- अतुल कुलकर्णी
प्रिय अजित दादा...
Ajit Pawar Death : भल्या सकाळी उठून तुम्ही कामाला लागत होता. आजही तुम्ही तसेच कामाला लागलात. मुंबईहून बारामतीला निघालात... आणि कोणाला काही कळायच्या आत तुम्ही आमच्या सगळ्यातून निघूनही गेलात..! हे असे अचानक निघून जाणे बरोबर नाही दादा... खरंतर तुम्ही काल रात्री बायरोड बारामतीला जाणार होतात. तोच निर्णय कायम ठेवला असता तर... आता अशा जर करला काय अर्थ..? तुमच्यासारखा धाडसी, क्षणात निर्णय घेणारा नेता तयार व्हायला काही वर्ष जावी लागतात. तुमच्या सोबतच्या अनेक आठवणी, अनेक मुलाखती आणि मुलाखती शिवाय तुम्ही खाजगीत मारलेल्या गप्पा, त्या आठवणींचे मोहोळ समोर आहे..! कोणती आठवण ठेवायची आणि तुमच्यातले वेगळेपण शोधायचे याचे मनाशीच युद्ध सुरु आहे.
तुमचा स्वभाव. पटकन जे येईल ते बोलून मोकळे होण्याचा हा स्वभाव तुमचे वेगळेपण होता. अनेकांना त्याचा त्रास व्हायचा. मात्र जो गरजू माणूस तुमच्याकडे काम घेऊन येत असेल त्याला तोंडावर तुझे काम होणार नाही असे सांगण्याची हिंमत तुमच्यात होती. एखाद्याचे काम होणार असेल तर ते काम तातडीने कसे होईल याकडे तुमचा कटाक्ष असायचा. पुण्यात तुमच्या घरी एकदा तुमची मुलाखत घेतली होती. मुलाखत झाल्यावर ज्या गप्पा मारल्या त्या कधीही, कुठेही छापण्यासाठीच्या नव्हत्या... पण तुम्ही महाराष्ट्राकडे कसे बघता हे दाखवून देणाऱ्या होत्या. महाराष्ट्रात तुम्हाला काय करायचे आहे? हे राज्य कोणत्या गतीने पुढे न्यायचे आहे? याविषयी तुम्ही अनेकदा भरभरून बोललात. मी मुख्यमंत्री झालो तर मला या राज्यात काय करायचे आहे हे सांगताना तुम्ही राज्याचे जे चित्र अनेक गप्पांमधून दाखवले होते ते आजही डोळ्यासमोर दिसत आहे. पण ते पूर्ण करण्याची क्षमता, धमक असणारे तुम्हीच आमच्यात राहिला नाहीत.
गेल्या काही महिन्यात तुमच्यात झालेला बदल आम्ही सगळे पाहत होतो. हास्य विनोद, एखाद्याची टोपी उडवणे, एखाद्याला मिश्किल चिमटा काढणे हा तुमच्यातला बदल आम्हाला हवाहवासा वाटत होता. तुमचे ते असे बोलणे, वावरणे आम्हाला आनंद देत होते. तुमच्याजवळ जाण्याची, तुमच्याशी बोलण्याची भीती कमी झाली होती. पण तुमचे असे कोणालाही, काहीही न सांगता निघून जाणे... आमच्यासाठी प्रचंड धक्कादायक आणि वेदनादायी आहे. तुम्ही नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही.
आर. आर. पाटील आणि तुमची दोघांची मैत्री अफलातून होती. तुमच्या दोघांच्या मैत्रीचा काही काळाचा का असेना मी साक्षीदार होतो. एखाद्याच्या मनातले काढून घ्यायचे असेल तर आबा त्याच्याकडे तुमच्याविषयी काहीतरी कॉमेंट करायचे, आणि मग तो माणूस भरभरून बोलायचा. यामागे केवळ गॉसिपिंग करणे एवढा हेतू नसायचा. तर त्या त्या जिल्ह्यातले नेते एकमेकांशी कसे वागतात? पक्ष वाढीसाठी ते काही करतात की स्वतःच्या भल्यासाठीच काम करतात हे शोधण्याचा तुम्हा दोघांचा प्रयत्न असायचा...
