लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 07:15 IST2025-06-27T07:14:13+5:302025-06-27T07:15:04+5:30

रक्ताळलेल्या जगाला ‘शांतिदूत’ हवा आहे. हस्तांदोलने, आलिंगनाची ‘मोदी नीती’ ‘मुत्सद्दी मध्यस्था’च्या प्रतीक्षेत असलेल्या देशांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो!

Explained on How Donald Trump's ever-changing roles are impacting global politics | लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’

लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’

- प्रभू चावला (ज्येष्ठ पत्रकार)
जेव्हा संघर्ष उद्भवतो तेव्हा मुत्सद्दी म्हणून मिरवण्यासाठी पुढारी लगेच धावतात; श्रेय मिळवणे   हा हेतूही असतोच. ‘भारत पाकिस्तानचे  युद्ध मीच थांबवले’,  असे अमेरिकेचे अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सांगितले, तेव्हा एकच सन्नाटा पसरला. ट्रम्प यांचे हे दिवास्वप्न मोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३५  मिनिटे खर्ची घालावी लागली असे कळते. 

‘१९७२ च्या सिमला करारानुसार उभय देशांच्या लष्करात झालेल्या समझोत्याचा युद्धबंदी हा परिपाक होता’, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. इराण-इस्रायल, हमास-इस्रायल, रशिया-युक्रेन, भारत-पाकिस्तान अशा संघर्षात सध्या झडणाऱ्या शाब्दिक चकमकी पाहता, हा विषय किती गंभीर आहे, हेच दिसते. 

जगाला मान्य होतील, असे मध्यस्थच आता राहिलेले नाहीत. यातून मुत्सद्देगिरीने मार्ग काढण्याचे प्रयत्न खुंटतात आणि हिंसाचाराला मोकळे रान मिळते. डावपेचात्मक मध्यस्थीऐवजी सध्या स्वतःला पुढे करणाऱ्या सौदेबाजांचे पीक आल्यामुळे जागतिक घडी विस्कटल्यासारखी झाली आहे. विश्वासार्ह मध्यस्थ नसलेल्या जगात आपण राहतो आहोत. 

२०२५  साली जगभर संघर्षाचा वणवा पेटलेला असताना विश्वास टाकता येईल असे शांतिदूत नसल्याने कुणीच कुणाला जुमानत नाही, असे चित्र आहे. फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी शांतता घडवून आणली. जिमी कार्टर यांनी १९७८ मध्ये कॅम्प डेव्हिड करार केला. त्यांच्यासारखे महान मुत्सद्दी आता केवळ इतिहासात उरले आहेत. सध्याचे तथाकथित शांततादूत प्रत्यक्षात सौदेबाज आहेत. 

ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थी बरेच काही सांगतात. सर्बिया कोसोवो यांच्यातील मध्यस्थीचे फोटो झळकले; पण आठवड्याच्या आतच ती संपली. उत्तर कोरियाच्या शिखर बैठकीतूनही काही निष्पन्न झाले नाही आणि दक्षिण आशियात त्यांनी केलेला दावा भारताने सपशेल फेटाळला. 

रशियाच्या व्लादिमीर पुतीन यांनीही २०२५ मध्ये मॉस्को-तेहरान यांच्यात करार घडवून आणला. पश्चिम आशियातील शांतीदूत म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याचा पुतीन यांचा प्रयत्न होता. सध्या ते इराणला ड्रोन पुरवणे, सल्ले देणे यात मश्गुल आहेत. चीनची स्वयंघोषित मध्यस्थीही ‘स्वार्थी’च असते.  

जागतिक संघर्ष रोखण्यासाठी जन्माला आलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाला नकाराधिकारांच्या राजकारणाने पांगळे केले आहे. २०२३  साली संयुक्त राष्ट्रांनी गाझा ठराव केला परंतु अमेरिका आणि रशियाच्या अडथळ्यामुळे तो गारद झाला. 

