मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली, प्रवाशांची गैरसोय वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:34 IST2021-07-30T04:34:11+5:302021-07-30T04:34:11+5:30
उस्मानाबाद : ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या शंभरावर बस गावी मुक्कामी राहत होत्या. मात्र, कोरोना संसर्गाच्या ...

मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली, प्रवाशांची गैरसोय वाढली!
उस्मानाबाद : ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या शंभरावर बस गावी मुक्कामी राहत होत्या. मात्र, कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे मुक्कामी बस रद्द करण्यात आल्या होत्या. कोरोनाचे रुग्ण घटू लागल्याने ७ जूनपासून बस सेवा पूर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र, अद्यापही ५० टक्के मुक्कामी बस बंदच असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
रात्री उशिरा ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांना गावी पाेहोचता यावे, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मुक्कामी बस सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळी लवकर शाळा, कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थी तसेच कामानिमित्त शहरात येणाऱ्या व्यक्तींना मुक्कामी बस फायद्याच्या ठरत. कोरोनापूर्वी उस्मानाबाद विभागाच्या सहा आगारांतून एकूण ९९ बस मुक्कामी सोडल्या जात. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुक्कामी बससेवा बंद करण्यात आली होती. ७ जूनपासून बससेवा पूर्वपदावर येऊ लागली आहे. आता केवळ ५५ बस सुरू झाल्या आहेत. तर अद्यापही ४४ बस बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचा गैरसोय होत आहे. मुक्कामी बस लवकर सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामीण भागातील प्रवशांकडून होत आहे.
आगार आणि मुक्कामी गावी जाणाऱ्या बस
उस्मानाबाद ९ ७
कळंब १७ ११
तुळजापूर १९ १०
परंडा १५ १०
उमरगा १५ १३
भूम १० ०४
५० टक्के बस आगारातच
जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या एकूण ९९ बस मुक्कामी राहत असतात.
कोरोना संसर्गामुळे ग्रामीण भागात मुक्कामी जाणाऱ्या बस बंद करण्यात आल्या होत्या.
७ जूनपासून बससेवा सुरू झाल्यानंतर बस धावू लागल्या आहेत. सध्या केवळ ५५ बस मुक्कामी जात आहेत, तर ४४ बस अद्यापही आगारातच थांबल्या आहेत.
कोट...
मागणीनुसार बस सोडण्यात येतील
उस्मानाबाद विभागातील ९९ बस ग्रामीण भागात मुक्कामी सोडल्या जातात. सध्या शाळा बंद असल्याने बसला विद्यार्थी नसतात. तसेच मुक्कामी बस असलेल्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे. सध्या ५५ बस सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार मुक्कामी बसच्या प्रवासी संख्येनुसार बस सोडल्या जाणार आहेत.
-ताह्मणकर, विभाग नियंत्रक
मुक्कामी बस सुरू कराव्यात
काेरोनापूर्वी गावात नियमित मुक्कामी बस येत होती. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने मुक्कामी बस बंद झाली. आता रुग्णांची संख्या कमी झाली तरी मुक्कामी बस सुरू झालेली नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एसटी महामंडळाने लवकर मुक्कामी बस सुरू करावी.
-अजित आवाड, प्रवासी
मुक्कामी बस सुरू असल्यामुळे शहरात सकाळी लवकर जाऊन कामकाज करता येत होते. शिवाय, रात्रीही गावात येणे सोयीचे होते. विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिकांना मुक्कामी बस असल्यामुळे गैरसोय होत नव्हती. आता बस बंद आहे. त्यामुळे शैक्षणिक कामासाठी बाहेर जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांना भाडे देऊन जावे लागत आहे. महामंडळाने बस सुरू करावी.
-बाळू गाजरे, प्रवासी