तुळजापूर : ज्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज आहे, त्या पात्र, गरजू शेतकऱ्यांना स्केल ऑफ फायनान्सपेक्षा कमी कर्ज देऊन त्यांच्यावर अन्याय करू नका. असा एक जरी शेतकरी आढळून आला, तर कोणाची ही गय केली जाणार नाही. आम्ही एकदा सांगून पाहू. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास दुसऱ्यावेळी त्याला शिवसेना स्टाईलने समजावून सांगू, असा इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला.
बुधवारी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पीक कर्ज आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख, सहायक निबंधक प्रसाद कुलकर्णी, लीड बँक व्यवस्थापक विजयकुमार, तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, सहकार अधिकारी सुदर्शन शिंदे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अमीर शेख, मीडियाप्रमुख चेतन बंडगर आदी उपस्थित होते.
तालुक्यातील ८० टक्के लोक शेती करतात. त्याला आपण वेळेत कर्ज न दिल्यास तो खासगी सावकाराकडे जातो. त्यामुळे सर्व बँकांनी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. सर्व बँकांनी स्केल ऑफ फायनान्सनुसार कर्ज वाटप करावे. बँकांच्या कर्मचारी संख्येबाबतही आम्ही अर्थमंत्री, अर्थराज्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. सर्व बँकांनी स्केल ऑफ फायनान्स आणि दत्तक गावांची यादी बँकेच्या दर्शनी भागात लावावी. बँकांनी नाही लावली, तर सहायक निबंधकांनी ती लावावी, असेही ते म्हणाले.
140721\1826-img-20210714-wa0016.jpg
आढावा बैठक दरम्यान खा.ओमराजे निंबाळकर