड म्हणता येईल एवढे बारीक झालेले भारतीय सेलिब्रिटीज रेड कार्पेटवर दिसायला लागले आणि त्यांच्या बारीक होण्यामागच्या कारणांची चर्चा सुरू झाली.

filmmaker Karan Johar becomes the face of The Bridal Retreat | लेख: ‘करण जोहर ओझेंपिक घेत असेल की विगोवी?’

लेख: ‘करण जोहर ओझेंपिक घेत असेल की विगोवी?’

भक्ती चपळगावकर
मुक्त पत्रकार

करण जोहर, राम कपूर, कपिल शर्मा… चेहरा खप्पड म्हणता येईल एवढे बारीक झालेले भारतीय सेलिब्रिटीज रेड कार्पेटवर दिसायला लागले आणि त्यांच्या बारीक होण्यामागच्या कारणांची चर्चा सुरू झाली. ‘करण जोहर ओझेंपिक घेत असेल की विगोवी?’ अशा चर्चा सुरू झाल्या आणि त्याने ताबडतोब ‘मी रोज एकवेळ जेवून वजन कमी केले आहे’, असे स्पष्टीकरण दिले. सेलिब्रिटीजनी नाकारले तरी एकूण आता जगभर लोक वजन कमी करण्याची औषधं नियमित घेऊ लागले आहेत, हे सत्य  आहे.

वेटलॉस औषधांचा महत्त्वाचा घटक, सेमाग्लुटाइड - आपल्या औषधांमध्ये वापरून नोव्हो नॉरडिस्क या डेन्मार्कच्या कंपनीने या क्षेत्रातील दोन इंजेक्टेबल औषधे बाजारात आणली - ओझेंपिक आणि विगोवी.  पोटात घ्यायच्या काही गोळ्यांमध्येही सेमाग्लुटाइड आहे. यापूर्वीही वजन कमी करण्यासाठी औषधे विकली जात, पण त्याने वर्षाला तीन ते पाच टक्के वजन कमी व्हायचे. ही नवी औषधे वर्षाला एकूण वजनाच्या पंधरा ते वीस टक्के वजन कमी करू शकतात. त्यामुळेच ‘वेटलॉस औषधां’ची बाजारपेठ भारतात २०२० च्या सुमारात १३० कोटी होती, आता ती पावणे सहाशे कोटींच्या वर गेली आहे. 

प्रत्येक व्यक्तीची एक नैसर्गिक ठेवण असते. कुणी जाड, बारीक, बुटके, उंच, काळे, सावळे. आपण जसे आहोत तसे दिसणे नाकारणे हा रोग समाज माध्यमांमुळे फोफावला आहे. याला सौंदर्याच्या पाश्चिमात्य फुटपट्ट्या आणि सेलिब्रिटीजही कारणीभूत आहेत. पण ‘वजन कमी असणे’ किंवा अधिक योग्यरीत्या सांगायचे झाले तर ‘ताब्यात असणे’ फार महत्त्वाचे झाले आहे. मधुमेह, फॅटी लिव्हर, हृदयरोग, काही प्रकारचे कॅन्सर, अंगदुखी अशा अनेक गंभीर आजारांच्या मागे वाढलेले वजन हे मुख्य कारण आहे. 

मधुमेहासाठी दिली जाणारी औषधे वजन कमी करतात आणि त्यामुळे रुग्णाला असलेले इतर आजारही नियंत्रणात राहतात, हे लक्षात आल्यावर प्रयोग सुरू झाले. आता ओझेंपिक, विगोवी, मंजारो यासारखी इंजेक्शनद्वारे दिली जाणारी औषधे विकायला अनेक देशांत परवानगी देण्यात आली. इंग्लंडमध्ये त्यांच्या राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेद्वारे ही औषधे अतिलठ्ठ आणि त्याचबरोबर इतर आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांना दिली जात आहेत.

