‘वाळू’ धंद्यातून ‘रग्गड’ कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:33 AM2021-08-01T04:33:29+5:302021-08-01T04:33:29+5:30
दरवर्षी वाळू ठेक्यातून शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळतो. पण त्यापेक्षाही जास्त डबलची आर्थिक उलाढालही वाळू तस्करीच्या धंद्यातून होते, हे कोणीही ...
दरवर्षी वाळू ठेक्यातून शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळतो. पण त्यापेक्षाही जास्त डबलची आर्थिक उलाढालही वाळू तस्करीच्या धंद्यातून होते, हे कोणीही सांगेल. त्यामुळेच या धंद्यात आता मोठमोठे धनदांडगे उतरले आहेत. तर काही याच धंद्यांवर धनदांडगे झाले आहेत. या धंद्यातून महसूल विभागातील अधिकाऱ्यांनाही चांगला मलिदा मिळतो. त्यामुळेच ठेके बंद असतानाही सर्रासपणे सुरू असलेली वाळूची तस्करी या अधिकाऱ्यांना दिसत नाही. अनेकदा स्थानिक ग्रामस्थच वाळू तस्करी पकडून अधिकारी व पोलिसांच्या ताब्यात देतात. त्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. दंड हा इतका अल्प आहे की तो भरून लगेच पुन्हा वाळू तस्करी सुरू होते.
यंदा महसूल विभागाने वाळू ठेक्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. परंतु तो प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही. अधिकृतरित्या शासकीय भाषेत जिल्ह्यात वाळू उपसा पूर्णपणे बंद आहे. अनधिकृतरित्या वाळू उपसा हा नेहमीपेक्षाही जास्त प्रमाणात सर्रासपणे सुरू आहे. सायंकाळी सहा वाजेनंतर वाळू उपशाला परवानगी नाही. परंतु नियम धाब्यावर बसवत रात्रीच वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर केला जातो. दररोज रात्रीतून वाळूने भरलेले डंपर हे धुळे मार्गे नाशिक आणि मुंबईकडे भरधाव वेगाने रवाना होतात. रात्री सुसाट वेगाने एकामागून एक असे वाळूने भरलेले डंपर निघतात. उपशाच्या ठेक्यावरून निघून महामार्गावर येण्यासाठी गावातील ग्रामीण भागातील रस्त्याचा वापर केला जातो. या जडवाहनांच्या वाहतुकीमुळे शिंदखेडा तालुक्यातील तापी काठावरील गावातील रस्त्यांचीही पार वाट लागली आहे. यासंदर्भात अनेकदा ग्रामस्थांनी आंदोलनेही केली आहेत. परंतु त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. सर्व नियम धाब्यावर बसवून हे वाळूने भरलेले डंपर निघतात. रात्री शहादा, दोंडाईचा आणि सोनगीरमार्गे धुळ्याकडे एका रांगेत हे वाळूने भरलेले डंपर निघतात. या मार्गावर प्रवासी वाहन चालविणऱ्यांना यातून मार्ग मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्या वाहनचालकांना डंपरपासून अंतर ठेवूनच वाहन चालवावे लागते. डंपर हे ओव्हरलोड ओल्या वाळूने भरलेले असतात. वाळूवर फक्त एक प्लास्टिकचे कापड टाकलेले असते. भरधाव वेगामुळे अनेकदा वाळूचे बारीक कण हवेत उडून मागे येणाऱ्या वाहन चालकाच्या डोळ्यात जातात. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावर अपघातही झालेले आहेत. परंतु त्याचे कुणालाच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे हा धंदा बंद होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे.
वाळूचे ठेके जरी दुसऱ्याच्या नावावर घेतले गेलेले असले, तरी त्याचा बोलवता धनी मात्र समाजातील प्रतिष्ठित समजला जाणारा ‘गब्बर’ माणूस असतो. तो सर्व ‘मॅनेज’ करतो. वाळू उपशासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून मोटार बोटीचा, क्रेनचा वापर सर्रासपणे केला जातो. यामुळे तापी, पांझरा आणि बुराई नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाणी भरल्यामुळे हे खड्डे न दिसल्यामुळे त्यात बुडून शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील काही तरुणांचे बळीही गेलेले आहेत. मात्र तरीसुद्धा हा धंदा बंद होण्याऐवजी वाढतोच आहे. वाळूच्या धंद्यात अमाप म्हणण्यापेक्षा रग्गड कमाई आहे. वाळू तस्करीच्या धंद्यात एक मोठी बिल्डर लॉबी तयार झाली आहे. तिची पाळेमुळे इतक्या खोलपर्यंत गेली आहे की, आता या अवैध वाळू धंद्यात अनेकांचे हात ओले झाले आहेत. त्यामुळे हा धंदा बंद करण्याची ताकद एकाही महसूल अधिकाऱ्यांमध्ये नाही, असे हे स्वत: वाळू तस्कर छातीठोकपणे सांगतात. वाळू तस्करांची मुजोरी बंद करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलली गेली पाहिजे. अन्यथा शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथे घडलेल्या घटनेसारखे उद्रेक अन्य ठिकाणीही होतील आणि त्यातून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याचीही भीती आहे.