ज्या वेगाने तुम्ही काम करत होतात, त्या गतीने काम करणारा नेता याआधी झाला नाही आणि भविष्यातही होणार नाही. एखाद्याचे काम करायचे ठरवले की तुम्हाला कारणं सांगणारे अधिकारी आवडत नसत. अधिकाऱ्यांनी काम कसे मार्गी लावायचे याचे विचार केले पाहिजेत असे सांगताना तुम्ही अनेकदा अधिकाऱ्यांशी फटकून वागलात. मात्र काम झाल्यानंतर त्या अधिकाऱ्याचे तोंड भरून कौतुक करताना आम्ही तुम्हाला पाहिले आहे.
पक्ष कोणताही असो, येणारा माणूस तुमच्या विचाराचा असो नसो, त्याचे काम होणार असेल तर तुम्ही वेगाने करून दाखवले. काम होणारे नसेल तर त्याला तोंडावर काम होणार नाही असे सांगितले. तुम्ही कोणाचेही काम करताना कधी पक्ष पाहिला नाही. त्याची जात, त्याचा धर्म पाहिला नाही.
तुमच्याविषयी अनेक जण अनेक गोष्टी बोलत आले. बोलत राहतील. मात्र दादांकडे गेल्यावर काम होते. होणार नसेल तर स्पष्ट होणार नाही असेही समजते. हे फक्त आणि फक्त तुमच्याविषयीच बोलले जात होते..! आणि पुढेही हेच बोलले जाईल...! काम करताना तुमच्या एवढी डेअरिंग आजपर्यंत कधी कोणी दाखवली नाही. तुमच्या वागण्यातला बोलण्यातला रोखठोक बाणा कोणत्याही नेत्याने, कितीही प्रयत्न केला तरी त्याला तो कमावता येणार नाही.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आपण लोकमतच्या स्नेहभोजन आला होता. मनसोक्त गप्पा मारल्या. जाताना आपले बोलणे झाले. मला मुंबई भेटायची वेळ हवी आहे असे मी म्हणालो. तेव्हा आपण डिकले यांना बोलावले, आणि म्हणालात, मुंबईत रात्रीची वेळ अतुलजींना द्या. भेटीची वेळ ही ठरली. मात्र आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे दोन्ही वेळा अचानक आलेल्या मीटिंगामुळे भेटू शकला नाहीत. त्याची खंत आपल्याला वाटणे आणि आपण ती फोन करून बोलून दाखवणे हे भेटीपेक्षा जास्त मोलाचे होते. अधिवेशननंतर निवडणुका जाहीर झाल्या. पायाला भिंगरी लावल्यासारखे आपण सर्वत्र फिरत राहिलात. निवडणुकीत यश येते जाते... माणूस म्हणून, नेता म्हणून लोक आपल्याला कायम लक्षात ठेवतात. आपण एक माणूस म्हणून... धाडसी नेतृत्व म्हणून... वेगाने काम करणारा नेता म्हणून... कायम महाराष्ट्राच्या स्मरणात राहाल... पण मनापासून सांगतो तुम्ही असे अचानक जायला नको होता तुमचे असणे आमच्यासाठी दादा जवळ असण्याचे होते...
Web Summary : Atul Kulkarni reflects on Ajit Pawar's unexpected demise, highlighting his work ethic, decisive leadership, and genuine concern for Maharashtra's progress. Pawar's ability to connect with people, solve problems swiftly, and his unique camaraderie with R.R. Patil will be missed. His absence leaves a significant void.
Web Summary : अतुल कुलकर्णी ने अजित पवार के अप्रत्याशित निधन पर शोक व्यक्त करते हुए उनकी कार्यशैली, निर्णायक नेतृत्व और महाराष्ट्र की प्रगति के लिए वास्तविक चिंता पर प्रकाश डाला। पवार की लोगों से जुड़ने, समस्याओं को तेजी से हल करने और आर.आर. पाटिल के साथ उनकी अनूठी दोस्ती को याद किया जाएगा। उनकी अनुपस्थिति एक महत्वपूर्ण शून्य छोड़ जाती है।