ऑनलाइन गेम्सचे बळी! कर्जबाजारी तरुणाने पत्नी, मुलास विष पाजून स्वत:ला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:10 IST2025-06-17T13:01:45+5:302025-06-17T13:10:02+5:30
शेती विकली, घर विकले तरी कर्जाच्या फेरा सुटत नसल्याने टोकाचे पाऊल

ऑनलाइन गेम्सचे बळी! कर्जबाजारी तरुणाने पत्नी, मुलास विष पाजून स्वत:ला संपवले
धाराशिव : डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर, फेडण्यासाठी पाठीशी काहीच शिल्लक नसल्याने नैराश्यात रुतलेल्या बावी येथील लक्ष्मण मारुती जाधव (वय ३०) या तरुणाने पत्नी तेजस्विनी व दोन वर्षीय मुलगा शिवांश यांना विष पाजून स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. ऑनलाइन गेम्स तसेच शेअर मार्केटमध्ये नुकसान होऊन कर्ज झाल्याचा दावा त्याच्या आप्तेष्टांकडून करण्यात आला. मात्र, पोलिसांनी त्याची पुष्टी केली नाही. तसा कयास असल्याचे स्पष्ट केले.
धाराशिव तालुक्यातील बावी येथील लक्ष्मण जाधव हा तरुण आपली पत्नी तेजस्विनी व शिवांश यांच्यासह पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्याला होता. लक्ष्मण हा जेसीबी, ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवीत होता. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे हे कुटुंब एकत्र झोपले होते. दरम्यान, सोमवारी सकाळचे ११ वाजले तरी घरातून काही आवाज येत नव्हता. दारही उघडले नव्हते. लक्ष्मण बाहेर न आल्याने त्याच्या काही मित्रांनी घराकडे धाव घेतली. मात्र, आतून कडी लावलेली असल्याने व कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी तातडीने ही बाब पोलिसांना कळवली. पोलिस अधीक्षक रितू खोकर, ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारोती शेळके हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी दार उघडून पाहणी केली असता तेजस्विनी व शिवांश बेडवर निपचित तर लक्ष्मण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या तिघांचेही मृतदेह एका वाहनातून पोलिसांनी धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जबाब घेण्याचे काम ग्रामीण पोलिसांकडून सुरू होते.
मन हेलावून टाकणारे दृश्य
पोलिसांनी दार उघडून आत प्रवेश केल्यानंतर तेजस्विनी व शिवांश हे बेडवर निपचित पडले होते. त्यांच्या तोंडातून फेस आला होता, तर लक्ष्मण हा आडूला गळफास घेतलेला दिसून आला. हे दृश्य पाहिल्यानंतर नातेवाइकांनी हंबरडा फोडला.
अडीच वर्षांपूर्वी केला प्रेमविवाह
लक्ष्मण जाधव याचे गावातीलच तेजस्विनीसोबत प्रेम जुळले होते. यातूनच अडीच वर्षांपूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला होता. यानंतर हे दोघे प्लॉटमध्ये पत्र्याचे शेड तयार करून त्यात वास्तव्य करीत होते. त्यांच्या संसारवेलीवर शिवांशरूपी फूल दोन वर्षांपूर्वीच उमलले.
शेती विकून फेडले २० लाख रुपये
लक्ष्मणवर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते. त्याच्या वाट्याला आलेले जवळपास चार एकर शेत विकून त्याने २० लाख रुपयांची परतफेड केली होती. पुन्हा कर्ज झाल्याने राहत्या प्लॉटचाही पाच लाखांत सौदा केला होता. तरीही कर्जाच्या फेरा सुटत नसल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
प्रथमदर्शनी मयत तरुणाने पत्नी व मुलास विष देऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. प्राथमिक माहितीनुसार ऑनलाइन गेम्स, शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याचे त्याचे आप्तेष्ट सांगत आहेत. मात्र, आम्ही त्याची या क्षणाला पुष्टी करीत नाही. तपासाअंतीच यातील खरे कारण समोर येऊ शकेल.
- मारोती शेळके, पोलिस निरीक्षक, धाराशिव ग्रामीण