पीक विमा भरण्याची उद्या अंतिम मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:37 IST2021-07-14T04:37:43+5:302021-07-14T04:37:43+5:30
उस्मानाबाद : खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ...

पीक विमा भरण्याची उद्या अंतिम मुदत
उस्मानाबाद : खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै निश्चित करण्यात आली आहे. मात्र, पावसाच्या खंडामुळे पेरण्यांना विलंब झाल्याने पीक विमा भरण्याची मुदत आणखी वाढवून देण्याची मागणी शेतकर्यांतून केली जात आहे.
हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे मुख्य पिकांचे ७५ टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास पीक विम्याचे संरक्षण मिळणार आहे. काढणीच्या पंधरा दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ या बाबीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी पन्नास टक्केपेक्षा जास्त घट झाल्यास नुकसान भरपाई देय असणार आहे.
पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात घट, टाळता न येणाऱ्या जोखमीमुळे होणारी घट, विमाक्षेत्र घटकातील पीक कापणी प्रयोगातून उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नाची तुलना उंबरठा उत्पन्नाशी करुन नुकसानभरपाई निश्चित केली जाणार आहे. गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी आग, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त होणारे अधिसूचित पिकांचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित केले जाणार आहे. काढणीपश्चात नुकसान झाल्यानंतर ७२ तासांची अट यावेळीही कायम ठेवण्यात आली आहे. दरम्यान, विमा हप्ता भरण्यासाठी देण्यात आलेली १५ जुलैची मुदत गुरुवारपर्यंतच आहे. त्यामुळे तातडीने विमा रक्कम भरून आपल्या पिकांना संरक्षण मिळवून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे.