किती ही लूट !महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये कांदा १५ रुपये तर घराजवळ ३० रुपये किलो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:33 IST2021-07-31T04:33:17+5:302021-07-31T04:33:17+5:30
उमरगा : उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला पीक थेट महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये जात आहे. या भाजी मार्केटमधून ...

किती ही लूट !महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये कांदा १५ रुपये तर घराजवळ ३० रुपये किलो !
उमरगा : उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला पीक थेट महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये जात आहे. या भाजी मार्केटमधून भाजीपाला खरेदी करून आरोग्य नगर, दिग्गी रोड चौक व घरोघरी जाऊन विक्री करीत आहेत. मात्र शहरात होलसेल दरात मिळणारे दर व बाहेर रिटेलमध्ये असलेल्या दराची तुलना केली तर भाजीपाला दुप्पट दराने विक्री केला जात आहे. उमरगा शहरातील भाजी मंडईत कांदा १५ रुपये किलो असला तरी घराजवळ मात्र तो ३० रुपये किलो दराने विक्री केला जात आहे. उमरगा तालुक्यात अनेक ठिकाणी भाज्यांचे मळे आहेत. शेतकरी आधुनिक युगात हायटेक होत शेती करीत उत्पन्न वाढवित आहेत. उत्पन्नाबरोबर खर्चसुद्धा वाढलेला आहे. परंतु कोरोनाच्या संकटाने बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाल्याला मागणी घटली आहे. परिणामी व्यापारी स्वस्त दरात शेतकऱ्यांकडून भाजीपाल्याची खरेदी करीत असला तरी ग्राहकांना तो महाग घ्यावा लागत आहे.
हा बघा दरामधील फरक (प्रतिकिलो दर)
भाजी होलसेल दर किरकोळ दर
कांदा- १५ ३०
गवार- ४० ६०
भेंडी- २० ४०
टोमॅटो- १५ २५
दोडका- २० ३०
हि. मिरची- २५ ३५
दुधीभोपळा- १५ ३०
फ्लॉवर - २० ४०
कोबी - १५ ३०
वांगी- ४० ६०
महात्मा फुले मार्केटमध्ये भेंडी २० रुपये, तर डिग्गी रोड चौकात ४० रुपये किलो!
शहरात होलसेल भाजीपाला विक्रीचे ठिकाण महात्मा फुले मार्केट आहे. या ठिकाणी भेंडीचे दर १५ ते २० रुपये किलो होते. मात्र याच भेंडीची शहरातील डिग्गी रोड चौक व आरोग्य नगरमध्ये खरेदी केली असता ते ३० ते ४० रुपये किलो होती.
◆ पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्यांच्याच हातात !
● तालुक्यात भाजीपाल्याच्या आधुनिक शेतीकडे अनेक शेतकरी वळले आहेत. मात्र भाजीपाल्याला अत्यल्प दर मिळत असल्याने संकट उभे ठाकले आहे.
●मजुरीचे दर, कीटकनाशक, खत यांचे नियोजन आवाक्याबाहेर आहे. अशा स्थितीत शेतकरी आपला माल भाजी मार्केटमध्ये विकून आपली उपजीविका भागवीत आहेत.
●भाजीपाला उत्पादनावर खर्च झालेला पैसा भाजीपाला विक्रीनंतर मिळत नाही. ठोक व्यापारी भाजीपाला खरेदीनंतर तोच माल किरकोळ विक्रेत्यांना विकतात. किरकोळ विक्रेते रोजगारासाठी अधिक रकमेने ग्राहकांना विकतात.
एवढा फरक कसा?
शेतकऱ्यांकडून कमी दराने भाजीपाला मिळत असला तरी किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करताना ग्राहकांना जास्त किमतीला विकावा लागतो. कारण किरकोळ विक्री करताना वजनात घट येते. दिवसभराचा रोजगार निघावा लागतो. काही भाज्या शिल्लक राहिल्यास दुसऱ्या दिवशी खराब होतात. त्या टाकून द्याव्या लागतात. ग्राहक निवडून चांगल्या तेवढ्या भाज्या घेतात त्यामुळे खराब भाज्यांना किंमत मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांना जास्त दराने भाजी विक्री केली जाते.
- धनराज चौगुले, व्यापारी, उमरगा
तालुक्यातील शेतकरी भाजीपाला पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळलेला आहे. कोरोनामुळे बाहेर जिल्ह्यात निर्यात कमी झाल्याने दर अत्यल्प आहेत. दर्जेदार मालाला दर बरे आहेत. शेतकरी भाजीपाला थेट भाजी मार्केटमध्ये आणतात. वाहतुकीवर खर्च, भाजीपाला पिकविताना मजुरीचे दर, कीटकनाशक, रासायनिक खत यासह पिकांची देखभाल शेतकरी करीत असतो. त्यानंतर रोजगार म्हणून दुकानदार भाजीमंडीतून भाजीपाला खरेदी करून विकत असतात. त्यामुळे फायद्याच्यादृष्टीने दरवाढ होत असते.
- तुळशीदास कावळे, व्यापारी, उमरगा
अर्धा-पाव किलोसाठी बाजारात जाणे परवडत नाही!
सध्याच्या कोरोनाच्या काळात आठवडी बाजार भरणे बंद झाले आहे. गृहिणींना लागणारा दररोजचा भाजीपाला किरकोळ विक्रेते गाड्यावर घरपोच विकतात. शेतकऱ्यांकडून कमीत कमी किमतीत घेतलेला तोच भाजीपाला ग्राहकांना दुप्पटी-तिप्पटीने भावाने विकला जातो. अर्धा व पाव किलो भाजीकरिता गृहिणींना भाजीमंडीमध्ये जाणे या काळात अशक्य आहे. त्यामुळे घरपोच आलेला मिळेल तसा भाजीपाला मिळेल त्या किमतीत घेण्याशिवाय पर्याय नाही.
- अवंती किरण सगर, गृहिणी, उमरगा.
भाजीपाला पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मेहनत करावी लागते. पण त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. भाजीपाला व्यापाऱ्यांजवळ आल्यानंतर भाव दुप्पट होतो. अर्धा पाव किलोसाठी भाजी मार्केटमध्ये जाणे शक्य नाही त्यामुळे ग्राहक नाईलाजाने प्रत्येक भाजी दुप्पट भावाने खरेदी करावी लागते.
- शोभा पद्माकर मोरे, गृहिणी, उमरगा