सत्ताधारी : आश्वासक व बळ भरणारा, विरोधक : घोर निराशा पदरी टाकणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:35 IST2021-03-09T04:35:31+5:302021-03-09T04:35:31+5:30
कृष्णासाठी ६६७ कोटी... जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी अर्थसंकल्पामध्ये ६६७ कोटीची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या ...

सत्ताधारी : आश्वासक व बळ भरणारा, विरोधक : घोर निराशा पदरी टाकणारा
कृष्णासाठी ६६७ कोटी...
जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी अर्थसंकल्पामध्ये ६६७ कोटीची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल असा विश्वास वाटतो. वैद्यकीय महाविद्यालयाचाही अर्थसंकल्पामध्ये उल्लेख केल्याने त्यावरही मोहोर उमटली आहे. शेतकऱ्यांसाठी तीन लाखापर्यंतच्या कर्जाला आता ० टक्के व्याजाने कर्जपुरवठा केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न यामध्ये करण्यात आले आहेत. त्यासाठी गोदामाची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचा सरकारचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. सौर कृषी पंपाच्या माध्यमातून शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी अखंडित वीज पुरवठा देण्यासाठीसुध्दा सरकारने पुढाकार घेतला आहे.
रेल्वे, वाटर ग्रीड, मदत कुठेय...
शिवसेनेचे तीन आमदार व एक खासदार असताना आजच्या अर्थसंकल्पामध्ये महाविकास आघाडी सरकारने तुलनेत उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नेमकं काय दिलं, याचा शोध घेणे अजून सुरु आहे. केंद्र सरकारच्या निधीवर अवलंबून असलेल्या राज्यातील योजना व प्रकल्पांचा मोठया प्रमाणावर उल्लेख आहे. कर्ज माफी पासून वंचित शेतकरी, नियमीत कर्ज भरणाऱ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान, हक्काच्या पीकविम्या पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा उल्लेखही नाही.
मराठवाडा वॉटर ग्रीड, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग यांचाही उल्लेख झला नाही. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी गतवर्षी ८४० कोटींची तरतूद होती. तीही पुरेशी नव्हती. यंदा तर त्याहून कमी तरतूद झाल्याने या अर्थसंकल्पातून जिल्ह्याची घोर निराशा झाली आहे.
राज्याला बळ देणारा अर्थसंकल्प...
महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा कोरोना व टाळेबंदी संकटांवर मात करीत राज्याला बळ देणारा आहे. शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत पीक कर्ज बिनव्याजी देण्याचे धोरण आघाडी सरकारने घेतले आणि याचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी, उद्योग, रोजगार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून सर्वाना पुढे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील उस्मानाबाद, परभणी या दोन जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा निर्णय घेतला आणि इतर जिल्ह्यातील विकासकामांना मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केल्याने तो सर्वसामान्यांना दिलासा देणारा ठरेल.
जिल्ह्यासाठी ऐतिहासिक अर्थसंकल्प...
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या विषयाला अर्थसंकल्पातून गती मिळाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतुद करण्यात आली असून, पुढील वर्षी प्रवेश प्रक्रिया होण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. त्यामुळे यंदाचा हा अर्थसंकल्प जिल्ह्यासाठी ऐतिहासिकच ठरला आहे. तीन लाखांपर्यंत कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता शून्य टक्के दराने कर्ज देण्याचा चांगला निर्णय झाला आहे. प्रत्येक तालुक्यात नवीन भाजीपाला रोपवाटिका स्थापन होणार असल्याने विकेल ते पिकेल योजनेच्या माध्यमातुन बाजार साखळी निर्माण करण्यात येणार आहे.