लेख: ‘दोघे’ एकत्र? भाजपमधील सत्तेच्या गणितात नवा गुंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 06:42 IST2025-06-19T06:40:18+5:302025-06-19T06:42:08+5:30
Amit Shah vs Yogi Adityanath: अमित शाह आणि योगी आदित्यनाथ या दोघांमध्ये प्रारंभापासून सख्य नाही. पण वरिष्ठ नेतृत्वाने तंबी दिल्यामुळे योगी यांनी नमते घेतल्याची कुजबुज आहे.

लेख: ‘दोघे’ एकत्र? भाजपमधील सत्तेच्या गणितात नवा गुंता
हरीष गुप्ता
नॅशनल एडिटर, लोकमत,
नवी दिल्ली
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातील दुर्मीळ सख्य लखनौतील एका मोठ्या कार्यक्रमात नुकतेच दिसले. राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपतील दोन मोठ्या नेत्यांच्या रणनीतीतील फेरजुळणीचे संकेत त्यातून मिळत आहेत. १५ जून रोजी लखनौमध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात ६०,२४४ नवनियुक्त पोलिस हवालदारांच्या नियुक्तीची पत्रे शाह यांच्या हस्ते दिली गेली. योगी आणि शाह यांच्यामध्ये तणाव असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर अचानक दिसलेले हे सख्य स्वाभाविकपणे अधोरेखित झाले.
योगी आणि भाजपतील श्रेष्ठी यांच्यातील शीतयुद्धाची चर्चा नवी नाही. योगी यांच्या वाढत्या महत्त्वामुळे दिल्लीत अस्वस्थता, केंद्राने केलेल्या नेमणुकांना मान्यता देण्यात त्यांची नाखुशी, पूर्णवेळ पोलिस महानिरीक्षक नेमायला त्यांनी पाच वर्षे लावलेला विलंब यामुळे या चर्चेला खतपाणी मिळाले. योगी आणि शाह या उभयतांतून विस्तव जात नाही, अशा असंख्य कहाण्या त्यातून पसरल्या. भाजपमध्ये मोदी यांच्या नंतरचे अग्रमानांकित नेते असल्याने शाह आणि योगी या दोघांमध्ये संघर्ष स्वाभाविकच होय. दोघांची राजकीय शैली वेगळी, वैचारिक मतभेदही आहेत. आतापर्यंत केंद्रीय गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातच काय ते दोघे एकत्र दिसले. यावेळी मात्र लखनौने पुढाकार घेतला, दिल्लीने नव्हे. आता हा पुढाकार तात्पुरता आहे की तो यापुढे टिकेल हे येणारा काळ सांगेल. परंतु एक नक्की : दोघांमधील नात्याचे समीकरण बदलले आहे. भाजपतील सत्तेच्या गणितात त्यामुळे आणखी गुंतागुंत झाली आहे. जास्त हुशारी न दाखवण्याची तंबी वरिष्ठ नेतृत्वाने दिल्यामुळे योगी यांनी नमते घेतल्याची कुजबुजही दिल्लीत कानावर येते.
दिल्लीची ‘आप’ ब्रिगेड पंजाबात!
सत्येंदर जैन त्यांचे गुरु अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर केवळ आदर्शवाद आणि एकामागून एक सभांचा मारा करत दिल्लीच्या राजकारणात घुसले, ते जुने दिवस आठवा आणि आता वर्तमानकाळात या. एकेकाळी सर्वांचे लक्ष वेधून घेणारे हे सत्येंदर जैन आता चंडीगडमधील सरकारी बंगल्यात बसून शांतपणे पंजाबच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. दिल्लीतील नोकरशाहीच्या दप्तरदिरंगाईशी दोन हात करणाऱ्या या माणसाने आता पंजाबच्या आरोग्य खात्याची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. त्यांचे पूर्वीचे ‘ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी’ शालीन मित्रा त्यांना येऊन मिळाले आहेत. अर्थात, या पंजाबी ताफ्यात ते एकटे नाहीत. मोफत पुस्तकांची योजना काढणारे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आता पंजाबच्या शिक्षण खात्यात सल्लागार म्हणून घुसले आहेत. केजरीवाल यांच्या टीकाकारांशी शाब्दिक हुज्जत घालणाऱ्या रीना गुप्ता आता पंजाबच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला हुकूम सोडत आहेत. दिल्ली डायलॉग कमिशनच्या उपाध्यक्षा जयश्री शाह आता पंजाबच्या माहिती तंत्रज्ञान खात्यात लीड गव्हर्नन्स फेलो (गमतीचे वाटते ना!) म्हणून कार्यरत आहेत. कमाल बन्सल यांनी दिल्लीतल्या तीर्थस्थळ पॅनेल बैठका आवरून पंजाबमधील तीर्थयात्रा समितीचे अध्यक्षपद घेतले आहे. चंडीगडमधील किमान १० सरकारी सदनिका अशा दिल्लीहून आयात झालेल्या मंडळीनी बळकावल्याचे बोलले जाते. एकेकाळी व्यवस्थेशी लढणारे हे लोक आता स्वतःच ‘व्यवस्था’ होऊन बसले आहेत.
बिहारमध्ये भाजपने शड्डू ठोकले
ऑपरेशन सिंदूरनंतर भाजपमध्ये उत्साह संचारला असून, बिहार निवडणुकीच्या जय्यत तयारीत पक्ष बाह्या सरसावून उतरला आहे. २०२० च्या निवडणुकीत संयुक्त जनता दलाला फारसा प्रभाव पाडता आला नव्हता. यावर बोट ठेवून भाजप यावेळी या पक्षाला ९० ते ९५ जागाच देईल, अशी शक्यता आहे. त्यावेळच्या निवडणुकीत संयुक्त जनता दलाने ११५ जागा लढवल्या आणि केवळ ४३ जिंकल्या. उलट भाजपने ११० जागा लढवून ७४ जिंकल्या होत्या. ‘मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तुमचाच असेल’ असे आश्वासन पक्षाने नितीश कुमार यांना दिले आहे. परंतु या हमीचा अर्थ संयुक्त जनता दलाला जास्त जागा मिळतील, असा काढला जाऊ नये हेही स्पष्ट करण्यात आले आहे.