तुर्की आणि कतार यांनीही मुत्सद्देगिरी करून पाहिली. कतारने जानेवारी २०२५ मध्ये हमास-इस्रायल संघर्ष ११ दिवसांसाठी थांबवला खरा,  परंतु शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती ताकद या प्रयत्नात नव्हती. जून महिन्यात इराण-इस्रायलमध्ये पुन्हा संघर्ष उद्भवला. सध्याची कोंडी अशी, की थेट बोलणी होण्यासाठी एकमेकांवर विश्वास लागतो; तोच नाही. 

इस्रायल स्वसंरक्षणाचे दावे करतो. इराण धार्मिक आधारावर पश्चिमेशी पंगा घेतो. बाहेरच्या मध्यस्थीशिवाय त्यांच्यात समझोता  अशक्य आहे. ट्रम्प इस्रायलची बाजू घेऊन इराणला धमक्या देत असतील तर त्यांची मध्यस्थी इराण का स्वीकारेल? तीच गोष्ट पुतीन यांची. ते तेहरानच्या बाजूने झुकलेले आहेत.

- परिणाम? जेथे तेल आणि शस्त्रास्त्रांच्या व्यापाराला फक्त महत्त्व आहे, शांतता-संवादासाठीच्या मध्यस्थीला जागा नाही, अशी एक भूराजकीय बाजारपेठ तयार झाली आहे. बाजार चलित उन्मादामुळे समझोते हे एक नाटक झाले आहे. शांततेचे प्रयत्न छायाचित्रांपुरते उरले असून त्यांचे तात्त्विक अधिष्ठान लोप पावले आहे. 

भारत-पाक संघर्षात ट्रम्प स्वतःला घुसवू पाहात होते ते काश्मीरसाठी नव्हे, तर एक ‘जागतिक संकटमोचक’ म्हणून आपली प्रतिमा ठळक व्हावी, यासाठी! मोदींनी त्यांचा दावा फेटाळला, त्यामागे केवळ राष्ट्रवादी भूमिका नव्हती. ‘आम्हाला तुमचे नाटक नको आहे’, असे सांगणे होते. 

जगाला सवंगपणा करणारे शांतिदूत नकोत, नैतिक अधिकार असलेले मुत्सद्दी हवे आहेत. असे एखादे व्यक्तिमत्त्व उभे राहत नाही तोवर जगात रक्ताचे पाट वाहतच राहतील. हजारो बळी जातील. शस्त्रास्त्र उद्योग फोफावत राहील. 

जगाला गरज आहे ती सच्च्या शांतिदूताची; सत्तेसाठी हपापलेल्या संधिसाधूंची नाही! मध्यस्थी एकेकाळी कूटनीतीचा   परमोत्कर्ष साधणारी कला होती. आता ते केवळ एक विनोदी मीम उरले आहे. 

मध्यस्थीविनाच्या या अपयशाचा फायदा शस्त्रनिर्मिती उद्योग, तेलकंपन्या आणि बांधकाम उद्योगाला होतो.  पश्चिमी ऐक्य दुर्बल झाले तर रशिया आणि चीनचा भूराजकीय फायदा होतो. दरम्यान अमेरिका शस्त्रे विकून स्वतःचे वजन वाढवते. 

शस्त्रांचे व्यापारी, तेल कंपन्यांचे खिसे भरतात आणि मोठमोठे बांधकामाचे सौदे होतात. ही जागतिक हाव आणि संधिसाधूपणावर कूटनीतीने मात केली पाहिजे तरच जगभरातला रक्तपात थांबेल. ..असा मजबूत जागतिक मध्यस्थ होण्याची संधी भारताला आहे. गेल्या दशकभरातील हस्तांदोलने आणि आलिंगनाची ‘मोदी नीती’ हा ‘मुत्सद्दी मध्यस्था’च्या प्रतीक्षेत असलेल्या अस्वस्थ जगासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो!

Web Title: Explained on How Donald Trump's ever-changing roles are impacting global politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.