शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

देशांतर्गत जुगलबंदी चीनच्या पथ्यावर! जगापुढे आपले नक्कीच हसे होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 07:05 IST

गलवानमध्ये आपल्या जवानांनी दिलेल्या शर्थीच्या झुंजीवरून आपणही लेचेपेचे नाही याचीही पावती मिळाली; पण दमदाटी करणाऱ्या अधिक बलवान प्रतिस्पर्ध्याशी गाठ असताना सीमेवर नक्की काय घडत आहे, याची माहिती देशाला प्रामाणिकपणे देणेच अधिक श्रेयस्कर ठरते

पवन के. वर्मा

अवधचे राज्य ब्रिटिश घशात घालत असतानाही तेथील दोन नवाब बुद्धिबळ खेळण्यात कसे मश्गुल होते, याचे मार्मिक चित्रण मुन्शी प्रेमचंद यांच्या कादंबरीवर सत्यजित रे यांनी काढलेल्या ‘सतरंज के खिलाडी’ या अजरामर चित्रपटात पाहायला मिळते. विचित्र गोष्ट अशी की, भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांचे सध्याचे वागणे त्या नवाबांच्या बेफिकिरीची आठवण करून देणारे आहे. चीन सीमेवर लाथा मारत असताना हे पक्ष परस्परांवर कुरघोडी करण्यात धन्यता मानत आहेत. उद्दाम व आक्रमक चीनला एकदिलाने उत्तर देण्याच्या अग्रक्रमाचा पूर्ण विसर पडून त्यांची जुगलबंदी अव्याहतपणे सुरूच आहे.

लोकशाहीत सरकारला धारेवर धरण्याचा अधिकार विरोधी पक्षांना नक्कीच आहे; पण हे करतानाही गांभीर्य व विषयाचे भान ठेवायला हवे. हल्लीच्या टिष्ट्वटरच्या युगात शब्दपांडित्य दाखविण्याचा मोह अनावर होणे साहजिक आहे; पण या पांडित्याचा उथळपणा काही वेळा उघडा पडू शकतो. त्यामुळे ‘सरेंडर’ शब्दावर कोटी करून राहुल गांधी पंतप्रधानांना ‘सरेंडर मोदी’ असे संबोधतात. अशा टीकेने काहींच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटत असतील तरी यातून अनेक भारतीयांना प्रश्न पडला की, यामागचा मुख्य उद्देश सीमेवरील वस्तुस्थिती सरकारकडून जाणून घेण्याचा आहे की, मोदींवरील व्यक्तिगत टीकेचा आहे. व्यक्तिगत हल्ला चढविण्याचा उद्देश असेल, तर ही वेळ चुकीची आहे. सीमेवर धोका उभा ठाकला असताना मोदी व राहुल गांधी यांना परस्परांविषयी वाटणारा तिटकारा हा अग्रक्रम असूच शकत नाही. अशा वेळी लोकशाहीत उपलब्ध असलेल्या स्वातंत्र्याचा उपयोग करून एकीकडे सरकारकडून उत्तर मागत असतानाही राष्ट्रीय एकवाक्यता कशी टिकून राहील हे पाहायला हवे. परस्परांतील अंतर्गत प्रतिस्पर्धा हे भारताचे फार जुने दुखणे आहे. आताही तेच घडत असल्याचे पाहून चीनला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काय स्थिती आहे, हे सरकारने देशाला स्पष्टपणे सांगायलाच हवे. चीन संपूर्ण गलवान खोºयावर दावा करतो आहे का? तसे असेल तर आजवर जो प्रदेश आपण आपला म्हणत होतो, त्यावरही चीन हक्क सांगत आहे का? पॅनगाँग सरोवराची स्थिती काय आहे? चीन तेथेही व खास करून आपण गस्त घालत असलेल्या फिंगर ८ व फिंगरच्या मधल्या भागातही पोहोचलाय का? ड्रॅगनने डेपसांग पठारावर नियंत्रण रेषेच्या आपल्या बाजूला किती कि.मी.पर्यंत शिरकाव केला आहे? या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यायला हवीत. राष्ट्रवादाचा हवाला देत हे प्रश्न टाळण्यात काही हशील नाही. त्याने निरोप्यालाच गळी मारल्यासारखे होईल. चीनची संरक्षण सज्जता आपल्याहून कितीतरी अधिक तगडी आहे व मनात येईल तेव्हा नियंत्रण रेषेचे लचके तोडण्यासाठी चीन त्याचा वापर निरंकुश करत असतो, याची देशाला कल्पना आहे. गलवानमध्ये आपल्या जवानांनी दिलेल्या शर्थीच्या झुंजीवरून आपणही लेचेपेचे नाही याचीही पावती मिळाली; पण दमदाटी करणाऱ्या अधिक बलवान प्रतिस्पर्ध्याशी गाठ असताना सीमेवर नक्की काय घडत आहे, याची माहिती देशाला प्रामाणिकपणे देणेच अधिक श्रेयस्कर ठरते.

