सोलापूर-धुळे महामार्गावर कारचा भीषण अपघात; नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू, चालक जखमी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 12:23 IST2026-02-22T12:22:20+5:302026-02-22T12:23:05+5:30
परीक्षेसाठी जोडपे लातूरला निघाले...

सोलापूर-धुळे महामार्गावर कारचा भीषण अपघात; नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू, चालक जखमी...
येरमाळा : साखरपुड्यानंतर अवघ्या चार दिवसांतच एका जोडप्याचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटीजवळील वळणावर कार कमानीला धडकल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात वधू-वराचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी आहे.
लग्नाचे स्वप्न अधुरे....
वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय रामभाऊ शिनगारे (वय २५) आणि इजोरा (सध्या मुक्काम वाशी) येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया सुनील चव्हाण (वय २३) यांचा मागील रविवारी(दि. १५) साखरपुडा झाला होता. लग्नाच्या तयारीला सुरुवात झालेली असतानाच दोन्ही कुटुंबावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला.
परीक्षेसाठी जोडपे लातूरला निघाले...
नववधू अक्षया हिची रविवारी लातूर येथे महापारेशनची परीक्षा होती. त्या परीक्षेसाठी पहाटे वाशी येथून घरच्या कारने (MH 25 BF 5064) तिघे लातूरकडे निघाले होते. सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार थेट येडशी टोलवेच्या कमानीला धडकली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, कारचा पुढील भाग पूर्णतः चुरडला गेला. या भीषण धडकेत अक्षया सुनील चव्हाण आणि अक्षय रामभाऊ शिनगारे यांचा जागीच मृत्यू झाला.
चालक जखमी; नागरिकांनी केली मदत
या अपघातात चालक अक्षय सिरसट (वय २२) जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच रत्नापूर येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. जखमी चालकाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनीही घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. साखरपुड्यानंतर अवघ्या चार दिवसांतच दोघांचा अकाली मृत्यू झाल्याने वाशी तालुक्यात शोककळा पसरली आहे.