शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सुने, सुने माळरान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 10:22 IST

N D Mahanor : "बाहेर पाऊस जिवाच्या आकांताने कोसळतोय आणि ना. धों. महानोर नावाचा माणूस आता आपल्यामध्ये असणार नाही, या कल्पनेनेच हिंदोळ आभाळभर झाला आहे."

चिंब पावसानं रान आबादानी झालेलं असताना आणि मनही पावसाळी असतानाच इथला मुक्काम हलवणं, हे त्यांच्या प्रकृतीला साजेलसं. या नभाने या भुईला दान दिल्यानंतर मातीतून चैतन्य गात असताना, जोंधळ्याला चांदणे लगडून जाणं स्वाभाविकच. बाहेर पाऊस जिवाच्या आकांताने कोसळतोय आणि ना. धों. महानोर नावाचा माणूस आता आपल्यामध्ये असणार नाही, या कल्पनेनेच हिंदोळ आभाळभर झाला आहे. 

रानात रमलेला आणि शेताने लळा लावल्यानंतर त्या हिरव्या बोलीचा शब्दच होऊन गेलेला हा कवी. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘रानातल्या कविता’ १९६७ मध्ये आला, तो काळ जगभर स्वप्नांचा पाठलाग करण्याचा! पु. शि. रेगे, बा. सी. मर्ढेकरांनंतरची साठोत्तरी कविता आपली वाट शोधत होती. साधीसुधी माणसंही बोलू लागली होती. ‘सारस्वतांनो, माफ करा, थोडासा गुन्हा करणार आहे’, असं म्हणत नारायण सुर्वेंसारखे कवी लिहू लागले होते. 

काहींवर मागच्या पिढीचा प्रभाव होता, तर काहींना युरोप-अमेरिका अथवा सोव्हिएत रशिया खुणावत होती. साठचं दशक हा मराठी साहित्यासाठीचा अभूतपूर्व काळ होता. अशावेळी महानोरांच्या ‘रानातल्या कवितां’नी सगळ्यांना थक्क करून टाकलं. मातीत उगवलेली आणि आकाशाला गवसणी घालणारी ही कविता अनवट तर होतीच; पण अगदीच नवीकोरी होती. घन ओथंबून आल्यासारखी ही कविता आली आणि तिच्यामुळे मराठी कवितेचंच ‘अंग झिम्माड झालं’. ही हिरवीकंच कविता तिची प्रतिमासृष्टी घेऊन मराठी मुलुखात उतरली. असं उधाणवारं ती घेऊन आली की, ‘मोडून गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी’ अशी स्थिती व्हावी! रसरशीत निसर्गभान जागवत या कवीने निसर्ग आणि कविता यांच्यात असं अद्वैत निर्माण केलं की, या कवितेसोबत निसर्ग साद घालू लागला आणि निसर्गासोबत असताना त्यात माणूस दिसू लागला. 

‘रानातल्या कविता’ आणि ‘वही’ या कवितासंग्रहांनंतर महानोरांकडे सिनेमावाल्यांचं लक्ष गेलंच. कारण महानोरांच्या कवितेची अंगभूत लय! लोकगीतांशी, मातीशी आणि बोलीभाषेच्या सहजतेशी नाते सांगणारी जिवंत शब्दकळा आणि नव्या अनुभवासोबत नवं रूप घेणारी चित्रमयताही! गदिमा, पी. सावळाराम, शांता शेळके हे सारे बहरात असताना ‘जैत रे जैत’साठीची गाणी महानोरांनी लिहावीत, असं संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना वाटलं आणि महानोरांसाठी नवं जग खुलं झालं... ‘जैत रे जैत’ अजरामर झाला!  भवतालाशी नातं सांगणारा हा कवी फक्त शब्दांचा फुलोरा फुलवणारा नव्हता. ‘सरलं दळण, ओवी अडली जात्यात’ असं दुःख कवितेतून मांडणाऱ्या महानोरांना व्यापक सामाजिक भान होतं. शेतकरी, श्रमिक, कामगार, स्त्रिया यांच्या प्रश्नांचं आकलन होतं. त्यातूनच यशवंतराव चव्हाण, शरद पवारांशी त्यांचे सूर जुळले. 

महानोर विधानपरिषदेवर आमदार म्हणून गेले आणि त्यांनी अनेक दुर्लक्षित मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आणले. त्यांनी शेतीविषयी लिहिलं, पर्यावरणाविषयी लिहिलं, समीक्षा केली, संपादन केलं, ‘गांधारी’सारखी कादंबरी लिहिली; पण कवी आणि गीतकार हे त्यांचं रूप महाराष्ट्राने हृदयात साठवून ठेवलं!  भरभरून जगणारा, मुसळधार कोसळणारा आणि मातीशी इमान असणारा असा भन्नाट माणूस होता हा. त्यांचं व्यक्तिमत्त्वही तसंच रांगडं होतं. शेतीत  असे रमले की, खूपदा आमंत्रणं येऊनही त्यांनी शहरात ‘सेटल’ व्हायचं नाकारलं. मुळात ‘सेटल’ होणं हा काही महानोरांचा स्वभाव नव्हता. ते सदैव वाहणारे, फुलणारे आणि फुलवणारे. नवे पेरत राहणारे. महानोर आले म्हणजे मैफल सुरू होणार, याची खात्रीच असायची. हातातल्या वहीवर ठेका धरत ते गाऊ लागायचे, तेव्हा अवघे श्रोते जागीच ताल धरायचे. कारण, त्यांच्या कवितेला चव होती. तिला स्पर्श करता यायचा. ती लख्ख दिसायची. जाणवायची. ऐकू यायची. 

अशा कवितेवर कोण प्रेम करणार नाही? ‘या  जांभळ्या लुगड्याने तू अशी दिसतेस की, मोहाच्या झाडालाही मोह व्हावा’, अशी शब्दकळा नि प्रतिमासृष्टी ज्याची असेल, त्याच्या प्रेमात कोण नाही पडणार? बाजिंदी मनमानी करू शकणारा हा असा कवी, प्रेमावरच त्याचं विलक्षण प्रेम होतं... आता महानोर आपल्यासोबत असणार नाहीत...! पण, ते जातील कुठे? फाटकी झोपडी हे ज्याचं काळीज आहे आणि या रानात ज्याचे प्राण गुंतलेले आहेत, ते काळीज आणि प्राण हिरावून नेण्याची हिंमत कोणामध्ये आहे? उतरू आलेलं आभाळ पंखांवरती  पांघरुन हा कवी चांदण्यांत न्हाण्यासाठी निघाला आहे... पाऊस कसला कोसळतो आहे!

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Songsमराठी गाणीMaharashtraमहाराष्ट्र