या महत्त्वाच्या प्रश्नांवर भाजपचा पवित्रा काँग्रेस व चीन कसे शय्यासोबती आहेत हेच दाखविण्याचा आहे. कित्येक वर्षांपूर्वी राजीव गांधी फौंडेशनला कोणी देणग्या दिल्या याचे खंडीभर पुरावे पक्षाने खणून काढले. त्यावरून एक देणगीदार चीन सरकार असल्याचे दिसते. यावरून ‘संपुआ’ सरकार चीनला विकले गेले होते, असा पराचा कावळा भाजपने केला. याला प्रत्युत्तर देण्यासाठी चिनी कम्युनिस्ट पक्षासोबत पूर्वी कधी केलेल्या करारांचा हवाला देत काँग्रेसने भाजपला त्या कम्युनिस्ट पक्षाचे बगलबच्चे ठरवून टाकले. पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना चीनच्या प्रेमात होते, असाही आरोप काँग्रेसने केला. थोडक्यात, चीन सीमेवर डोळे वटारत असताना देशातील हे प्रमुख राजकीय पक्ष एकमेकांना चीनचा हस्तक म्हणत आहेत. यामुळे जगापुढे आपले नक्कीच हसे होते.

सामरिकदृष्ट्या चीन खरा प्रतिद्वंद्वी आहे आणि चीनचा खरा धोका न ओळखण्याचे पातक काँग्रेसप्रमाणेच आता सत्तेतील भाजपच्या पारड्यातही जाते. दोन्ही पक्षांनी सत्तेवर असताना चीनचा मुकाबला करण्यासाठी संरक्षण सज्जता व सीमेवरील पायाभूत सुविधा वाढविण्यावर लक्ष द्यायला हवे होते. देशाचे आजवरचे सर्वांत वाईट संरक्षणमंत्री संपुआ सराकरातील ए. के. अँटोनी यांना म्हणावे लागेल. त्यांच्या ‘नैतिकतेच्या लकव्या’मुळे देश संरक्षण सज्जतेत कित्येक दशके मागे राहिला. वरच्या पातळीपर्यंत गोडगोड चर्चेचे तंत्र चीनने पद्धतशीर विकसित केले. त्याने भुरळून जाण्याचा दोष दोन्ही पक्षांकडे जातो. देशाने आत्मचिंतन करून परिस्थिती जाणून घेऊन चीनच्या धोक्याला शाश्वत उत्तर देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा नीती ठरविण्याची वेळ आलीय.

काही वेळा मला काळजी वाटते. टीव्हीवरील एका कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा सोबत होते. त्यावेळी ते म्हणाले की, कोराना, चीन व काँग्रेस या तिन्ही ‘सीं’चा आमचा पक्ष समर्थपणे समाचार घेईल! याला काय म्हणायचे? राहुल गांधींप्रमाणे तेही शब्दचातुर्य दाखवत होते; पण वस्तुत: ही वेळ शहाणपणा कृतीत दाखविण्याची आहे. एक काळ असा होता, आपल्या देशात लोकशाही मतभेदही प्रतिष्ठेने मांडले जायचे. १९६२च्या युद्धात चीनकडून का पराभव झाला याचा जाब त्यावेळचे खासदार अटलबिहारी वाजपेयींनी पंतप्रधान नेहरूंकडे मागितला. त्यांच्या विनंतीवरून नेहरूंनी संसदेचे अधिवेशन बोलाविले व त्यांच्या शंकांचे सन्मानाने निरसन केले होते; पण दुर्दैव असे की, आता राष्ट्रीय राजकीय चर्चेची पातळी एवढी घसरली आहे की, सुसंस्कृतपणे संवाद साधण्याची थोर सांस्कृतिक परंपराच त्याने धोक्यात आली आहे.

(लेखक राजकीय विषयाचे विश्लेषक आहेत)

टॅग्स :IndiaभारतchinaचीनBJPभाजपाcongressकाँग्रेस