आंदोलनाला हिंसेचे गालबोट; शेतकऱ्यांना दिल्लीत घुसण्यापासून रोखण्यात नेत्यांना अपयश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 05:59 AM2021-01-28T05:59:18+5:302021-01-28T05:59:36+5:30

आंदोलक शेतकऱ्यांचे नेते राजेश टिकैत यांनी तर सरकारमधील मंडळींनीच आंदोलन बदनाम करण्यासाठी दीप सिद्धूला घुसवल्याचा आरोप केला आहे. मात्र हिंसाचारामुळे  आंदोलनाची धार  कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Editorial on violence in Farmers agitation, Leaders fail to stop farmers from entering Delhi | आंदोलनाला हिंसेचे गालबोट; शेतकऱ्यांना दिल्लीत घुसण्यापासून रोखण्यात नेत्यांना अपयश

आंदोलनाला हिंसेचे गालबोट; शेतकऱ्यांना दिल्लीत घुसण्यापासून रोखण्यात नेत्यांना अपयश

googlenewsNext

देशाच्या राजधानीत राजपथावर प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा सुरू असतानाच सीमेवरून दिल्लीत घुसलेल्या हजारो आंदोलक शेतकऱ्यांनी केलेल्या हिंसाचाराचा निषेध करावा तितका कमीच आहे. कृषी कायद्याच्या विरोधात तब्बल दोन महिने दिल्लीच्या सर्व सीमांवर बसलेल्या शेतकऱ्यांचे शांततापूर्वक आंदोलन त्यामुळे बदनाम झाले असून, त्यांच्याविषयीची सहानुभूतीही कमी होणार आहे. ठरवून दिलेला मार्ग सोडून दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत ट्रॅक्टरवर आणि चालत निघालेल्या हजारो शेतकऱ्यांना आवर घालणे पोलिसांना अशक्यच होते. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली, बॅरिकेड्स तोडली, उभ्या केलेल्या बसेसची आपल्या ट्रॅक्टरनी मोडतोड केली. काहींच्या हातात तर तलवारी, फरशा, साखळ्या आदी शस्रेही होती. पोलिसांनी लाठीमार व अश्रुधूर केला, तेव्हा अनेकांनी पोलिसांवरच हल्ले चढविले. त्यात ३०० पोलीस जखमी झाले. मात्र पोलिसांनी आंदोलन संयमाने हाताळले. शेतकऱ्यांच्या या गटाने जणू ठरवूनच हे सर्व घडवून आणले, असे दिसत होते. त्यापैकी लाल किल्ल्यात घुसलेल्या मंडळींनी तर तिथे शीख पंथाचा ध्वज फडकावला. शेतकऱ्यांच्या आंदोलनात विशिष्ट पंथाचा ध्वज फडकावणे म्हणजे एका प्रकारे आंदोलनात धर्म, पंथ यांच्या आधारे फूट पाडण्यासारखे आणि आंदोलनाची बदनामी करण्यासारखे होते.

India's Farmers' Generational Anger Finds Voice In Delhi Agitation | OPINION

हा ध्वज फडकावणारा दीप सिद्धू हा नेता भाजपशी संबंधित आणि पंजाबी अभिनेता आहे आणि तो लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी होता. त्यांच्यासोबतच्या अन्य नेत्यावर तर २०हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. कालच्या  प्रकाराचा संयुक्त किसान मोर्चाने उघडपणे निषेध केला आहे. हे दोन्ही नेते आणि त्यांची संघटना आमच्या संयुक्त किसान मोर्चाचा भाग नव्हती, असेही जाहीर केले आहे. पोलिसांनी २०० जणांना ताब्यात घेतले आहे. संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक योगेंद्र यादव यांच्यासह काही नेत्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. हे नेते दिल्लीत घुसले नव्हते; पण शेतकऱ्यांना दिल्लीत घुसण्यापासून रोखण्यात त्यांना अपयश आले, हे स्पष्ट आहे. मात्र शीख पंथाचा ध्वज लाल किल्ल्यावर फडकावणारा दीप सिद्धू आणि त्याचा गुन्हेगार सहकारी या दोघांनाही ताबडतोब अटक व्हायला हवी. त्यांनीच शेतकऱ्यांना भडकावले, असे उघड झाले आहे. आंदोलक शेतकऱ्यांचे नेते राजेश टिकैत यांनी तर सरकारमधील मंडळींनीच आंदोलन बदनाम करण्यासाठी दीप सिद्धूला घुसवल्याचा आरोप केला आहे. मात्र हिंसाचारामुळे  आंदोलनाची धार  कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Farmers' protest Highlights January 27, 2021: Farmer leaders to observe fast on Jan 30 - India Today

या शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी नेत्यांची साथ आहे, केवळ श्रीमंत शेतकरी आणि अडते यांचे हे आंदोलन आहे, त्यातील अनेकांचा शेतीशी संबंध नाही, आंदोलनात गुन्हेगार सहभागी झाले आहेत, असे आरोप आतापर्यंत विशिष्ट मंडळी करीतच होती. पोलिसांनीही ती शक्यता व्यक्त केली होती. तरीही कोणतेही कायदे, नियम न तोडता शेतकरी सीमांवर शांतपणे ठाण मांडून बसून होते. मात्र कालच्या हिंसाचारामुळे शांततेचा पुरस्कार करणारे शेतकरी आणि त्यांचे नेते यांच्यात चलबिचल सुरू झाली आहे. ते झाल्या प्रकारामुळे हबकून गेले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयात, सरकार दरबारी आपल्या मागण्या मान्य होण्याची शक्यता कमी आहे, असे त्यांना वाटत आहे. त्यात तथ्यही आहे. केंद्र सरकार आता त्यांना अजिबातच दाद देणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयही सहानुभूतीने पाहील, याची खात्री नाही. शिवाय देशातील सामान्यांना या शेतकऱ्यांविषयी जी आस्था वाटत होती, तीही निश्चितच आटेल. दिल्लीत घुसखोरी आणि हिंसाचार करणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी आंदोलनाचे खूप मोठे नुकसान केले आहे. अशा एखाद दुसऱ्या प्रकरणामुळेही संपूर्ण आंदोलन कोसळू शकते. ते पुन्हा उभे करणे किती अवघड असते, याचा अंदाजही दिल्ली धडगूस घालणाऱ्यांना नसेल.

കർഷക സമരത്തിൽ നിന്നും പിന്മാറുന്നുവെന്ന് രണ്ട് കർഷക സംഘടനകൾ | two-farmer-organizations-withdrew-protest-against-farm-laws | Madhyamam

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आधी केवळ पंजाबमध्ये आंदोलन सुरू केले. मग हरयाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरीही त्या आंदोलनात सहभागी झाले. सरकार काही प्रमाणात झुकले आणि न्यायालयाने तर कायद्यांची अंमलबजावणी स्थगित केली. आंदोलक विजयाच्या नजीक येऊन पोहोचले असताना दिल्लीत घुसून हिंसाचार करणाऱ्यांनी आंदोलनावरच बोळा फिरविला आहे. हिंसेने विजय मिळविता येत नाही, असे गांधीजी नेहमी सांगत. त्यांनी अहिंसेच्या मार्गानेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण देशाच्या प्रजासत्ताकदिनी काही जणांच्या हिंसेमुळे सर्व शेतकरीच अडचणीत आले आहेत.

Farm Laws: How a Peaceful Farmers' Parade Turned Violent | NewsClick

Web Title: Editorial on violence in Farmers agitation, Leaders fail to stop farmers from entering Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.