तब्बल १९ हजार नागरिकांची शमविली तहानभुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:35 AM2021-05-16T04:35:15+5:302021-05-16T04:35:15+5:30
धुळे : कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदी वजा लॉकडाऊनमुळे सकाळी ११ वाजल्यानंतर सर्व काही बंद होते. या बंदच्या ...
धुळे : कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदी वजा लॉकडाऊनमुळे सकाळी ११ वाजल्यानंतर सर्व काही बंद होते. या बंदच्या कालावधीत भुकेल्यांची भूक शमविण्याच्या उद्देशाने युवासेनेच्या वतीने २७ एप्रिलपासून मासाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्ण भोजन सेवा उपक्रम सुरू करण्यात आला. सलग १९ दिवस अव्याहतपणे गरजूंपर्यंत तयार अन्नाचे पाकीट व पाणी पोहोचविण्याचे काम युवासेनेच्या माध्यमातून करण्यात आले. दररोज वेगवेगळे मेनू तयार करून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न युवासेना टीमने केला. आज शेवटच्या दिवशी पोळी, मिक्स व्हेज व गोड बर्फी असा मेनू तयार करण्यात आलेले एक हजार पाकीट दादासो भीमराव गोरे यांच्या हस्ते वाटप करून या अभियानाची सांगता करण्यात आली.
राज्यात कोरोना संकटाच्या कालावधीत गरजूंना मदत करण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच युवकांनी स्वतः काळजी घेऊन या संकट कालावधीत लोकांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन युवासेनाप्रमुख तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. त्यानुसार ॲड. पंकज गोरे यांनी शहरात मासाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्ण मोफत भोजन सेवा उपक्रम २७ एप्रिलपासून सुरू केला. दररोज एक हजार अन्नाचे फूड पॅकेट तयार करून सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत अन्न वाटप करण्यात आले. तसेच निराधार, रुग्णालयाच्या बाहेर थांबलेेले नातलग, २४ बाय ७ सेवा देणारे कर्मचारी, पोलीस कर्मचारी अशा अनेक घटकांना ११ वाजेनंतर साधे पाणीदेखील मिळत नव्हते. भगवा चौकातील फूड पॅकेट वाटपाचे काम संपल्यानंतर शहरात विविध ठिकाणी जाऊन गरजूंना अन्न आणि पाणी देण्यात आले. या १९ दिवसांत दररोज वेगवेगळा मेनू तयार करून जेवण वाटप करत १९ दिवसांत १९ हजार नागरिकांची भूक भागविण्याचे काम करण्यात आले. या उपक्रमासाठी कोणाचीही मदत न घेता युवासेना जिल्हाप्रमुख ॲड. पंकज गोरे यांनी स्वखर्चाने हे अभियान राबविले.
शेवटच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत अखेरच्या दिवसाचे अन्नदान करत जड अंत:करणाने या अभियानाची सांगता करण्यात येत आहे. १९ दिवसांत विभिन्न क्षेत्रात हातावर पोट भरणाऱ्यांची भूक शमविण्याचे पुण्य प्राप्त करता आले. याचे समाधान असले तरी अभियान थांबवावे लागत असल्याची खंत आहे, अशा भावना ॲड. गोरे यांनी व्यक्त केल्या.
अन्नदान मोहीम यशस्वी करण्यासाठी शहर प्रमुख संदीप मुळीक, युवती सेना सोनी सोनार, स्नेहा वाघ, दक्षता पाटील, स्वप्निल सोनवणे, जितेंद्र पाटील, अमित खंडेलवाल, भूषण पाटील, आकाश शिंदे, पवन सरग, योगेश वाघ, भावेश अहिरराव, जयवंत गोरे, नीलेश चौधरी, प्रेम सोनार, ज्ञानेश्वर देवरे, मयूर सोंजे, तुषार सातपुते, दर्शन कंबायत यांच्यासह नाथू महाराज व त्यांची टीम, विजय मंडप, खुशी केटरर्स, आदींनी परिश्रम घेतले.