रस्तेच नाही, आम्ही वापरायचे कुठून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:58+5:302021-06-11T04:24:58+5:30
धुळे : भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी खोदलेल्या देवपुरातील रस्त्यांना पहिल्याच पावसात गटारीचे स्वरूप आले आहे. ‘रस्तेच नाही, आम्ही वापरायचे ...
धुळे : भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी खोदलेल्या देवपुरातील रस्त्यांना पहिल्याच पावसात गटारीचे स्वरूप आले आहे. ‘रस्तेच नाही, आम्ही वापरायचे कसे?’, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. देवपुरातील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून एक प्रकारे नरकयातना भोगत आहेत.
जिल्ह्यात सर्वत्र मान्सूनचा पहिला पाऊस झाला. धुळे शहरातही मुसळधार सरी कोसळल्या. भूमिगत गटारांसाठी खोदलेल्या रस्त्यांवर प्रचंड चिखल, गाळ निर्माण झाला आहे. वाहनांची चाके फसत आहेत. गाड्या स्लीप होत आहेत. या रस्त्यांना एक प्रकारे गटाराचे स्वरूप आले आहे. रहिवाशांना बाहेर पडणेदेखील कठीण झाले आहे. भूमिगत गटारीचे काम मार्गी लावून पावसाळ्याच्या आधी रस्त्यांची कामे पूर्ण करायला हवी होती. महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे, अशा संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
दरम्यान, भूमिगत गटारीचे काम केल्यानंतर बुजविण्यात आलेले रस्ते खचले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. चेंबरजवळदेखील खड्डे पडले आहेत. वाहनचालकांसाठी हे रस्ते धोेकादायक ठरत आहेत.
रस्त्यांचे काम त्वरित करण्याची मागणी देवपुरातील इंदिरा गार्डन, आनंदनगर परिसरात, गीतानगर परिसरातील नागरिकांनी केली आहे. भूमिगत गटारांचे काम देवपुरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.