बदललेल्या जीवनशैलीमुळे गेल्या दोन दशकांत लठ्ठपणाच्या लाटेने लोक जास्त त्रस्त झाले आहेत. आहार-बदल आणि व्यायाम करून वजन कमी करा, असा सल्ला सर्वजण देत असले, तरी ते तेवढे सोपे नाही. जीवनशैलीला नेहमीच पर्याय सापडेल, असे नाही. बऱ्याचदा ताटात पडणारे साधे अन्नही जैवरसायनांचा मारा केलेले असते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. चमचमीत मीठाळ, गोड अन्न, तेलकट, अतिप्रक्रिया केलेले अन्नपदार्थ ही जागतिक समस्या बनली आहे.

सध्या मोठ्या प्रमाणावर सामान्य रुग्णही वजन कमी करण्यासाठीची औषधे नियमित घेतात, कारण लठ्ठपणा आणि त्या अनुषंगाने झालेले आजार! ही औषधे घेतल्यावर वजन झपाट्याने कमी होते आणि शरीरावर सुरकुत्या दिसतात. पण इतर आजार कमी होणार असले, तर त्याकडे दुर्लक्ष करावे, असे डॉक्टरांना वाटते. असे असले तरी या औषधांचे सेवन फक्त डॉक्टरांच्या निगराणीखाली आणि गरज असली तरच झाले पाहिजे, असा इशाराही डॉक्टर देतात. सध्या या औषधांच्या वापरासंदर्भात कडक नियम आहेत, ते तसेच राहणे गरजेचे आहे. 

वेटलॉस औषधांच्या (विगोवी/ओझेंपिक) केंद्रस्थानी ‘सेमाग्लुटाइड’ हे औषध आहे. त्यात जीएलपी १ (ग्लुकागॉन लाइक पेप्टाइड १) आहे. हे हॉर्मोन आपल्या लहान आतड्यांतही बनते. रक्तातली साखर वाढली की, लहान आतड्यांतून ‘जीएलपी १’ शरीराला अधिक इन्सुलिन बनवण्याचा संदेश देते आणि मग रक्तातली साखर कमी होते. मंजारोमध्ये ‘जीएलपी १’ बरोबरच ‘जीआयपी’ नावाचे आणखी एक औषध आहे. ही दोन्ही औषधे मेंदूला ‘पोट भरले आहे’ असे संदेश देतात आणि रुग्णांच्या खाण्यावर आपोआप नियंत्रण येते. पण ही औषधे घेणाऱ्यांना पोटाच्या अनेक विकारांना तोंड द्यावे लागते. पोटदुखी, मळमळ होते. शिवाय जर औषधे थांबवली आणि पूर्वीप्रमाणे खायला सुरुवात केली तर वजन पूर्ववत होते. म्हणजे ही औषधे लठ्ठपणावर कायमचा उपाय नाहीत. वजन कमी ठेवायचे असेल तर ती नियमित घेणे आणि जीवनशैली बदलणे भाग आहे.

मुळात लठ्ठपणा हा आजार आहे, पण तो किती प्रमाणात असेल तर ‘आजार’ मानण्यात यावा, याचे नियम कडक होणे गरजेचे आहे. बॅरियाट्रिक सर्जरी करताना हे निकष स्पष्ट आहेत. तसेच निकष या औषधांसाठी पण आहेतच. पण ही औषधे मिळवणे सोपे झाले तर त्याचा विपरीत परिणाम होईल. आता रुग्णांबरोबरच भारतातील श्रीमंत वर्गाने त्याचा वापर सुरू केला आहेच. यापुढील काळात ‘माझे दहा किलो वजन जास्त आहे आणि माझे दोन महिन्यांनी लग्न आहे, त्यासाठी मला औषध घ्यायचे आहे’ - अशा मागण्या आल्या तर आश्चर्य वाटायला नको. असा वापर रुग्णांसाठी घातक ठरू शकेल, असे इशारे जगभरातील महत्त्वाच्या आरोग्य यंत्रणा देत आहेत, त्याची दखल घेणे क्रमप्राप्त होय!

Web Title: filmmaker Karan Johar becomes the face of The Bridal Retreat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.