कळंब : आषाढ महिन्यात नव्या सुनेने आपल्या खऱ्या सासू-सासऱ्याचे तोंड पाहू नये असे म्हणतात. परंतु, यंदा धडाक्यात लग्नसोहळे पार पडत असल्याने पारंपरिक समज-गैरसमज आता कालबाह्य होत असल्याचे चित्र समोर येते आहे.
आषाढ हा हिंदू पंचांगाप्रमाणे आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला चौथा महिना आहे. आपल्या देशातील मुख्य व्यवसाय शेती हाच असून, याच महिन्यात पावसाचे आगमन असल्याने शेतीच्या कामाची लगबगही चालू होते. त्यामुळे घरात इतर काही कार्ये केली जात नसत. परिणामी लग्न, साखरपुडा, वास्तुशांती, उपनयन संस्कार आदी कार्येही आषाढ महिन्यात करीत नाहीत. उन्हाळ्यातील प्रचंड उकाडा सहन केल्यानंतर या महिन्यात गारवा अनुभवायास मिळतो. तसेच हिंदू पुराणानुसार सर्व देवी-देवता या महिन्यात आराम करीत असतात. त्यामुळे त्यांच्या अपरोक्ष शुभकार्य करू नये, असाही एक विचारप्रवाह आहे. वैद्यकीयदृष्ट्याही आषाढातील लग्न पुढे होणाऱ्या अपत्याच्या तब्येतीसाठी चांगले नसते, असे म्हटले जाते. या सगळ्या जुन्या काळातील गोष्टी झाल्याने आता त्याला कोणी गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. यंदा आषाढातही मोठ्या प्रमाणात लग्नाचे बार उडवून दिले जात आहेत. शहरी भागाबरोबरच रूढी परंपरा सांभाळणाऱ्या ग्रामीण भागातही यंदा या मोसमात लग्ने लागल्याची उदाहरणे आहेत.
साधारणतः दिवाळीत तुळशीविवाह झाल्यानंतर सुरू झालेला विवाह सोहळ्यांचा मुहूर्त जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो. परंतु मागील दोन वर्षांपासून वाढत्या कोरोनासंसर्गाने विवाह मुहूर्त असणाऱ्या महिन्यातच नेमके शासनाने गर्दी होऊ नये म्हणून निर्बंध जारी केले होते. लग्न समारंभासाठी दोन्ही बाजूकडील मिळून ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली असल्याने ज्यांना ग्रँड विवाह सोहळे करण्याची हौस होती, त्यांनी ‘वेट अँड प्रे’ची भूमिका घेतली होती. पण, कोरोनाचे नवनवीन अवतार येत असल्याने शासनाने निर्बंध कायम ठेवल्याने उरकून घ्या असा सूर दोन्ही बाजूने व्यक्त होऊ लागला. परिणामी तिथी मुहूर्त यांना फाटा देत यंदा आषाढातही सनई चौघडे वाजत आहेत.
चौकट -
परवानगी पन्नासची पण...
लग्न हा आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय सोहळा व्हावा, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी अगदी मनमोकळेपणाने खर्च करणारे कमी नाहीत. या आनंदात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, अशीही अनेकांची इच्छा असते. आता शासनाने लग्न करा, पण ५० जणांच्या उपस्थितीत, असा आदेश काढला आहे. परंतु, ही संख्या कितीही आटोपती घेतली तरी १००-१५०च्या घरात जात असल्याचे दिसत आहे.
चौकट -
आषाढ महिन्यात लग्न करू नये असे शास्त्र सांगते. याबाबत आमच्याकडे विचारणा करणाऱ्यांनाही आम्ही सांगतो की आषाढात मुहूर्त नसतात. परंतु, काही आपत्कालीन स्थिती असेल, वर अथवा वधूकडील अडचणीमुळे लग्न करावेच लागणार असेल तर कुलदैवताला अभिषेक करून, त्यांची परवानगी घेऊन लग्न लावता येते.
- ऋषिकेश पाटील, पुरोहित
आषाढात लग्न करत नाहीत. परंतु, कोरोनामुळे मागील लग्नाचे मुहूर्त सापडले नाहीत. आता परिस्थिती अशी झाली आहे की परंपरा पाळणे अवघड झाले आहे. जुन्या काळात आषाढ महिन्यात नवीन सुनेने सासू-सासऱ्याचे तोंड बघू नये, असे म्हणायचे. पण आता लग्न करून सून घरात आणली जात आहे. पंचांगामध्ये पूर्वी आषाढात लग्नाचे मुहूर्त दिले जात नव्हते. पण आता काही मुहूर्त दिले आहेत.
- मनोज जोशी, पुरोहित
चौकट
मंगल कार्यालयात लगबग वाढली
कळंब शहरातील मंगल कार्यालयात पुन्हा लग्नकार्ये होऊ लागल्याने लगबग वाढली आहे. सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे, वऱ्हाडाची संख्या ५०च्या आत आहे का, यावरही मंगल कार्यालय चालकांना लक्ष ठेवावे लागत आहे. तारीख ठरवतानाच या सर्व बाबी संबंधितांना बजावून सांगितल्या जात असल्याचे मंगल कार्यालय चालकांनी सांगितले. यंदा आषाढातील जवळपास सर्व तारखा बुक असल्याची माहितीही देण्यात आली.
चौकट -आषाढातील मुहूर्त -
जुलै महिन्यातील १३, १८, २२, २५, २६, २८, २९ तर ऑगस्ट महिन्यातील ३ व ४ तारखेला लग्नाचे मुहूर्त सांगितले आहेत.