शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 08:14 IST

आजार व मृत्यूसाठी कारणीभूत पाणीपुरवठा, स्वच्छता वगैरेचा आढावा घेण्याऐवजी गावकरी एकत्र बसतात. तिला जातपंचायतीचे स्वरूप येते आणि तिथे भलताच विचार होतो.

आदिवासींच्या छोट्याशा खेड्यात एकापाठोपाठ एक असे मृत्यू झाले की, प्रत्येक मृत्यूचे कारण शोधून ते दूर करण्याऐवजी, आजार व मृत्यूसाठी कारणीभूत पाणीपुरवठा, स्वच्छता वगैरेचा आढावा घेण्याऐवजी गावकरी एकत्र बसतात. तिला जातपंचायतीचे स्वरूप येते आणि तिथे भलताच विचार होतो. मंदिरात पूजाअर्चा करणारी गावातील एक महिला व दुसरा पुरुष या दोघांचा जादूटोणा व देवदेवस्कीमुळेच माणसे मरतात, अशा आंधळ्या श्रद्धेचा निष्कर्ष निघतो. दोघांना बेदम मारहाण करून पेट्रोल टाकून जिवंत जाळले जाते. अंगावर शहारे आणणारी ही घटना महाराष्ट्रदिनी गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे घडली. जननी देवाजी तेलामी व देवू कटिया आतलामी या दोघांना जीव गमवावा लागला. खून तसेच अनिष्ट-अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांनी पंधरा जणांना अटक केली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अंगात सैतान संचारलेल्या त्या झुंडीत महिलेचा पती व मुलगाही आहे. या घटनेच्या आदल्या दिवशी त्याच तालुक्यातील जांभिया गावात जादूटोण्याच्याच संशयावरून एका वृद्धाला समाजमंदिरात बांधून मारहाण करण्यात आली. गरम सळईचे चटके देण्यात आले.

महाराष्ट्रदिनीच तिकडे नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यात जलोला येथील आशा सेविका ही डाकीण असून, मुलांना खाते, जनावरे खाते असा संशय घेत तिला व पतीला मारहाण झाली. बाजूच्याच गावात वृद्धाला मारहाण झाली. राज्यातील आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये हे जे घडतेय ते सारे भयंकर, चिंताजनक आहेच. शिवाय या सगळ्या घटना पाहून आपण कोणत्या विकासाच्या, एकविसाव्या शतकाच्या गप्पा मारतो, असा प्रश्न पडावा. त्यासोबतच अंधश्रद्धेच्या जोखडातून समाजाची मुक्तता करण्याचे, त्या दलदलीतून त्यांना बाहेर काढण्याचे आव्हान किती मोठे आहे, याचीही कल्पना यावी. बारसेवाड्याच्या घटनेला आणखी एक कंगोरा म्हणजे एरव्ही जातबांधव व भगिनींच्या वैयक्तिक अधिकारांमध्ये नाक खुपसणाऱ्या अंधश्रद्ध जातपंचायती आता जादूटोण्याच्या संशयावरूनही निरपराधांचे जीव घ्यायला लागल्या आहेत. त्याचे कारण हे की, रानावनात राहणाऱ्या, दारिद्र्यात खितपत पडलेल्या या निरक्षर माणसांपर्यंत नव्या जगाचे वारे पोहोचलेले नाही. अवतीभोवती, राज्यात-देशात, जगाच्या कानाकोपऱ्यात झालेला शिक्षणाचा प्रसार त्यांच्या झोपड्यांमध्ये झिरपलेला नाही. शिक्षणामुळे आणि त्यातही विज्ञानामुळे तयार होणारा बुद्धिप्रामाण्यवाद, विवेक, आजार व मृत्यूमागील कार्यकारणभाव यापासून ते दूर आहेत.

अरण्य प्रदेशात, निसर्गाच्या सानिध्यात आपण कोणत्या तरी सहाय्यकारी शक्तीमुळे जिवंत आहोत आणि अशाच कुठल्या तरी विनाशकारी शक्तीमुळे आपल्यावर संकटे येतात, माणसे आजारी पडतात किंवा त्यांचा मृत्यू होतो, अशा अनेक अंधश्रद्धांचा पगडा त्यांच्या मनावर आहे. हा पगडा वैयक्तिक असतो तेव्हा कुटुंबातल्या, समाजातल्या विवेकवादी मंडळींकडून सुधारणा घडवली जाऊ शकते. लोकशिक्षणाची कवाडे खुली असतात. परंतु, अंधश्रद्धेला जेव्हा समूहाच्या मानसिकतेचे स्वरूप येते तेव्हा झपाटलेल्या झुंडी तयार होतात. या झुंडीचा अधिक राग खेड्यातल्या, पाड्यावरच्या शिकलेल्या मंडळींवर, विशेषत: सुशिक्षित महिलांवर  असतो. कारण, आधुनिक जगाचे दर्शन तसेच अनुभवातून शिकलेल्यांचा विवेक जागा झालेला असतो. ते इतरांनाही सुधारण्याचा प्रयत्न करतात. झुंडीला मात्र ते अजिबात नकोसे असते. त्यातून होणाऱ्या अघोरी कृत्यावेळी त्यात सहभागी झालेल्या कोण्या एकाच्या मनात चुकीचे भान आले तरी तो उघडपणे बोलू शकत नाही. तसे करण्याचा प्रयत्न केला तर तोदेखील झुंडीच्या रागाचा बळी ठरण्याची शक्यता असते.

गडचिरोली किंवा नंदुरबारमधील घटनांकडे असे इतक्या खोलात जाऊन पाहण्याची गरज आहे. सातपुड्याच्या पश्चिम टोकावरच्या, नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव किंवा अक्कलकुवा तालुक्यात भयंकर डाकीण प्रथा आहे. ती हाणून पाडण्यासाठी सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच प्रशासनाने काही वर्षांपूर्वी पुढाकार घेतला होता. त्यामुळे डाकीण समजून महिलांचे बळी घेण्याच्या, त्यांच्या छळाच्या घटना कमी झाल्या आणि समाजप्रबोधनाचे प्रयत्नही शिथिल झाले. आताच्या घटनांमुळे प्रबोधनाची गती-शक्ती दोन्ही वाढविण्याची गरज आहे. मागास, निरक्षर, दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून घडणाऱ्या या घटना म्हणजे समाजाचा अंधारलेला कोपरा आहे. त्याबद्दल नुसतेच हळहळून, संताप व्यक्त करून किंवा ‘छे, किती बुरसटलेले लोक’ म्हणून नाक मुरडण्याने भागणार नाही. तो अंधार दूर करण्यासाठी प्रत्येकाने लोकप्रबोधनाचा, लोकशिक्षणाचा दिवा पेटविण्याची गरज आहे.