...एक साधा पाऊस! स्मार्ट सिटीचा 'वरवरचा' स्मार्टनेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 07:52 IST2026-04-04T07:52:21+5:302026-04-04T07:52:42+5:30
एप्रिलमध्ये असा पाऊस सहसा पडत नाही. इतिहासात एप्रिलमधील हा विक्रमी पाऊस.

...एक साधा पाऊस! स्मार्ट सिटीचा 'वरवरचा' स्मार्टनेस
'एक साधा ओरखडा तुमची संस्कृती सांगतो', असे स्वामी विवेकानंद म्हणाले होते. तसेच म्हणायचे तर, एक साधा पाऊस विकासाच्या वल्गना धुऊन काढतो! तासाभराचा पाऊसही हल्ली शहरांना सोसवत नाही. शहरांची प्रतिकारक्षमता एवढी कमी झाली आहे की, एका पावसाने शहर आजारी पडते. ठप्प होते. दरवर्षी हे होते आणि तरीही यंत्रणा जागी होत नाही. मुंबईची 'तुंबई' झाली होतीच, आता त्याच दिशेने पुणे निघाले आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक पावसानंतर पुण्याची अशीच अवस्था होते. गुरुवारी अवघे पुणे पाण्यात गेले होते. एप्रिलमध्ये असा पाऊस सहसा पडत नाही. इतिहासात एप्रिलमधील हा विक्रमी पाऊस. मात्र, या एका पावसाने सगळे रस्ते पाण्याखाली जावेत आणि पूर्ण व्यवस्था उन्मळून पडावी, असा काही प्रलयंकर पाऊस नव्हता. तरीही अनेक भागांमध्ये पाणी साचले. दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. शहरभर भीषण वाहतूक कोंडी झाली. वारजे, कोथरुड, धायरी या भागातील रस्ते आणि महामार्गाचे सेवा रस्ते पाण्यात गायब झाले. झाडे पडली. गाड्या वाहून गेल्या. रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले. एक महिला दगावली. अजूनही आपण मध्ययुगात आहोत, अशा प्रकारचे चित्र पुण्याचे होते.
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा अंदाज स्पष्ट होता. तरीही महापालिका प्रशासन झोपेतच होते. अवकाळी पाऊस दरवर्षी पडतो, हे ठाऊक असूनही महापालिका प्रशासन मात्र जूनमध्येच पावसाळा सुरू होतो, असे गृहीत धरत असते. तशीच तयारी महापालिकेची सुरू होते. तशाच प्रकारे निविदा काढल्या जातात. या सगळ्या तयारीचा एका पावसाने फज्जा उडवला. प्रश्न महापालिकेचा आहेच. प्रशासनाचा आहेच. पण मुद्दा तेवढाच नाही. आपल्या शहरांचाच आपल्याला एकदा नीट विचार करावा लागणार आहे. विकास नावाची संकल्पना पुन्हा तपासून बघावी लागणार आहे. ज्या शहरामध्ये मुळा-मुठा-पवना-इंद्रायणी अशा नद्या मरणासन्न होतात, त्या शहराला काय भविष्य असणार आहे? विकासाच्या नावाखाली नदी-नाले बुजवून इमारती उभ्या केल्या जात असतील, तर तिथे आणखी वेगळे काय घडणार आहे? नाल्यात घर बांधले जाते, तेव्हा घरात नाला येणारच. नदीपात्रात रस्ता तयार केला जातो, तर रस्त्यावर नदी येणारच. मध्यंतरी राज्यभर पुराने थैमान घातले, त्याचे मुख्य कारण हेच होते.
विकासाच्या नावाखाली आपण काय करत चाललो आहोत? मुळात, आपला विकास दोन-चार शहरांमध्ये एकवटलेला आहे. त्या शहरांवर ताण वाढत चालला आहे. देशभरातील विद्यार्थी शिकण्यासाठी पुण्यामध्ये येतात. राज्याच्या खेड्यापाड्यातील मुला-मुलींसाठी पुणे ही स्वप्नभूमी आहे. या शहराने अनेकांना रोजगार दिला. पुणे हे समृद्ध आणि संपन्न शहर आहे. या शहराचा खिसा सर्वांना दिसतो, पण या शहराला हृदयही आहे, असा विचार मात्र कोणीच करत नाही. एवढ्या लोकसंख्येचा ताण या शहराला सोसणार आहे का? ईशान्येतील एखाद्या राज्यापेक्षाही मोठा अर्थसंकल्प पुणे महानगरपालिकेचा असतो. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शेजारीच आहेत. 'पीएमआरडीए' सह या शहरांची लोकसंख्या एक कोटीहून अधिक आहे. युरोपातील अनेक देश त्यापेक्षा छोटे आहेत. हा सगळा ताण सोसायचा तर शहर आतून सक्षम झाले पाहिजे. मेट्रो अथवा उड्डाणपूल म्हणजे विकास नाही. वरवरचा 'स्मार्टनेस' त्यासाठी चालणार नाही. शाश्वत विकास करायचा असेल तर नैसर्गिक संसाधनांचा, पर्यावरणाचा विचारही केला जायला हवा. जिथे अनिर्बंध बांधकामे होत असतात, अनधिकृत इमारती उभ्या राहतात, नदीपात्रातील वाळूची तस्करी केली जाते, तिथे विकास कसा होईल?
पुण्याला 'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' वगैरे म्हणायला आपल्याला आवडते, पण ऑक्सफर्डशेजारी झुळझुळणारी थेम्स नदी आपल्या लक्षात येत नाही! एका जागतिक अहवालानुसार, सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या यादीत पुणे जगात पाचव्या स्थानावर आहे. ज्या शहराची हवा निरोगी नाही, जिथे स्वच्छ आणि मुबलक पाणी नाही, अशा शहराचे वर्तमान काय असणार आहे? पुण्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. उज्ज्वल भविष्यकाळही आहे. त्यामुळेच पेन्शनरांना हे शहर आवडते आणि तरुणाईलाही ते आकृष्ट करते. अशा या शहराचे आज जे काही झाले आहे, ते फार भयंकर आहे. आज ही स्थिती असेल तर आणखी पन्नास वर्षांनंतर या शहराचे काय होणार आहे? गुरुवारच्या पावसाकडून हा धडा आपण घेतला नाही तर येणारा काळ कठीण असणार आहे!